स्वतंत्र संवर्गाद्वारे कृषी अभियंत्यांना द्या संधी

कृषी विभागांतर्गतस्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संवर्ग निर्माण करणेही गरजेचे आहे. या संवर्गामध्ये कृषी अभियांत्रिकी आयुक्त, संचालक, उपसंचालक, विभागीय कृषी अभियंता या पदाचा समावेश व्हावा. अशाप्रकारे या पदवीधरांच्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग मृद व जलसंधारण विभागात, जलयुक्त शिवार अभियानात प्रभावीपणे केला जाऊ शकतो.
संपादकीय
संपादकीय

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या पदवीधरांनी मृद व जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन या क्षेत्रात देश व राज्यपातळीवर उल्लेखनीय काम केलेले आहे. यामध्ये कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे कार्यरत असलेले पंडीत वासरे यांनी मागील २५ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कडवंची पाणलोट क्षेत्र विकसित केलेला आहे. या पाणलोट क्षेत्रात मृद-जलसंधारणाची जी कामे केली त्यामुळे हे क्षेत्र ‘मराठवाड्याचे इस्त्राईल’ म्हणून ओळखले जात आहे. पंडीत वासरे यांना त्यांच्या या कामाबद्दल महाविद्यालयाने सन्मान पत्र देवून गौरविलेले आहे. त्यांनी कृषी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांना तांत्रीक प्रशिक्षण देऊन, शासन, कृषी विद्यापीठे, महाविद्यालये व संशोधन संस्था यांच्या मनुष्यबळाला तांत्रिकदृष्ट्‌या सक्षम करण्याचे काम केलेले आहे. 

आमच्या महाविद्यालयातील प्रा. एस. डी. पायाळ यांनी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत धनगरमोहा तालुका गंगाखेड येथे आदर्शवत पाणलोट क्षेत्र निर्माण केला. या कामाचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहिले आहे. गंगाखेड तालुक्‍यात झालेल्या जलयुक्त शिवार अभियान कामाचे बहिस्थ यंत्रणेद्वारे परीक्षणाचे काम जिल्हाधिकारी, परभणी यांचा आदेशानुसार पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी मदत केलेली आहे. अशा तऱ्हेचे पाणलोट क्षेत्राचे तांत्रिक काम केल्यामुळे जिल्हास्तरीय कार्यशाळेत राज्य शासनातील अधिकारी, कर्मचारी यांना वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन केलेले आहे. 

या महाविद्यालयाचाच माजी विद्यार्थी अमोल गरकल उपविभागीय वन अधिकारी राजुरा, चंद्रपूर येथे कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या वनक्षेत्रामध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मृद व जलसंधारणाची (वनराई बंधारे, गॅबीयन बंधारे, ब्रश वुड स्ट्रक्‍चर आदी) उत्कृष्ट कामे सामाजिक बांधीलकीच्या नात्याने केलेली आहेत, या कामामुळे त्या कार्यक्षेत्रात विविध फायदे मिळत असल्याचे दिसून येते. कृषी अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ज्ञानाचा मृद व जलसंधारण क्षेत्रात योग्य रीतीने वापर करून सद्भावपूर्वक व लोकोपयोगी कामासाठी प्रत्यक्ष क्षेत्रीय ठिकाणी अंमलबजावणी केलेली आहे. या ज्ञानाचा उपयोग, महत्त्व व जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी विविध कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम व्हावे हीच त्यामागची धारणा आहे. तसेच विविध अशासकीय संस्थांमध्ये हरीश डावरे, महेश कंकाळ व उपेन्द्र सोनटक्के यांनीसुद्धा मृद व जलसंधारण या विषयात आपली उपयुक्तता सिद्ध करून देश, राज्य, गाव पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. 

