उत्पादन खर्चाचं गणित सांभाळण्यावर भर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

लातूर : पीक कोणतंही असो, उत्पादन खर्च आणि मिळकतीचं गणित जुळविण्याविषयी शेतकरी जागरूक झाल्याचं चित्र लातूर जिल्ह्यात पहायला मिळते. जिल्ह्यात सोयाबीन आणि तुरीचं क्षेत्र सर्वाधिक. त्याचं बियाण घरचंच वापरण्यावर शेतकऱ्यांचा भर. त्यामुळं पाऊस आल्यावर खरिपाचं खत, बियाणं खरेदीच्या कामाला जोमाने लागण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे.  तुरीचं आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात तुरीच्या क्षेत्रात घटीचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. किमान दहा ते पंधरा टक्‍क्‍यांपर्यंत तुरीच्या क्षेत्रात होणारी घट सोयाबीनचे क्षेत्र वाढून भरली जाईल. शिवाय सोयाबीनच्या वाणात काय पर्याय असू शकतो याची चाचपणी लातूर जिल्ह्यातील शेतकरी करतो आहे.  लातूर जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख २५ हजार हेक्‍टर आहे. गतवर्षी प्रत्यक्षात ५ लाख ८९ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली होती. सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मूग व काही प्रमाणात कपाशी आदी लातूर जिल्ह्यातील खरिपाची महत्त्वाची पिकं. 

नांदेडला लागून असलेल्या भागातच काय ती कपाशीची लागवड केली जाते. उर्वरित संपूर्ण जिल्ह्यात सोयाबीन व तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र जास्त असल्याने घरचेच बियाणे वापरावर शेतकऱ्यांचा कल असतो. किमान ५० ते ६० टक्‍क्‍यांपर्यंत सोयाबीन व तुरीचे बियाणे घरचेच वापरले जाते. येत्या खरिपासाठी जिल्ह्याच्यावतीने १ लाख ११ हजार ११८ क्‍विंटल सर्वच प्रकारच्या बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक १ लाख ३६० क्‍विंटल सोयाबीनच्या बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. मागणीच्या तुलनेत ५५ हजार क्‍विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. 

गतवर्षीचे शिल्लक असलेले व येत्या खरिपासाठीच्या आवंटनानुसार जवळपास २२ हजार टन खताची उपलब्धता झाली आहे. बियाणे आणि खताची उपलब्धता संथगतीने होण्यामागे माॅन्सूनच्या सक्रीयतेची प्रतीक्षा हे एकमेव कारण असल्याचे शेतकरी व कृषी विभागाचे सूत्र सांगतात. 

शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रिया, पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जल भूमी अभियानाच्या माध्यमातून जागृतीचे काम केले जात आहे. सामाजिक संस्था, शासन व प्रशासनाच्या माध्यमातून येत्या पावसाळ्यात छतावरील पाण्याचे पुनर्भरण, बोअर, विहीर पुनर्भरण, वृक्ष लागवड, सांडपाण्याचे पुनर्भरण व पुनर्वापर या विषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

वाणाचा व पर्यायाचा शोध सोयाबीनचे क्षेत्र जास्त असलेल्या लातूर जिल्ह्यात ३३५ या सोयाबीनच्या वाणाची पेरणी सर्वाधिक असते. या सोयाबीनच्या वाणाला काही पर्याय मिळू शकतो का याची चाचपणी शेतकरी करताहेत. १० ते १५ टक्‍के जे तुरीचे क्षेत्र घटणार आहे त्या क्षेत्रात सोयाबीनचीच पेरणी होणार असल्याने सोयाबीनच्या सर्वसाधारण क्षेत्रात येत्या खरिपात वाढ होणार हे स्पष्टच आहे. पर्यायी वाणांच्या शोधासोबतच शेतीपूरक उद्योग, फळबाग आदी विषयाची चौकशी करून त्याची सुरवात करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतो आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com