घन लागवड तंत्राने वाढवू उत्पादकता

राज्यात गेल्या पंधरा वर्षांपासून मी आंब्यामध्ये घन, अतिघन लागवडीचे थेट शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग सुरू केले आहेत. त्यामध्ये पूर्वी एकरी चाळीस आंबा झाडे बसत होती, ती संख्या आता ६६६ पर्यंत नेऊन त्यात आधुनिक लागवडीची पद्धत, छाटणी, पिकास संजीवकाचा वापर करून उत्पादकता वाढीत यश मिळवले आहे.
agrowon editorial article
agrowon editorial article

जागतिक स्तरावरील वेगवेगळ्या देशांचा विचार केल्यास आपली फळे व भाजीपाल्याची उत्पादकता अतिशय कमी आहे. मोसंबीची आपली उत्पादकता हेक्‍टरी आठ टन आहे, तर दक्षिण आफ्रिकेची हीच उत्पादकता ७० टन आहे. इस्राईलची उत्पादकता ४० टन आहे. आंब्याची आपली उत्पादकता हेक्‍टरी आठ टन आहे. महाराष्ट्राची तर ही उत्पादकता सव्वाचार टनच आहे. मेक्सिकोची आंबा उत्पादकता ४० टन, इस्राईलची ३५ टन, तर दक्षिण आफ्रिकेची ४५ टन आहे. अशाच प्रकारे भाजीपाल्यामध्ये सुद्धा आपल्यापेक्षा परदेशातील भाजीपाल्याची उत्पादकता तीन ते चार पट जास्त आहे. आपल्याकडे उत्पादकता वाढीसाठी तंत्रज्ञान, धोरणे तसेच शेतीसाठी पाणी व इतर संसाधने उपलब्ध करणे त्याचबरोबर मार्केटिंग आणि निर्यातीच्या सुविधेत आमूलाग्र सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. फळपिकांची हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी जे आता नवीन तंत्रज्ञान आलेले ते म्हणजे अतिघन लागवड तंत्र हे होय. 

राज्यात गेल्या पंधरा वर्षांपासून मी आंब्यामध्ये घन, अतिघन लागवडीचे थेट शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग सुरू केले आहेत. त्यामध्ये पूर्वी एकरी चाळीस आंबा झाडे बसत होती ती संख्या आता ६६६ पर्यंत नेऊन त्यात आधुनिक लागवडीची पद्धत, छाटणी, पिकास संजीवकाचा वापर करून अधिक फळधारणा, निर्यात योग्य फळाची मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळविणे, फळाचा आकार मोठा करणे या बाबीत यश मिळवले आहे. जेणेकरून या पद्धतीने आंब्याची उत्पादकता २५ ते ३० टन प्रतिहेक्टरपर्यंत घेणे आता शक्य झाले आहे. त्याचबरोबर मोसंबीमध्ये सहा बाय सहा मीटर ऐवजी तीन बाय सहा मीटरवर लागवड करून हेक्‍टरी ३० ते ३५ टन उत्पादन सहज घेणे शक्‍य झाले आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या शेतावर अतिघन लागवडीचे प्रयोग आता जांभूळ, सीताफळ, पेरू तसेच डाळिंबामध्ये सुद्धा यशस्वी झाले आहेत. आणि त्यामुळे या सर्व फळाच्या उत्पादकतेत सुद्धा अडीच ते चार पट वाढ घेणे शक्य झाले आहे.

भाजीपाल्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे व्हर्टिकल फार्मिंग, हरितगृहातील शेती, मातीविना शेती अशा नवीन संकल्पना वापरात येऊ लागल्या आहेत. या तंत्रज्ञानामुळे फळभाज्यांचे मुख्यतः टोमॅटो, ढोबळी मिरची (कॅप्सिकम) काकडी यांचे उत्पादन चार ते पाच पट जास्त घेणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे पोखराअंतर्गत आता शासकीय योजनेत शेतकऱ्यांना हरितगृह मोठ्या प्रमाणात मिळणे शक्य झाले आहे.