पशु व मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आज कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज बनलेली आहे. त्यानुसार केंद्र आणि राज्य शासनाच्या ध्येय धोरणांमध्ये सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे कृषी यंत्र निर्मितीच्या उद्योगाला चालना मिळत आहे. कृषी यंत्रे, औजारे, उपकरणांची प्रत सुधारण्यासाठी तसेच सरकारी धोरणे, योजनांची आखणी व सक्षमपणे अंमलबजावणी करून शासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कृषी अभियंत्यांचा समावेश कृषी यांत्रिकीकरण योजनेत शासन स्तरावर होणे गरजेचे आहे. किफायतशीर, आधुनिक व शाश्वत शेतीसाठी हरितगृह तंत्रज्ञान, बांबूपासून पॉलिहाऊस, रोपवाटिकेसाठी शेडनेट हाऊस उभारणी व व्यवस्थापन, बांबूपासून विविध शेतीयोग्य वापरासाठी साहित्य तयार करणे, कांदा साठवणूक गृह उभारणी, जनावरांसाठी अत्याधुनिक गोठे उभारणे, बंदिस्त शेळीपालनासाठीचे बांधकाम, कुक्कुटपालन गृहे, कृषी पर्यटनाकरिता आवश्‍यक फार्म हाउसेस व त्यामधील वातावरण नियमन, स्वयंचलीत रचना आदी कामांमध्ये देखील कृषी अभियंत्यांच्या ज्ञानाचा उपयोग कार्यक्षमरीत्या होऊ शकतो. 

या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून व कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेचे महत्त्व लक्षात घेऊन या पदवीधरांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यायला हवे. याकरिता कृषी विभागांतर्गत स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संवर्ग निर्माण करणेही गरजेचे आहे. या संवर्गामध्ये कृषी अभियांत्रिकी आयुक्त, संचालक, उपसंचालक, विभागीय कृषी अभियंता या पदाचा समावेश व्हावा. या पदवीधरांच्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग मृद व जलसंधारण विभागात, जलयुक्त शिवार अभियानात प्रभावीपणे केला जाऊ शकतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नुकतेच जलयुक्त शिवार योजनेतील कामांत तांत्रिक कौशल्याचा अभाव असल्याचे अधोरेखीत केले आहे. आताच्या गंभीर दुष्काळाच्या पार्शभूमीवर कृषी अभियंत्याची निकड कृषी क्षेत्रात प्रकर्षाने जाणवत आहे. देशपातळीवर विचार करता इतर राज्यातही प्रामुख्याने राजस्थान, पश्‍चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, तमिळनाडू, सिक्कीम या राज्यात स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय आहे. कृषी अभियंत्याचे स्वतंत्र संवर्ग तयार झाल्यास राज्यातील कृषी अभियांत्रिकी क्षेत्राचा अथवा शेतीतील यांत्रिकीकरणाचा विकास होण्यास मदत होईल. राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना जसे जलयुक्त शिवार अभियान, आदर्श गाव योजना, शेततळे योजना, मृद व जलसंधारण संदर्भातील योजना, अशासकीय संस्थाद्वारे राबविण्यात येणारे मृद-जलसंधारणांच्या कामांमध्ये कृषी अभियंते महत्त्वाची भूमिका पार पाडीत आहेत.या नमूद केलेल्या सर्व विषयात कृषी अभियांत्रिकी पदवीधराचा योग्य तांत्रीक व सखोल ज्ञान असूनही त्यांना या क्षेत्रात सेवेची संधी उपलब्ध होत नाही.

सद्यस्थितीत जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी, या पदाची जाहिरात आलेली आहे. या पदासाठी सुद्धा ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम कृषी अभियांत्रिकी पदवीधरांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमात शिकविला जातो. या पदासाठी कृषी अभियांत्रिकी पदवीधर पात्र असूनसुद्धा त्यांना डावलण्यात आलेले आहे. तरी या पदासाठी व शासनाच्या इतर योजनेतील समकक्ष पदासाठी कृषी अभियंत्यांना पात्र धरुन सेवा करण्याची संधी घ्यावी. या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न व राज्याच्या विकासाचा वेग वाढण्यास मदत होईल.

लक्ष्मीकांत राऊतमारे  : ९४२१३०५९४३ (लेखक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात तंत्र  अधिकारी आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com