ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!

मागील काही वर्षांतील आकडेवारी लक्षात घेतली तर एसएमएस आणि फोन बॅंकिंगमुळे होणाऱ्या गैरव्यवहारात निश्‍चितच वाढ झाली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. हे टाळण्यासाठी व यापासून बचाव करण्यासाठी मोबाईल बॅंकिंग आणि एसएमएस बॅंकिंगबाबत काही दिशा-निर्देशनाचे पालन करणे गरजेचे आहे.
agrowon editorial article
agrowon editorial article

आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव विकासाच्या प्रगतीला अधिक चालना मिळाली. एवढेच नव्हे तर परिसरातील सर्वंकष विकासावरही त्याचा प्रभाव दिसून येतो. विज्ञान आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, यात शंका नाही. आजच्या युगात सर्वच क्षेत्रात आपण प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या विज्ञानावर अवलंबून आहोत. बॅंकिंग क्षेत्रही याला अपवाद नाही. मागील काही दशकांत आपण ‘डिजिटल बॅंकिंग''वर येऊन पोचलो आहे. भविष्यकाळात इंटरनेट, एसएमएस, फोन बॅंकिंग किंवा ई-मेलसारख्या सेवेत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. पूर्वी विशिष्ट वेळेतच बॅंकांमधून आर्थिक देवाण-घेवाण करण्यावर मर्यादा होती. परंतु आता डिजिटलायझेशनमुळे २४ x ७ सेवेचा लाभ घेता येतो. इंटरनेट किंवा फोन बॅंकिंगचे व्यवहार वाढल्याने त्यात अनेक अपप्रवृत्तीही शिरल्या आहेत. सायबर गुन्हे रोखण्यासाठी बॅंकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. वर्तमान युगात ई-माध्यमाचा वापर आणखी वाढत जाणार आहे. परंतु यामुळे होणारे वाढते धोके याकडेही आपणास दुर्लक्ष करता येणार नाही.  मागील काही वर्षांतील आकडेवारी लक्षात घेतली तर एसएमएस आणि फोन बॅंकिंगमुळे होणाऱ्या गैरव्यवहारात निश्‍चितच वाढ झाली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. हे टाळण्यासाठी व यापासून बचाव करण्यासाठी मोबाईल बॅंकिंग आणि एसएमएस बॅंकिंगबाबत काही दिशा-निर्देशनाचे पालन करणे गरजेचे आहे. आपल्या सुरक्षिततेसाठी काही सूचना अशा आहेत.     आपल्या मोबाईलमध्ये नेहमी अँटीव्हायरसचा प्रयोग केला जावा.      फोन हरवल्यास तत्काळ पोलिसांत तक्रार केली पाहिजे.      फोनमध्ये असा पासवर्ड टाकला पाहिजे, की कोणत्याही व्यक्तीस तो कळणार नाही.      अपरिचित लिंकच्या माध्यमातून बॅंक व्यवहार करणे टाळावे.      सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या वाय-फाय सेवेचा लाभ घेण्याचे टाळावे.      माहित नसलेल्या दूरध्वनी नंबरवरून आलेली कोणतीही फाईल उघडू नये. याबाबतची तक्रार संबंधितांकडे करावी.      मोबाईल फोन अपडेट राहील याची दक्षता घ्यावी.      फोन बॅंकिंग पासवर्ड सतत बदलता ठेवावा.      फोन नंबरमध्ये नेहमी बदल करू नये.      बॅंकिंगसंबंधी माहिती किंवा आकडेवारी फोनमधून सहज उपलब्ध होणार नाही याची काळजी घ्यावी.      कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या बॅंकिंगमधील आकडेवारी किंवा एटीएम कार्ड नंबर, पिन आदी माहिती फोनमध्ये उपलब्ध करू नये.  वर्तमान युगात डिजिटल माध्यमाद्वारा होणाऱ्या धोक्‍यामध्ये ई-मेलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. अनधिकृत व्यक्तीद्वारा नकली किंवा खोटे ई-मेल आयडी तयार करून कोणत्याही व्यक्तीला पाठविले जातात. ते उघडताच त्यातील संपूर्ण खासगी माहिती संबंधित दुष्प्रवृत्त व्यक्तीकडे पोचली जाते. अशा माहितीचा गैरवापर करून स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर केला जातो. यासाठी एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे ग्राहकांची जागरूकता. खरे तर संबंधित बॅंकांनीच आपल्या ग्राहकांना सायबर धोक्‍यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी वेळोवेळी अद्ययावत माहितीचे आदान-प्रदान केले पाहिजे. जेणेकरून ग्राहक बॅंकिंग व्यवहार करताना अधिक दक्ष  राहतील.  ई-मेलद्वारा होणाऱ्या गैरप्रकारास आळा घालण्यासाठी किंवा त्यापासून बचाव करण्यासाठी पुढील सूचनांचे ग्राहकांनी पालन करावे -      कोणत्याही अपरिचित आयडीद्वारा प्राप्त ई-मेलची अटॅचमेंट उघडू नये.      ई-मेलद्वारा कधीही बॅंक खाते किंवा पिन/पासवर्डची माहिती देऊ नये. बॅंक अशी माहिती कधीही मागत नाही.      सायबर कॅफे किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी ई-मेल आयडीचा प्रयोग करू नये.      ई-मेल आयडी उघडण्यापूर्वी त्यात कितपत प्रामाणिकता आहे, याची खात्री करून घ्यावी.      प्रामाणिक इंटरनेट माध्यमाद्वारेच आपला ई-मेल आयडी लॉगीन करावा.      नियमित अंतराने ई-मेल आयडीतील पासवर्ड बदलता ठेवावा.      एक ई-मेल आयडी अधिक संगणक किंवा मोबाइल फोनद्वारे लॉगीन करू नये.      संगणक तसेच मोबाईल फोनमध्ये नेहमी अँटीव्हायरस अपडेट करत राहावे.  ई-मेलच्या माध्यमातून खोटे मेल, टेलिफोन, टेक्‍स्ट, बनावट वेबसाईटद्वारा पीडित व्यक्तीशी संपर्क केला जातो. तसेच यासाठी आता सोशल मीडियाचाही वाढता वापर होतो आहे. सायबर गुन्हे शाखाही अशा गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी अथक प्रयत्न करूनही ते हतबल होतात. मूळ मेसेज आणि फेक मेसेज यातील खरा मेसेज कोणता हे ओळखणे कठीण जाते. प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून हे मेसेज तयार केले जातात. त्यामुळे सकृतदर्शनी ते खरे वाटतात. डिझाईन, लोगो एवढेच नव्हे हस्ताक्षरसुद्धा खरे वाटायला लागते.  आधुनिक युगात वेग वाढल्याने त्याला आवर घालणे आता कठीण आहे. परिवर्तन आवश्‍यक आहे, त्यामुळे वेगाला प्रतिबंध घालता येत नाही. वेगासोबत चालायचे असेल तर आपले ज्ञान अद्ययावत करण्याची आवश्‍यकता आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा वापर प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने केल्यास येणाऱ्या संभाव्य धोक्‍याला आपण निश्‍चितपणे सामोरे जाऊ शकू, यात कोणतीही शंका नाही. 

प्रा. कृ. ल. फाले : ९८२२४६४०६४ (लेखक राष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्थेचे संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com