निर्यात फळे व भाजीपाला निर्यातीबाबतीत मात्र आपला देश जगामध्ये १७ व्या क्रमांकावर आहे, तर चीन हा प्रथम क्रमांकावर आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आपण निर्यातीमध्ये खासगी निर्यातदार प्रमोट करण्यात फारसे यशस्वी झाल्याचे दिसत नाही. त्यांना शासनाच्या धोरणांमध्ये वेगवेगळे प्रमाणपत्र घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी नियमाच्या मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. त्याचबरोबर अपेडा दिल्ली सारखी निर्यातीसाठी प्रमोट करणारी संस्थादेखील फारशी कार्यक्षम असल्याचे दिसत नाही. निर्यातदारांना अनुदानसुद्धा योग्य पद्धतीने वेळेत मिळत नाही. आंब्याचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास गेल्या पंधरा वीस वर्षांपासून आपली निर्यात ४० हजार ते ६० हजार टनांच्या आसपासच राहिलेली आहे. त्याच धरतीवर पाकिस्तानची निर्यात मात्र गेल्या आठ दहा वर्षांत चार पट वाढलेली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना विमान भाड्यात दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचा अंतर्भाव दिसून येतो. आपल्याकडेही केंद्राने आता २०१८ मध्ये खास कृषी निर्यात धोरण जाहीर करून २०१९ मध्ये पुणे येथे त्याचे उद्‍घाटन झाले. या धोरणांतर्गत महाराष्ट्र हे देशाचे मुख्य निर्यात केंद्र बनवणे हा हेतू असून, त्यासाठी राज्य पातळीवर खास समितीसुद्धा गठित करण्यात आली आहे. आपल्या राज्यामध्ये कृषिमाल निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ सुद्धा मोलाची भूमिका बजावत आहे.

महाराष्ट्रातून फळभाज्यांच्या निर्यातवृद्धीसाठी मुख्यतः मुंबई व्यतिरिक्त औरंगाबाद, नागपूर विमानतळावर सुद्धा निर्यात कार्गोची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आहे. त्याद्वारे पण राज्यातून फळे व भाज्यांची निर्यात वाढू शकते. सध्या ज्या फळे व भाजीपाल्यांची निर्यात होते ती मुंबईतूनच मोठ्या प्रमाणात होते. मुंबईच्या आजूबाजूच्या शे-दोनशे किलोमीटरच्या परिघातूनच नाशवंत शेतीमाल तिथं नेता येऊ शकतो. दूरचा माल चांगल्या परिस्थितीत तेथे पोहोचणे अवघड होते. याचबरोबर फळे भाज्यांसाठी देश पातळीवर वेगवेगळ्या पॉकेटमध्ये फार्म-टू-प्लेट शीत साखळी निर्माण करणे अगत्याचे ठरते. त्यामध्ये फळे व भाजीपाल्यामधील कीटकनाशकांच्या अंश मर्यादेमध्ये ठेवून सुरक्षित व ताजे फळे व भाजीपाला ग्राहकांना मिळू शकेल. मधल्या दलालांची नफेखोरी कमी होऊ शकेल आणि या हाताळणी प्रक्रियेतील जे नुकसान होते ते नुकसान निदान पन्नास टक्क्यांपर्यंत तरी कमी करणे शक्य होईल यात शंका नाही. हीच शीतसाखळी पुढे जागतिक शीतसाखळी म्हणून निर्माण करणे अगत्याचे ठरेल.

अशाच प्रकारे शाश्‍वत उत्पादन वाढ, आरोग्यासाठी सुरक्षित फळे व भाजीपाला उत्पादन, गरजेप्रमाणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब, निर्यात वाढ, जागतिक शीतसाखळी निर्माण करणे, काढणीनंतर नाशवंत शेतीमालाचे नुकसान कमी करणे आणि पूर्णतः प्रक्रिया व मूल्यवृद्धी करणे या बाबींचा योग्य वापर करून आपण मानव जातीस मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळांची उपलब्धता करून देऊया. आहारात फळे व भाजीपाला यांचे महत्त्व पटवून देऊन जनतेची प्रतिकारशक्ती वाढवून सध्या जगास   भेडसावत असणाऱ्या या कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करूया!

डॉ. भगवानराव कापसे  ९४२२२९३४१९ (लेखक फळबाग तज्ज्ञ तसेच  गट शेतीचे प्रणेते आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com