महापुराचा वाढता विळखा

२०१९ हे वर्ष संपूर्ण देशासाठी महापुराचे वर्ष म्हणून इतिहासात नोंदले जाईल. देशाचा उत्तरेकडील भाग म्हणजे जम्मू आणि काश्‍मीर आणि दक्षिणेकडील केरळपर्यंत पुराचे अक्राळविक्राळ रूप अनुभवावे लागले. पश्‍चिमेकडील राजस्थान आणि गुजरात या तुलनेने कमी पावसाच्या प्रदेशाचीपण यातून सुटका झाली नाही. दक्षिण महाराष्ट्र तर या वर्षी अभूतपूर्व पूर अनुभवत आहे.
संपादकीय.
संपादकीय.

निसर्गापुढे माणूस हतलब होतो आणि पुराचे रौद्र रूप, त्याची विध्वंसक ताकद, मानव व प्राणिजीवनावर होणारे आघात आदींचा मूक साक्षीदार होण्यापलीकडे काहीही करता येत नाही. अशीच काही कारुण्यमय व केविलवाणी परिस्थिती जुलै, ऑगस्ट २०१९ च्या कोल्हापूर व सांगली परिसरातील कृष्णा- पंचगंगा नदीच्या पुराने केलेली होती. जवळपास १५ दिवस या दोन मोठ्या शहरांचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग आणि सभोवतालची अनेक गावे आणि वस्त्या पुराच्या पाण्याखाली राहिल्या. शेकडो माणसे आणि हजारो पाळीव जनावरे पुरामध्ये वाहत जाऊन मृत्युमुखी पडली. इमारतीचे, मालमत्तेचे, शेती आणि त्यावरील पिकांचे अपरिमित नुकसान झाले. नुकसानीचा अंदाज बांधणेसुद्धा मानवी आकलनाच्या पलीकडची बाब ठरते. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात नुकसानीचा अंदाज १० हजार कोटींच्या पुढे जात आहे. सांगली शहराचीपण तीच स्थिती आहे. या दोन जिल्ह्यांतील जवळपास ८०० गावांना पुराचा फटका बसून दोन लाख कुटुंबांतील आठ लाखांपेक्षा जास्त लोकांना पुरामुळे स्थलांतरित व्हावे लागले. ऊस, भाजीपाला, फळबाग व इतर अन्नधान्याखाली असलेल्या लाखो हेक्‍टर शेतजमिनी व उभे पीक उद्‍ध्वस्त झाले. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून वेधशाळेकडून अतिवृष्टीचे इशारे दिले जात होते. मनुष्यस्वभाव नेहमीसारखा पुराचा अंदाज बांधत असतो. सहजपणे झालेला हा काणाडोळा अनेकवेळा मानवी जीवनाला भयावह परिस्थितीपुढे आणून उभा करतो. 

२०१९ हे वर्ष संपूर्ण देशासाठी महापुराचे वर्ष म्हणून इतिहासात नोंदले जाईल. देशाचा उत्तरेकडील भाग म्हणजे जम्मू आणि काश्‍मीर आणि दक्षिणेकडील केरळपर्यंत पुराचे अक्राळविक्राळ रूप अनुभवावे लागले. पश्‍चिमेकडील राजस्थान आणि गुजरात या तुलनेने कमी पावसाच्या प्रदेशाचीपण यातून सुटका झाली नाही. पूर्वेकडे कोलकाता शहर पुराच्या कचाट्यात सापडले. देशाचा कोणताही भाग अतिवृष्टी आणि महापुरापासून मुक्त राहिला नाही. याला अपवाद ठरला तो मध्य महाराष्ट्राचा पट्टा, ज्यामध्ये मराठवाडा, पश्‍चिम विदर्भ, सोलापूर आणि पश्‍चिम महाराष्ट्राचा पूर्वेकडील प्रदेश इत्यादींचा समावेश होतो. गोदावरी नदीवरील पैठणजवळील जायकवाडी वगळता मराठवाड्यातील माजलगाव, मांजरा, तेरणा इत्यादी डझनवार मोठे तलाव पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात प्रवेश करेपर्यंत तळ गाठूनच राहिले. अशीच गत पश्‍चिम विदर्भ आणि सोलापूर महिन्याच्या मध्यावर पुराने थैमान घातले होते, तर त्याचवेळी म्हसवड, दहिवडी, विटा या परिसरात गुरांच्या छावण्यांत हजारो जनावरे चाऱ्याची आणि पाण्याची वाट पाहात असलेले चित्र दिसले. योगायोगाने पुरंदर भागातील नाझरे जलाशय १० ते १२ वर्षांनंतर भरल्याची बातमी कानावर आली; पण लगतच्या पाणलोटातील इतिहासकालीन मस्तानी तलाव कोरडाच राहिला. पाऊस किती लहरी आणि बेभरवशाचा असू शकतो, याचे २०१९ हे वर्ष टोकाचे उदाहरण आहे. 

