शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग, निर्यातदारांशी जोडावे : विकास दांगट

आधुनिक तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. चक्क प्रयोगशाळेत मांस, अंडी, दूध निर्माण करण्यात यश मिळाले आहे. जगात काय घडतेय याची खिडकी शेतकऱ्यांना उघडून देण्याचा प्रयत्न ‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकातून केला आहे. -आदिनाथ चव्हाण, संपादक, अॅग्रोवन
‘अॅग्राेवन’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन एस.व्ही. ग्रूप ऑफ कंपनीजचे संचालक विकास दांगट यांच्या हस्ते कंपनीच्या अन्नप्रक्रिया प्रकल्पस्थळी रविवारी (ता. १५) झाले
‘अॅग्राेवन’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन एस.व्ही. ग्रूप ऑफ कंपनीजचे संचालक विकास दांगट यांच्या हस्ते कंपनीच्या अन्नप्रक्रिया प्रकल्पस्थळी रविवारी (ता. १५) झाले

पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी असणारा तांदूळ, मधुमेही रुग्णांनाही चालू शकेल अशी साखर आणि ग्लुटेनचे प्रमाण ८ टक्क्यांनी कमी असणारा गहू विकसित करण्यात यश मिळाले आहे. आरोग्यदायी व सत्त्वयुक्त अन्न ही खूप मोठी बाजारपेठ आहे. त्यादृष्टीने छोट्या शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग व निर्यातदारांशी थेट जोडण्याची गरज आहे, तरच शेती शाश्वत होईल,’’ असे मत एस. व्ही. ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक विकास दांगट यांनी व्यक्त केले.  ‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते रविवारी (ता. १५) कंपनीच्या अन्नप्रक्रिया प्रकल्पस्थळी झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, सरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले, वितरण व्यवस्थापक चंद्रशेखर जोशी, एस. व्ही. ग्रुपच्या संचालक वैशाली दांगट, इंग्लंडमधील उद्योजक मॉॅटी व्होरा आदी उपस्थित होते.    ‘‘देशाचा जीडीपी वाढवायचा असेल तर कृषी निर्यात वाढल्याशिवाय पर्याय नाही. स्वयंचलित वाहन उद्योग व इतर उद्योगांची पीछेहाट होत असून, भविष्यात शेती आधारित उद्योगच प्रमुख स्थानावर असतील,’’ असे दांगट म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे शेतीमालाची टिकवणक्षमता वाढली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना एकात्मिक साखळीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग, निर्यादारांशी थेट जोडले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले असून, शेतकरीही अडचणीत आले आहेत. त्यामुळे पीक संरक्षणासाठी जैविक उपाय योजनांवरच लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही ते म्हणाले.  माध्यमांनी केवळ समकालीन विषयच हाताळून भागणार नाही, तर भविष्यात कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल याचेही दिशादर्शन करण्याची गरज आहे, असे आदिनाथ चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘भविष्यात नेमके काय येऊ घातलेय याचे भान सध्या शेतकरी समाजाला आणि धोरणकर्त्यांनाही नाही. आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या तंत्रज्ञानामुळे शेतीचा सगळा पटच बदलून जाणार आहे. तसेच, रोजगारनिर्मितीच्या संदर्भात अनेक प्रश्नही निर्माण होणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. चक्क प्रयोगशाळेत मांस, अंडी, दूध निर्माण करण्यात यश मिळाले आहे. जगात काय घडतेय याची खिडकी शेतकऱ्यांना उघडून देण्याचा प्रयत्न ‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकातून केला आहे.’’ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नव्या जगाचे भान देण्यासाठी हा दिवाळी अंक उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  प्रमोद राजेभोसले यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.  भविष्यातील शेतीचा वेध भविष्यातल्या शेतीचे नेमके स्वरूप आणि रूपडे कसे असेल ही यंदाच्या ‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाची थीम आहे. क्लायमेट चेंज आणि तंत्रज्ञानातील अचाट प्रगती यामुळे शेतीचा सगळा पटच बदलू पाहत आहे. त्यात शेतकऱ्याचे स्थान, नवी आव्हाने, देश-विदेशांतील घडामोडी, राजकीय- सामाजिक पातळीवर उमटणारे पडसाद, पर्यावरणाचे प्रश्न आणि या साऱ्यांना सामोरे जाण्यासाठी नेमकी भूमिका काय असावी, याचा वेध या अंकात घेतला आहे. दोन दिवसांत हा अंक राज्यात सर्वत्र उपलब्ध होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com