खानदेशात सोयबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः कापूस पिकात मागील हंगामात आलेला तोटा आणि सोयाबीनचे टिकून असलेले दर लक्षात घेता यंदा खानदेशात सोयाबीनचे क्षेत्र वाढेल, असे संकेत आहेत. सुमारे ४० ते ४२ हजार हेक्‍टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञ, शेतकरी यांनी व्यक्त केला आहे. 

मागील हंगामात पाऊस सरासरीएवढा नव्हता. पावसाच्या लहरीपणाचा फटका सर्व पिकांना बसला. त्यानंतर परतीच्या पावसामुळे कापूस व कडधान्य, गळीत धान्यवर्गीय पिके कशीबशी तगली. उत्पादन जेमतेम आले. पण उडीद, मुगाला दर नव्हते. कापसावर गुलाबी बोंड अळी आली. खानदेशात जवळपास आठ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. यात सुमारे दोन लाख हेक्‍टर क्षेत्र पूर्वहंगामी कापसाखाली होते.

अर्थातच खानदेशात कापूस प्रमुख पीक असले, तरी कापसाच्या लागवडीत मागील हंगामाच्या तुलनेत यंदा सुमारे १० ते १३  टक्के घट निश्‍चित येईल. ही घट तापी नदीकाठानजीकच्या गावांमध्ये असणार आहे. याच भागात सोयाबीनची लागवड अधिक होईल. कारण काळ्या कसदार जमिनीत सोयाबीनची चांगली वाढ असते. ही जमीन पाण्याचा फारसा निचरा होऊ देत नसल्याने पावसाने ताण दिल्याच्या काळात सोयाबीनवर काळ्या कसदार जमिनीत फारसा परिणाम होत नाही. 

उडीद, मूग व तुरीची विपणन व्यवस्था व्यवस्थित नव्हती. कवडीमोल दरात शेतकऱ्यांना तूर व इतर कडधान्याची विक्री करावी लागली. सोयाबीनचे दर मागील हंगामात सुरवातीला कमी होते. आर्द्रतेच्या कारणाने दर कमी दिले जात होते. परंतु जानेवारीत चांगली दरवाढ झाली. दर ४००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले.  सोयाबीनचे पीक घेतल्यावर त्यात नंतर गहू व मक्‍याचे चांगले उत्पादन घेता येते. अर्ली मका किंवा कांद्याचे पीकही जोमात येते. सोयाबीनची काड व भुसा हा जमिनीत गाडल्यास त्याचा खत म्हणूनही उपयोग होतो, असे शेतकरी मानतात. या सर्व बाबी लक्षात घेता खानदेशात यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढेल आणि कापसाचे क्षेत्र कमी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

खानदेशात जळगाव जिल्ह्यात दरवर्षी सुमारे २८ ते २९ हजार हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी होते. यंदा ही पेरणी सुमारे ५० ते ५५ हेक्‍टरवर जाऊ शकते. धुळ्यातही सुमारे आठ ते १० हजार हेक्‍टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढेल. तर नंदुरबारमध्येही सुमारे सात ते आठ हजार हेक्‍टरने सोयाबीनची पेरणी वाढू शकेल. तापी काठावरील मुक्ताईनगर, रावेर, यावल, जळगाव, चोपडा, शहादा, नंदुरबार, शिंदखेडा, शिरपूर आणि गिरणा काठावरील पाचोरा, धरणगाव भागातही सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याचे सांगण्यात आले. 

आमच्या भागात कापूस पिकाकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असला तरी सोयाबीनचे क्षेत्र वाढू शकते. कारण सोयाबीननंतर मका किंवा गहू, कांदा ही पिके घेता येतात. चांगले बेवड मिळते. कापसाबाबत यंदा नकारात्मक वातावरण आहे.  - मानक पटेल, शेतकरी, शहादा, जि. नंदुरबार

कापूस पिकाला पर्याय नसल्याने कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी होणार नाही. परंतु ज्यांच्याकडे मुबलक जलसाठा आहे, ते शेतकरी कापसाऐवजी सोयाबीनला पसंती देतील. कारण सोयाबीनचे दर टिकून होते. तसेच केळीची लागवडही वाढत आहे.  - अनिल पाटील, शेतकरी, सावखेडासीम, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com