आजकाल शिकलेल्या लोकांना मधमाशी काय करू शकते, याचं महत्त्वच राहिलेलं नाही. मात्र, शेतीत अडचण आली की मग आपण सर्व पर्याय शोधत असतो. अगदी कालचीच गोष्ट आहे, माझा मित्र बंड्या याने सांगवी गावात चार एकर जमीन घेतली असून, गेली अनेक वर्षे शेती हा व्यवसाय म्हणून करीत आहे. यात त्याने पॉलिहाउस करून आधुनिक शेती करण्यास सुरवात केली. अर्थात, शेती घेतली त्या वेळी शेतीच्या बांधावर बोर, बाभूळ, जांभूळ, आंबा, शेवगा, भोकर, रुई अशी विविध झाडं होती; परंतु इतरांचं ऐकून त्याने ही सर्व झाडं तोडली आणि जास्त पाणी पिणारी नारळाची झाडं बांधावर लावली. असं करताना शेतीची जैवविविधता झपाट्याने कमी झाली, हे त्याच्या लक्षातच आलं नाही. आता खरी गंमत अशी आहे, परवा त्याचा फोन आला, पॉलिहाउसमध्ये काकडी लावली आहे. खूप मोठी पिवळी फुलं येतात आणि जळून जाताहेत. शिवाय, काकडी अंगठ्याएवढीच राहतेय, काय करावं लागेल? मग आम्ही प्रत्यक्ष जाऊन चर्चा करून ठरवलं, की या काकडीचं परागीभवन होत नाही. कारण या फुलाच्या आत शिरून परागीभवन कोणीही करत नाही. त्याचे पराग फुटत नाहीत आणि मग फुलं जळून जात आहेत. यावर उपाय म्हणजे मधमाश्या परागसिंचनाचं काम करू शकतात, असं त्याला सांगितलं. त्यानंतर बंड्याने खटपट करून मधमाश्यांच्या पेट्या अकलूजवरून घेऊन आला. त्याच रात्री दोन पेट्या पॉलिहाउसच्या तोंडाजवळ ठेवल्या. सकाळी लवकर मधमाश्यांनी आपलं परागीभवनाचं काम सुरू केलं. मनाला खूप बरं वाटलं. त्यानंतर सात दिवसांनी बंड्याने आनंदाने मला फोन केला, की एका क्रेटऐवजी आता सहा क्रेट काकड्या तोडल्या आणि शिवाय, टवटवीत माल सापडलाय. सचिन शिर्के म्हणजे बंड्या हा माझा मित्र सहज म्हणाला, शिक्षणात कधी असं शिकवलं जात नाही. यापुढे मात्र पर्यावरणपूरक वृक्षारोपण करणार असल्याचं त्याने स्पष्टपणे बोलूनही दाखविलं. अगदी शेतीच्या बांधावर बोरी, बाभळी, करंज, भोकर, उंबर, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ अशी जैवविविधता पूरक झाडं लावणार, असं त्याने कबूल केलं. अनेकजण सांगतात, झाडांच्या सावलीमुळे पिकांना फटका बसतो. मात्र हे खोटं असून, आपल्या स्थानिक झाडांच्या पानांचं खतात लवकरच रूपांतर होते. शिवाय, सावलीमुळे काही फरक पडत नाही. मात्र यात परदेशी नीलगिरी, गुलमोहर आदी झाडं बांधावर असल्यास भूजल पातळी झपाट्याने खोलवर जाते. यांची पानं जमिनीवर पडल्यास जमीन सुपीकही होत नाही. त्यामुळे फक्त स्थानिक झाडंच शेतीच्या बांधावर लावली पाहिजेत. काकडीचं परागीभवन करताना मधमाशी फुलात शिरून परागीभवन करीत असते. काकडीच्या वेलींची वाढही झपाट्यानं होऊन उत्पादन क्षमता वाढते, तीपण कित्येक पटींनी! काहीजण दिवसा कीटकनाशक फवारतात. यामुळे मधमाश्या मोठ्या प्रमाणात मरतात. यावर उपाय म्हणजे रात्री मधमाश्यांनी आपलं परागीभवनाचं काम थांबविलं की फवारणी करावी आणि तीही जर गरज असेल तरच! अगदी ज्येष्ठ निसर्गतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी नागझिरा येथे सांगितलं, की जंगलात अस्वलं मधमाश्यांची पोळी व मध आवडीने खातात. मधपोळ्याच्या भाकरी करतात. त्या करताना त्यात झाडांची पानं टाकतात आणि मग त्या सर्व भाकरी गुहेत ठेवतात. कारण त्यांच्या पिलांसाठी त्यांना त्या ठेवायच्या असतात. मात्र, काहीवेळा या भाकरी चोरायला आदिवासी लोक येतात आणि मग अस्वलं हल्ले करतात. मात्र अस्वलाचा हल्ला म्हणजे जगात सर्वांत वाईट चेहरा होतो, कारण त्याची एक चापट म्हणजे चेहरा विद्रूपीकरणच. एकदा त्यांनी एक अस्वल झाडावर चढत असल्याचं पहिलं, ते मधमाश्यांचं पोळं खाण्यासाठी झाडाच्या शेंड्यावर गेलं आणि वरून खाली पडलं आणि मेलं. याचा अर्थ असा आहे, की त्या मधमाश्यांच्या पोळ्यावर अनेकदा अस्वलांचे हल्ले झाले होते. मग त्या पोळ्यातील राणीने आपल्यात बदल करीत जाड फांदीऐवजी अस्वल आल्यावर सहज तुटेल अशा फांदीवर आपलं पोळं केलं. ज्या प्रजाती बदलायला शिकतात, त्याच निसर्गात टिकतात. आता वेळ आहे मानवाने बदलायची. जर आपण आपल्या जीवनशैलीत बदल केला नाही, तर आपणसुद्धा संपणार यात शंकाच नाही. आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, की यापुढील काळात स्थानिक वृक्षलागवडीला प्राधान्य दिलं पाहिजे, जेणेकरून आपली स्थानिक जैवविविधता वाढेल आणि जगण्यातील आनंद व समाधान वाढेल. मधमाश्या जगात टिकून राहण्यासाठी बदल करीत राहतील, मात्र त्यांना आपणही साथ दिली पाहिजे. आता नाही तर पुन्हा कधीच नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वांनी वेळीच शाश्वत शेतीकडे वळायला हवं, अन्यथा आपणही संपणार, हे आता नक्कीच... डॉ. महेश गायकवाड |