‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूस

कापसाची उत्पादकता टिकून ठेवण्यासाठी सेंद्रिय वाणांबरोबर दर्जेदार सेंद्रिय निविष्ठांचा पुरवठा पण शेतकऱ्यांना व्हायला हवा.
संपादकीय
संपादकीय

जागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने सेंद्रिय कपडे बाजारात आणली आहेत. या कपड्यांना जगभरातून मागणीही वाढत असल्यामुळे सेंद्रिय कापसालाही मागणी वाढतेय. याचा अर्थ प्रगत देशात काय खावे याबरोबरच कोणते कपडे परिधान करावेत, याबाबतही जागरूकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अमेरिका आणि भारत हे प्रमुख सेंद्रिय कापूस उत्पादक देश मानले जातात. आपल्या देशात खासकरून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये काही कंपन्या थेट दुर्गम भागातील शेतकऱ्यांकडून सेंद्रिय कापसाचे उत्पादन करून घेऊन त्याचा पुरवठा सेंद्रिय कापडनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना करीत आहेत. परंतु सध्या हे प्रमाण फारच कमी आहे.

राज्यात सेंद्रिय कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी चांगल्या ‘स्टेपल लेन्थ’ची वाणं पाहिजेत. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी अद्ययावत तंत्रही पाहिजे. त्यामुळेच स्वित्झर्लंड येथील एका संस्थेने सेंद्रिय कापसाचे वाण निर्मितीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला प्रकल्पाच्या माध्यमातून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात लागवडीखालील ९७ टक्के कापूस हा बीटी आहे. या कापसावर रस शोषक किडी तसेच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कीड-रोग नियंत्रणासाठी बीटी कापूस उत्पादकांचा खर्च वाढलाय पण उत्पादकता मात्र कमी होत आहे. बीटी कापसावरील वाढत्या कीडनाशकांच्या वापराने पर्यावरण प्रदूषण तर होतच आहे; परंतु मागील वर्षी कापसावर फवारणी करताना ४० हून अधिक शेतकरी, शेतमजुरांना जीव गमवावा लागला आहे. अशावेळी आपल्या राज्यात, देशात सेंद्रिय कापूस उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळत असेल तर ती बाब चांगलीच म्हणावी लागेल.

आपल्याकडील प्रचलित सरळ, संकरित वाणांपासून सेंद्रिय कापूस वाणनिर्मितीसाठी सहा ते सात वर्षांचा कालावधी लागेल. सेंद्रिय कापसामध्ये रासायनिक कीडनाशके, खते, तणनाशके यांचा वापर करता येणार नाही. अशावेळी कापसाची उत्पादकता टिकून ठेवण्यासाठी सेंद्रिय वाणांबरोबर दर्जेदार सेंद्रिय निविष्ठांचा पुरवठा पण शेतकऱ्यांना व्हायला हवा. कापसावरील घातक किडी तसेच रोगांच्या नियंत्रणासाठी मशागतीय, जैविक, वनस्पतीजन्य यांवर आधारित प्रभावी अशी एकात्मक व्यवस्थापन पद्धती विकसित करून त्याचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये करावा लागेल. सेंद्रिय कापसाचे उत्तम व्यवस्थापन करून चांगले उत्पादन घेण्यासाठी विभागनिहाय शेतकऱ्यांचे गट तयार करावे लागतील. अशा शेतकऱ्यांच्या गटांचे अपेडाने निर्देशित केलेल्या संस्थेकडून सेंद्रिय प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायला हवी.

सेंद्रिय कापसाचे उत्पादन तुलनात्मक कमी मिळणार आहे. अशावेळी कापसाच्या खरेदीची शाश्वत यंत्रणा आणि अधिक दराची उत्पादकांना हमी हवी. कंपन्यांसोबत `बाय-बॅक’ करार होत असतील, तर त्याच्या पालनाची जबाबदारी शेतकऱ्यांबरोबर संबंधित कंपन्यांची पण हवी. सेंद्रिय कापूस उत्पादनानंतर धागा काढणे, कापड विणणे, रंगकाम, कपडे शिवणे ही कामे वेगवेगळ्या जागी होत असून, या पूर्ण प्रक्रिया साखळीत कुठलाच रासायनिक घटक वापरला जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. सध्या आपल्याकडील सेंद्रिय कापूस बहुतांश निर्यात केला जातो. सेंद्रिय कापसाचे उत्पादन वाढल्यानंतर त्यावर देशातच कापूस ते तयार कपडे अशा पूर्ण प्रक्रियेबाबत प्रयत्न वाढवायला हवेत. असे झाले तर सेंद्रिय कापूस उत्पादकांचा फायदा होईल त्याचबरोबर परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. असे झाले तर बीटी कापसाला एक चांगला पर्याय सेंद्रिय कापसाच्या माध्यमातून उपलब्ध होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com