सातारा ः जिल्ह्यातील अनेक भागांना गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे केळी, ऊस, बाजरी मका आदी पिके कोलमडून पडली आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१५) सकाळी आठपर्यंत सरासरी १७.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून दुष्काळी तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढले. गुरुवारीही फलटण, कोरेगाव, खंडाळा, माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. दुष्काळी तालुक्यात सरासरी दहा मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मागील चार दिवसांत फलटण तालुक्यास पावसाने सर्वाधिक झोडपले.
वादळी वाऱ्यामुळे बाजरी, मका व ऊस पीक भुईसपाट झाले असून या बारामतीहून फलटणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सोमंथळी येथील पूल वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. माण, खटाव, कोरेगाव व खंडाळा तालुक्यात पिके पडली आहेत. पश्चिमेकडील वाई तालुक्याचा अपवाद वगळता सातारा, कऱ्हाड, पाटण, जावली व महाबळेश्वर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.
कऱ्हाड तालुक्यातील बेलवडे व तासवडे परिसरात वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; तसेच अनेक ठिकाणचे वृक्ष उन्मळून पडले आहेत. या परिसरातील केळीच्या बागा; तसेच उसाचे पिक कोलमडून पडल्याने मोठे नुकसान झाले. सलग पाऊस सुरू असल्याने शेतात साचले पाणी; तसेच राहत असल्यामुळे पिके कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.
तालुकानिहाय पाऊस (मिमी) सातारा १०.१, जावली १०.१, पाटण १.७, कऱ्हाड २.५, कोरेगाव २३.४, खटाव ९.६, माण १५, फलटण ४९.३, खंडाळा ३२.१, वाई २२.६, महाबळेश्वर २०.१.