अकोला : मागील तीन ते चार दिवसांत पावसाच्या हजेरीमुळे एकीकडे अानंद व्यक्त करण्याची वेळ असताना दुसरीकडे ढगाळ वातावरण व सततच्या ओलसर स्थितीमुळे प्री-मॉन्सून कापूस, कापणीला अालेल्या उडीद पिकाचे अनेक ठिकाणी नुकसान होत अाहे. कपाशीच्या झाडावर लागलेल्या बोंड्या काळ्या पडत असून फुटलेला कापूसही काळवंडला अाहे. उडदाच्या वाळलेल्या शेंगामधून कोंब बाहेर निघू लागले. ज्वारीच्या कणसामध्येसुद्धा किडींचे प्रमाण वाढले असून त्या दाणे फस्त करीत अाहे.
वऱ्हाडात तब्बल १५ दिवसांनंतर पावसाचे अागमन झाले अाहे. गेल्या तीन ते चार दिवसांत ठिकठिकाणी कमीअधिक प्रमाणात चांगला पाऊस होत अाहे. या पावसामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. किमान रब्बीसाठी तरी ‘पाणी पेरणी’ झाली. परंतु, दुसरीकडे याच सततचा पाऊस व ढगाळ वातावारणामुळे विपरीत स्थिती तयार झाली आहे.
मॉन्सूनपूर्व कपाशीच्या पिकांमध्ये बोंडं काळवंडत अाहे. अनेक शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी कापूस वेचणी सुरू करायची वेळ अाली होती. परंतु, कुठे बोंड्या काळ्या पडल्या तर कुठे उमललेला कापूस काळवंडत अाहे. शिवाय उडदाच्या काढणीला अालेल्या पिकाचे नुकसान होत अाहे.