शून्य मशागतीसह तणांचे व्यवस्थापन ठरते शाश्वत : प्रताप चिपळूणकर

शून्य मशागतीसह तणांचे व्यवस्थापन ठरते शाश्वत : प्रताप चिपळूणकर
शून्य मशागतीसह तणांचे व्यवस्थापन ठरते शाश्वत : प्रताप चिपळूणकर

भात आणि ऊस पिकांवर काम करत असलो तरी कोणत्याही पिकांच्या शेतीमध्ये सूक्ष्मजीवशास्त्राशिवाय पर्याय नाही, यावर आधारित माझी शेती आहे. त्याचप्रमाणे नांगरणीविना शेती, भांगलणीविना शेती, ‘तण खाई धन’ऐवजी ‘तण देई धन’ या विचारावरच जमिनीची शाश्वत सुपीकता अवलंबून असल्याचे मत प्रताप चिपळूणकर यांनी व्यक्त केले. 'अॅग्रोवन'च्या तेराव्या वर्धापन दिन निमित्ताने 'जपाल माती, तर पिकतील मोती' या विषयावर पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात मंगळवारी (ता.१७) झालेल्या चर्चासत्राला राज्यभरातील शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर, सुभाष शर्मा, वासुदेव काठे, शास्त्रज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे यांची जमीन सुपीकतेवर केलेल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

गेली ४८ वर्षे शेती करत असून, वडिलांकडून माझ्या हाती आलेल्या जमिनीची सुपीकता अत्यंत चांगली होती. १९७० चा हा काळ होता. रासायनिक खतांसह सुधारित जातींचा प्रचार आणि प्रसार सुरू होता. त्याचा वापर सुरू केला. पहिली १५ वर्षे चांगले उत्पादनही मिळाले. मात्र, त्यानंतर उत्पादनाचा आलेख खाली उतरत गेला. इतका खाली गेला की कुटुंबाचा उदरनिर्वाहही धोक्यात आला. शेती, शेतकरी, पीक, त्यात वापरल्या जाणाऱ्या निविष्ठा साऱ्या त्याच असताना हे का घडते, याचा विचार सुरू झाला. जमिनीची सुपीकता कमी झाल्याने किंवा जमिनीत ताकद न राहिल्याने कमी झालीय म्हणण्यापेक्षा नेमके काय कमी झाले, यावर चिंतन करताना हाती एक सूक्ष्मजीवशास्त्राची तोंडओळख करून देणारे इंग्रजी पुस्तक आले. त्यातून काढलेले सामान्य निष्कर्ष ः

  • सेंद्रिय कर्बाची पातळी जमिनीमध्ये कमी झाली ती वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रामुख्याने चांगल्या कुजलेल्या शेणखतांचा वापर करण्याची प्रचलित पद्धत होती. सूक्ष्मजीवशास्त्राने मात्र असे खत वापरणे चुकीची असल्याची जाणीव करून दिली. कारण कुजणारा पदार्थ शेतीत टाकणे चूक नाही. तो पदार्थ सातत्याने शेतीमध्ये टाकत राहून, त्याची कुजण्याची प्रक्रिया मात्र शेतीमध्येच झाली पाहिजे. कुजण्यातून सुपीकता वाढते हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यानंतर कंपोस्ट करणे, गांडूळखत अशी संपूर्ण कुजलेली खते शेतात टाकणे मी १९९० मध्ये पूर्णपणे बंद केले.
  • कुजणारे पदार्थ आणायचे कोठून, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांसमोर असतो. ऊस उत्पादकांकडे त्याच पाचट उपलब्ध असते. त्याच्या कुजवण्यासह व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. मात्र, या साऱ्या प्रयोगातूनही फारसे उत्पादनात फारशी वाढ न झाल्याचे दिसले. म्हणजे सुपीकता पातळी स्थिर राहिली, पण वाढलेली नाही हे स्पष्ट झाले. झाडांच्या जमिनीवरील व लवकर कुजणाऱ्या भागामध्ये सुपीकता वाढवण्याची ताकद मर्यादित असल्याचे मत झाले. त्यानंतर जमिनीतील खोडक्या आहे त्या जागीच कुजवण्याच्या दिशेने काम सुरू केले. पूर्वी दोन वर्षांनंतर नांगरणी करून खोडक्या जळण्यासाठी काढून घेतल्या जात. नांगरणीसह तेही बंद केली. पण खोडके मारण्यासाठी तणनाशकांचा वापर करण्याची कल्पना २००५ च्या उन्हाळ्यामध्ये विचार करताना सुचली. ऊस पिकांनंतर भाताची बैलाच्या पेरणी करण्याऐवजी ओलित करून टोकण केली. भाताचे पीक उत्तम आले. मात्र, उसाची नवीन लागवड करण्यामध्ये अडचण येत होती. त्यावर मात करण्यासाठी सरीच्या तळाशी पॉवर टिलर किंवा बैलाच्या साह्याने तास घालण्यात आला. त्यात उसाची लागवड केली. पूर्वी एकरी केवळ ४० टनांपर्यंत उत्पादन मिळत असे, ते वाढून एकरी ६० टनांवर पोचले. प्रयोग यशस्वी झाला. पाचट कुजून मिळणारे खत आणि खोडक्या कुजून मिळणारे खत यातील फरक स्पष्ट झाला होता.
  • सेंद्रिय खताच्या वापरामध्ये उच्चनीचता असते का, या विचाराला चालना मिळाली. बहुतांश जनावरे जमिनीच्या वर येणाऱ्या हिरवा पाला खातात. त्यामुळे शेणखतांतही त्याचे अंश येणार. थोडक्यात, केवळ शेणखतामुळे जमीन शाश्वत सुपीक होणार नाही, या निष्कर्षापर्यंत पोचलो आहे.
  • मुळासकट तण उपटणे हे चूक आहे. तणाच्या केवळ पाल्याऐवजी मुळे कुजवण्याकडे लक्ष देण्यास सुरवात केली. उसाजवळचा दोन फुटांचा भाग सोडून पाच फुटी पट्ट्यामध्ये तीन ते साडेतीन महिने तणे मुक्तपणे वाढू दिली. ती हाताने कापण्यासाठी मनुष्यबळ लागणार. त्याऐवजी तणनाशकाने जागेवर मारण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे तणे व त्यांची मुळे जागेवर वाळली. मुळे आकसल्याने हवी खेळती राहू लागली. या पोकळ्यामध्ये सूक्ष्मजीवांच्या वाढीलाच चालना मिळाली. त्यातही जितक्या जास्त वनस्पती जनावरांच्या खाण्यात येतील, तितके फायद्याचे ठरते. द्विदल पिकांऐवजी गवतवर्गीय तंतुमय मुळातून चांगले खत निर्माण होत असल्याचे संशोधनही पाहण्यात आले.
  • महत्त्वाचे मुद्दे ः

  • शेती सोपी झाली ः नांगरणी, भांगलणी, तण नियंत्रण नसल्याने मनुष्यबळ कमी लागते. खर्चात बचत होते.
  • सेंद्रिय खत विकत आणावे लागत नाही.
  • केवळ शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी पशुपालन करू नका. कारण त्यातून शाश्वत जमीन सुपीकता मिळतन नाही. दूध व अन्य उत्पादनासाठी पशुपालन करण्याला विरोध नाही.
  • चारही बांधाच्या आत वाढणाऱ्या तणे आणि वनस्पतींचा वापर शाश्वत जमीन सुपीकतेसाठी होऊ शकतो. त्यातही त्यांच्या जमिनीखालील भाग तिथेच कुजतील, याकडे लक्ष द्या.
  • संपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com