साखर उद्योगासाठी ‘संजीवनी’ 

देशात इथेनॉल निर्मितीस खूप वाव आहे. त्यामुळे क्षमतेनुसार इथेनॉल निर्मितीसाठी नवीन प्रकल्प उभारून तसेच जुन्या प्रकल्पांत दुरुस्ती-सुधारणा करुन साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यायला हवा.
agrowon editorial
agrowon editorial

शिल्लक साखर साठा आणि चालू गळीत हंगामात होणारे विक्रमी साखर उत्पादन यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील कारखान्यांनी गरजेपुरते साखर उत्पादन करुन उर्वरित उसापासून इथेनॉल करावे, असे यातील संस्था, जाणकारांचे मत आहे. यंदाच्या हंगामात इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सी-हेवी, बी-हेवी आणि उसाच्या रसापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर दोन ते तीन रुपये वाढीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल (पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण) कार्यक्रमांतर्गत ही दरवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे सी-हेवी, बी-हेवी आणि उसाच्या रसापासूनच्या इथेनॉलला अनुक्रमे ४५.६९, ५७.६१ आणि ६२.४५ रुपये प्रतिलिटर असे दर असणार आहेत. जगातल्या सर्व देशांत इथेनॉलचे दर खनिज तेलावर अवलंबून आहेत. परंतू खनिज तेलाच्या दरातील चढउतार लक्षात घेता भारतात साखर आणि उसाच्या दरावर इथेनॉलचे दर निश्नित केले जातात. १ डिसेंबरपासून लागू होणारे नवीन इथेनॉल दर हे उसाची एफआरपी (१० टक्के रिकव्हरी) २८५० रुपये प्रतिटन आणि अपेक्षित साखर विक्री दर ३३०० रुपये प्रतिक्विंटल यानुसार ठरविले आहेत. वाढीव इथेनॉल दर हे समाधानकारक आहेत. 

इथेनॉलचे महत्व आपल्याला नव्या शतकात (२००० मध्ये) पदार्पण करतानाच लक्षात आले होते. परंतू त्यावेळी केवळ मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीचे तंत्र आपल्याकडे होते. त्यामुळे इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहनास अडचणी येत होत्या. परंतू २०१० नंतर बी-हेवी, ऊस रसापासून, तयार साखरेपासून एवढेच नव्हे तर मका, खराब धान्य तसेच काही पिकांच्या टाकाऊ अवशेषांपासून इथेनॉल निर्मितीचे तंत्र आले आहे. जगात भारत हा असा एकमेव देश आहे, जेथे इथेनॉल निर्मितीचे हे सर्व घटक उपलब्ध आहेत. इथेनॉल दराची त्री-स्तरीय पद्धतही आपल्याच देशात आहे. त्यातच २०१८ मध्ये केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय जैवइंधन धोरण’ जाहीर करुन त्याअंतर्गत इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र जैवइंधन समिती स्थापन केली आहे. या सर्व प्रयत्नांतून मागील काही वर्षांत देशात इथेनॉलचे उत्पादन वाढले आहे. असे असले तरी आपली इथेनॉल निर्मिती क्षमता ४२५ कोटी लिटरची असताना देशात सध्या २७० कोटी लिटरच इथेनॉल निर्मिती होते. राष्ट्रीय जैवइंधन धोरणानुसार २०२२ पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के तर २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परंतू सध्याच्या कमी उपलब्धतेमुळे पेट्रोलमध्ये केवळ ५.६ टक्केच इथेनॉल आपण मिसळू शकतो. 

देशात इथेनॉल निर्मितीस खूप वाव आहे. त्यामुळे क्षमतेनुसार इथेनॉल निर्मितीसाठी नवीन प्रकल्प उभारून तसेच जुन्या प्रकल्पांत दुरुस्ती-सुधारणा करुन साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यायला हवा. याकरीता सवलतीच्या दरात कर्जसुद्धा उपलब्ध करुन दिले जात आहे. साखर उत्पादन करुन विक्रीसाठी १८ ते २४ महिने वाट पाहावी लागते. या काळात साखर साठवणुकीतील अडचणीबरोबर, त्यावरील वाढता खर्च, कर्जावरील व्याज असा भुर्दंड वाढत जातो. इथेनॉल तेल कंपन्यांकडून ताबडतोब खरेदी केले जाते. २१ दिवसांत पैसे देण्याचे बंधन त्यांच्यावर आहे. पूर्वी देशातील इथेनॉल खरेदीस तेल कंपन्यांचा अनुकूल प्रतिसाद लाभत नव्हता. आता नवीन धोरणांनुसार त्यांनीही देशातील इथेनॉल खरेदीची हमी दिली आहे. कारखान्यांकडून घेतली जात असलेली अमानत रक्कम ५ टक्केवरुन एक टक्क्यावर आणली आहे. पेट्रोल तसेच डिझेलप्रमाणे अथवा इथेनॉल वाहतुकीसाठीचा वास्तविक खर्चही देण्याबाबत तेलकंपन्यांचे एकमत झाले आहे. अशावेळी इथेनॉल निर्मिती हे साखर उद्योगासाठी संजीवनी ठरु शकते, हे लक्षात घ्यायला हवे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com