चार वर्षांमध्ये एकदा तरी ‘हळद पिवळे करून जातेय’, अशी एक म्हण शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे.
संपादकीय
दूधदर स्थिर कसे राहतील?
राज्यातील दूध संघांनी दरवाढीच्या घोषणेची घाई करण्याऐवजी कमीत कमी चार-सहा महिने वाढलेले दर स्थिर कसे राहतील, याबाबतच्या धोरणावर काम करायला हवे.
राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या गायीच्या दुधाच्या दरात काही दूध संघांनी प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत बाजारात दूध भुकटी आणि लोण्याचे दर वाढल्यामुळे ही दरवाढ जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गायीच्या दुधाला प्रतिलिटर २४ रुपयांऐवजी २६ ते २७ रुपये दर मिळणार आहे. खरे तर दूध उत्पादनाचा वाढता खर्च पाहता शेतकऱ्यांना हा दरदेखील परवडणारा नाही.
सद्यपरिस्थितीत गायीच्या दुघाला ३० रुपये प्रतिलिटरच्या वर दर मिळाला तरच कुठे तरी या व्यवसायाचे खर्च-मिळकतीचे गणित बसते. त्यामुळे वाढीव २६ ते २७ रुपये प्रतिलिटर दराने उत्पादकांना दिलासा तर मिळणारच नाही, उलट तोट्यातच हा व्यवसाय करावा लागणार आहे. त्यातच ही दरवाढ काही दूध संघांनीच जाहीर केली आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे दूध दरवाढीच्या घोषणा होतात. १० ते १५ दिवस वाढीव दराने दूध खरेदी होते. पुन्हा काहीतरी कारणे सांगून दरवाढीत कपात केली जाते आणि वर्षभर कमी दरानेच उत्पादकांकडून दूध खरेदी केली जाते. त्यामुळे दूध दरवाढ जाहीर केली तरी ते कमी होण्याची भीती उत्पादकांच्या मनात कायमच असते. राज्यातील दूध संघांनी दरवाढीच्या घोषणेची घाई करण्याऐवजी कमीत कमी चार-सहा महिने वाढलेले दर स्थिर कसे राहतील, याबाबतच्या धोरणावर काम करायला हवे.
दूध संघांनी दर्जानुसार दरकपातीतील तफावत कमी करायला पाहिजे. ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफला प्रतिलिटर २६ रुपये दर जाहीर केला, तरी ८.४ एसएनएफला एक रुपयाची कपात होते आणि उत्पादकास २५ रुपयेच दर मिळतो. दूध संघांनी अशी कपात एक रुपयाऐवजी २० पैसे केली, तर ८.४ एसएनएफला उत्पादकांना २५.८० रुपये असा दर मिळेल. त्यामुळे दरकपातीद्वारे शेतकऱ्यांच्या होण्याऱ्या लुटीचाही दूध संघांनी गांभीर्याने विचार करायला हवा.
शेतीप्रमाणे दुष्काळ, अतिवृष्टी-महापूर यांचा फटका दुग्ध व्यवसायालाही सातत्याने बसत आला आहे. गेल्या वर्षीच्या (२०१९) महापुरात अनेक शेतकऱ्यांची दुधाळ जनावरे वाहून गेली. नदी-नाल्यांकाठचे चारा क्षेत्र खरवडून गेले. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने राज्यातील काही दूध उत्पादकांनी आपल्या दावणी मोकळ्या केल्या. यातूनही काहींनी सावरण्याचा प्रयत्न करून दुग्ध व्यवसाय पुन्हा उभा केला. त्यास मागील एप्रिलपासून ते जूनपर्यंतच्या कडक लॉकडाउनने उद्ध्वस्त केले. लॉकडाउन काळात दुधाची मागणी आणि दरही घटले. अशा संकटांच्या मालिकातून आता कुठे हा व्यवसाय सावरला जात आहे.
कोरोना काळात झालेल्या दूध संकलनातून अनेक संघांनी भुकटी (पावडर) तयार केली आहे. या भुकटीस आता प्रतिकिलो २०० रुपयांच्या वर म्हणजे चांगला दर मिळत आहे. लोण्यासह इतरही दुग्धपदार्थांचे दर वाढले आहेत. हॉटेल्स-मिठाई व्यावसायिकांकडूनही दुधाची मागणी वाढत असून दरही चांगला मिळतोय. अशावेळी दूध संघांनी आपल्या नफ्यातील वाटा उत्पादकांपर्यंत पोहोचवायला हवा. महत्त्वाचे म्हणजे काहीही झाले तरी पुढील ठरावीक काळात एका विशिष्ट रकमेच्या खाली दुधाचे दर जाणारच नाहीत, असे दूध उत्पादकांना सांगितले तरच त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून राज्यात हा व्यवसाय टिकणार
आहे.
- 1 of 83
- ››