जळगाव : धुळे व जळगाव जिल्ह्यांत हंगामी पैसेवारी जाहीर झाल्यानंतर ही पैसेवारी जाहीर करताना धरसोड वृत्तीने व अतांत्रिक पद्धतीने काम झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
धुळे तालुक्यातील अनेक मोठ्या गावांना हंगामी पैसेवारीमध्ये ५० पैशांच्या आतील गावांच्या यादीत स्थान नसल्याने शेतकऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
कापडणे भागातील शेतकऱ्यांनी यासंबंधी थेट प्रशासनातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून ऐनवेळी आलेल्या पावसावरून आकडे काढू नका, असे सांगून आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर, बोदवडमध्ये पावसाने सातत्याने हुल दिली. कपाशी, ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे आतोनात नुकसान झाले. तरीही या तालुक्यांमधील एकही गावाची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत कशी नाही, असा प्रश्न ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
हंगामी पैसेवारी ही अंतिम नाही, पण पुढे अंतिम पैसेवारी तयार करताना हंगामी पैसेवारीमधील गावांची यादी, माहिती ही गृहीत धरली जाते. परंतु सुधारित पैसेवारी व नंतर अंतिम पैसेवारी करताना वास्तव लक्षात घेतले जावे. यंदा जून, जुलै व ऑगस्ट या महिन्यात पाऊस कुठेच नव्हता. धुळे, जळगावात सारखीच स्थिती होती. आता काही भागात पाऊस असतो तर काही ठिकाणी थेंबही नाही. आता पाऊस येऊन लाभ होणार नाही.
साक्री, बोदवड, भुसावळात पाऊस या महिन्यात आला, पण त्यानेही नुकसान झाले. पूर्वहंगामी कपाशी लोळली, कैऱ्या सडून, बोंडे काळवंडत आहेत, अशा स्थितीतही दुष्काळी स्थितीच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवायचा प्रयत्न करू नये, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.