चिंब पावसानं रान झालं...

पावसाळी चार महिन्यांत मोजून १५ ते २० दिवसांतच पडणाऱ्या पावसाचे पाणी पुढे आपल्याला आठ महिने पुरवायचे असते. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविला, जिरविला पाहिजे, असे शासनापासून ते शेतकऱ्यांपर्यंत केवळ म्हटले जाते. प्रत्यक्ष कृती मात्र सर्वांकडूनच फार कमी होते.
संपादकीय.
संपादकीय.

मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देण्याचे काम केले आहे. आधीच उशिरा सुरू झालेल्या पावसाने राज्यात पेरण्या खोळंबल्या. त्यात जुलै महिन्यातील पावसाच्या मोठ्या खंडाने बऱ्याच ठिकाणच्या पेरण्या मोडाव्या लागल्या. या खंडातही तग धरून असलेल्या खरीप पिकांना मात्र सध्याच्या पावसाने संजीवनी देण्याचे काम केले आहे. घाटमाथ्यासह कोकणात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. या भागातील भात खाचरे पाण्याखाली गेल्याने अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी नदी, नाले भरून वाहताहेत. राज्याच्या बहुतांश पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने बंधारे, तलाव भरले आहेत. धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. असे असले तरी मराठवाडा, विदर्भात अद्याप पेरणी न झालेल्या, पेरणी करून मोडावी लागलेल्या शेतकऱ्यांना आत्ताच्या पावसानंतर शेतात काय पेरावे, असा संभ्रम निर्माण झाला आहे. काही शेतकरी तर खरीपऐवजी आम्ही आत्ता रब्बीच हंगाम घेऊ, असे मत व्यक्त करीत आहेत. अशा शेतकऱ्यांना त्या त्या भागातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विभागातील तज्ज्ञांनी योग्य मार्गदर्शन करायला हवे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मागील उघडिपीत मक्यावर अमेरिकन लष्करी अळी, कापसावर गुलाबी बोंड अळी, तर सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. सध्याचे सातत्याचे ढगाळ वातावरण अन् अधून मधून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीने या अळ्यांशिवाय इतरही कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे त्यांचे प्रभावी नियंत्रणात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम कृषी विस्तार यंत्रणेने करायला हवे.

मागील काही वर्षांपासून पावसाचे मोठे खंड तसेच कमी कालावधीत अतिवृष्टी हे आता नित्याचेच झाले आहे. अशावेळी पिकांची पेरणी तसेच एकंदरीत व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांना काही बदल करावे लागतील. यवतमाळ जिल्ह्यातील सुभाष शर्मा यांनी सरी-वरंबा पद्धती व बांधबंदिस्‍तीद्वारे मूलस्थानी जलसंधारणाचा प्रयोग केला. याद्वारे जूनशेवटी झालेल्या पावसाचा एक थेंबही त्यांच्या शेतशिवाराबाहेर गेला नाही. या पद्धतीने जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंडातही पीक तग धरून राहते, असा त्यांचा अनुभव आहे. मागील पावसाच्या खंडात राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक मोडावे लागले. परंतू अकोला जिल्ह्यातील भोसा येथील केशवराव खुरद यांनी रुंद-वरंबा सरी पद्धतीने (बीबीएफ) लागवड केलेले उडीद +तुरीचे आंतरपीक पावसाच्या मोठ्या खंडातही तरारून वाढत होते. बीबीएफ पद्धतीने जमिनीत पावसाचे पाणी मुरते, ओलावा अधिक काळ टिकून राहतो, पावसाच्या खंडात हा ओलावा पीक वाढीस उपयुक्त ठरतो. विशेष म्हणजे अतिवृष्टीत सरीमधून पाणी वाहून जात असल्याने पिकांचे नुकसान होत नाही. विभागनिहाय मूलस्थानी जलसंधारणाचे तंत्र विकसित झालेले असून, अत्यंत उपयुक्त अशा या तंत्राचा शेतकऱ्यांनी अवलंब वाढवायला हवा.

पावसाळी चार महिन्यात मोजून १५ ते २० दिवसांतच पडणाऱ्या पावसाचे पाणी पुढे आपल्याला आठ महिने पुरवायचे असते. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविला, जिरविला पाहिजे, असे शासनापासून ते शेतकऱ्यांपर्यंत केवळ म्हटले जाते. प्रत्यक्ष कृती मात्र सर्वांकडूनच फार कमी होते. विहीर आणि बोअरवेल पावसाळ्यानंतर लगेच आटताना दिसतात. त्यांच्या पुनर्भरणाचे चांगले तंत्र आहे. परंतू त्याचा वापर सर्वत्र दिसून येत नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेकटा येथील कय्युम अजीज शेख यांची विहीर पुनर्भरण तंत्राने एकाच पावसात ३० फूट भरल्याचे आपण पाहिले आहे. विहीर पुनर्भरणातून उपलब्ध होणारे पाणी गरजेवेळी ते पिकांना देऊ शकत असल्याने अवर्षणातही शाश्वत शेतीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com