अशा विपरीत परिस्थितीला, निसर्गाची काळजी न घेता बेफामपणे होणारा मानवी व्यवहारच कारणीभूत ठरत आहे, असे जाणकारांचे मत आहे. यातूनच जागतिक तापमानात बदल, हरितगृह वायू परिणाम आदींच्या विळख्यात मानवी जीवन सापडलेले आहे. अशा परिस्थितीला समर्थपणे तोंड देणे आणि होणाऱ्या आघाताची तीव्रता कमी करणे इतकेच मानवाच्या हातात राहिलेले आहे. २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये मोठा पूर आला. दरडी कोसळल्या आणि मोठी मनुष्यहानी झाली. २०१५ मध्ये झेलम नदीला पूर आला आणि श्रीनगर शहर आणि परिसर जलमय झाला. २०१५ च्या डिसेंबरमध्ये चेन्नई शहराची अवस्था अशीच झाली. २०१६ ला कर्नाटकमधील बेंगळुरू शहराची अतिवृष्टीमुळे दैना झाली आणि २०१७ च्या पावसाळ्यात मुंबईचा परिसर पुनश्‍च एकदा २६ जुलै २००५ च्या पुराची आठवण करून देणारा ठरला. २०१८ मध्ये केरळ राज्याची पुरामुळे वाताहात झाली. २०१९ मध्ये संपूर्ण देशच पूरमय झालेला आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये पूर्व विदर्भातील गडचिरोली, भामरागड या भागात अतिवृष्टीमुळे पुराने थैमान घातले होते. उत्तर भारतातील यमुनेमध्ये वाहणाऱ्या पुराची तीव्रता आठ लक्ष घन फूट प्रतिसेकंदाच्या पुढे गेली. दिल्ली या राजधानीच्या शहराला पुराचे धक्के बसले. १७ व १८ ऑगस्ट २०१९ ला पंजाब राज्यात अतिवृष्टीमुळे सतलज नदीला पूर आला आणि भाक्रा या विशाल जलाशयातील पाणी सोडावे लागल्याचे कळले. केरळमधील २०१८ च्या पुरास नद्यांवरील वरच्या भागातील धरणांमधून येणारा विसर्ग कारणीभूत झाला, अशी चर्चा जनमानसात काही मंडळींकडून करण्यात आली. 

अतितीव्र, ढगफुटीसदृश पाऊस जास्त कालावधीसाठी (१० ते १५ दिवस) पडू लागल्यास जलाशयाची पूर साठवून ठेवण्याची क्षमता आणि त्याद्वारे पुराची तीव्रता कमी करण्याची ताकद अपुरी पडते. जलाशये दोन- तीन दिवसांत पूर्ण पातळीपर्यंत भरून ओसंडून वाहण्यास सुरवात करतात. पडणाऱ्या पावसाची तीव्रता कमी असल्यास धरणावरील दरवाजाच्या मदतीने पुराची तीव्रता कमी करून जलाशयामध्ये पूर साठवून ठेवण्याच्या कालावधीमध्ये थोडीशी वाढ होऊ शकते. हा अल्पसा कालावधी नदीकाठच्या लोकांना येणाऱ्या संभाव्य पुराच्या धोक्‍याची कल्पना देऊन सावध करण्यासाठी व प्रसंगी मौल्यवान मालमत्तेचे संरक्षण करून सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यास उपयोगी पडतो. ढगफुटीच्या पावसाचा कालावधी आणि ढगफुटी होणारे क्षेत्र हे मर्यादित असते. धरणाच्या खालच्या भागातील मुक्त क्षेत्रात निर्माण होणारा पूर, धरणाच्या वरच्या भागातील पाणलोटात निर्माण होणाऱ्या पुरापेक्षा खूपच जास्त असतो. अतिवृष्टी धरणाच्या क्षेत्रात आणि धरणाखाली मुक्त क्षेत्रातपण होत राहाते. अशीच काहीशी परिस्थिती कोल्हापूर आणि सांगलीच्या २००५ व २०१९ च्या महापुराबाबत कारणीभूत झाली आहे. अल्पकाळातील ढगफुटी परवडली; पण विस्तृत क्षेत्रावर दीर्घकालीन होणारी अतिवृष्टी ही जास्त हानी पोचविणारी असते. असे म्हणत असताना ढगफुटीच्या विध्वंसक परिणामाकडे डोळेझाक करण्याचा हेतू मुळीच नाही. निसर्गाने निर्माण केलेली अशी हतलब परिस्थिती झेलण्यासाठी मानव असमर्थ होतो. दुरून पाहणारी मंडळी मात्र या परिस्थितीला कोणाला तरी कारणीभूत ठरवण्याचा प्रयत्न करत असतात. मनुष्य स्वभावाप्रमाणे हे स्वाभाविकच आहे. 

डॉ. दि. मा. मोरे ः ९८२२७७६६७० (लेखक महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com