मराठवाड्यात वादळासह पावसाचा पुन्हा तडाखा

पूर्णा, जि. परभणी ः तालुक्‍यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे माखणी शिवारातील केळी आणि आंबा फळबागाचे नुकसान झाले.
पूर्णा, जि. परभणी ः तालुक्‍यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे माखणी शिवारातील केळी आणि आंबा फळबागाचे नुकसान झाले.

औरंगाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत रविवारी (ता. १५) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान झाले. काही ठिकाणी वादळामुळे घरांवरील पत्रे उडाले. काही ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडल्याने नुकसान झाले. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलका आणि मध्यम पाऊस झाला. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्‍यात चार ठिकाणी वीज कोसळली. त्यामध्ये पाच बैल आणि दोन म्हशी दगावल्या. यामध्ये चिंचोली जहांगीर येथे दोन ठिकाणी वीज पडून तीन बैलांचा मृत्यू झाला. बेगडा येथे एका ठिकाणी वीज कोसळून एक बैल तर बेळंब येथेही एका ठिकाणी वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

उमरगा तालुक्‍यात १५ गावांत अवकाळी पाऊस झाला.  तुळजापूर तालुक्‍यातील अपसिंगा  येथे वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून घरांचे नुकसान झाले. शनिवारी (ता. १४) रात्रीही अपसिंगासह बोरी, कात्री, कामठा, मोर्डा या गावांना वादळाचा फटका बसला होता. काही ठिकाणी झाडे घरांवर पडली, कुठे विजेचे खांब पडले. या वादळात सहाजण जखमी झाले. लातूरमधील सारोळा (ता. औसा) येथे अवकाळी पावसामुळे रियाज शेख यांच्या दोनशे कोंबड्या दगावल्या, शिवाय अर्धा एकर आंबा बागेचेही प्रचंड नुकसान झाले. लातूर जिल्ह्यातील हणमंतवाडी, चिंचोली, चनाची वाडी, चांदोरी येथे वीज पडून प्रत्येकी एक प्रमाणे चार जनावरे दगावली. 

जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्‍यात जांब समर्थ परिसरात रात्री साडेसात ते आठ वाजेदरम्यान अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसासह आलेल्या जोऱ्याच्या वाऱ्यामुळे आंब्याचे नुकसान झाले. काढलेला कांदा भिजला, तर इतरही काही काढणीला आलेल्या पिकांना पावसाचा फटका बसला. सोमवारीही (ता. १६) अनेक भागांत ढगाळ वातावरण व ऊन-सावलीचा खेळ दुपारी तीनपर्यंत सुरू होता. 

नांदेड, परभणी, हिंगोलीत नुकसान नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात रविवारी (ता.१५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अनेक तालुक्‍यात वादळी वारे, मेघगर्जनेसह, गारांचा पाऊस झाला. यामुळे शेकडो एकरवरील केळी, आंबा आदी फळबागांसह काढणी केलेल्या हळदीचे भिजून नुकसान झाले. वीज कोसळून जनावरे दगावली.

रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, हदगाव, माहूर, लोहा, कंधार, नायगांव आदी तालुक्‍यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. हदगाव तालुक्‍यातील काही गावशिवारात गारपीट झाली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली, वसमत, सेनगाव तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले.

परभणी, पूर्णा तालुक्‍यातील, कात्नेश्वर, माटेगाव, लक्ष्मीनगर, कौडगाव, माखणी परिसरातील अनेक गावशिवारात विजांच्या कडकडात झालेल्या पावसाने केळी, आंबा, मोसंबी, संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले.

पूर्णा तालुक्‍यातील माखणी शिवारातील जनार्दन आवरगंड, सुदाम दुधाटे यांच्या आंबा, केळी बागांचे नुकसान झाले. वीज कोसळून धानोरा काळे येथील शिवाजी काळे यांचा बैल, तर आहेरवाडी येथील सुनील खंदारे यांची गाय दगावली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com