agrowon editorial article
agrowon editorial article

लोककल्याणकारी राजा

दूरदृष्टी, असीम धैर्य, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन, प्रबल इच्छाशक्ती, मुत्सद्दी, रयतेवर जिवापाड प्रेम करणारा राजा अशा महाराजांच्या गुणांचा आणि कार्य कौशल्याचा लेखाजोखा जेवढा मांडावा तेवढा अपुराच आहे.

हिंदवी स्वराज्यांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगातील आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाते. रयतेच्या सुखासाठी झटणाऱ्या या राजाच्या जयंतीचा सोहळा काल दिमाखात जगभरात साजरा केला गेला. स्वराज्याच्या हिताचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने लोक कल्याणकारी राजे होते हे निर्विवाद सत्य आहे. 

आदर्शवत धोरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचे मूल्यमापन करीत असताना आपल्या मुलखात शांतता प्रस्थापित करणे, जनतेला निःपक्षपाती न्यायदान करणे, महसूल पद्धतीत सुसूत्रता आणणे, शेतकरी व शेतीला उत्तेजन देणे, आपल्या मुलखाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय सैन्यदल उभारणे, किनारपट्टीवर पहारा करण्यासाठी आणि व्यापारासाठी आरमार उभारणे असे नानाविध प्रकारचे कार्यक्षम आणि पारदर्शी कारभाराची वैशिष्ट्ये सांगता येतील. त्याचबरोबर महाराजांनी आपल्याकडील अपुरे सैन्यबळ, त्यांची क्षमता ओळखून येथील दऱ्याखोऱ्या डोंगररांगाची भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन मर्यादित अशा नैसर्गिक साधनसामग्रीचा कार्यक्षमपणे विनियोग करीत स्वयंनिर्भर स्वराज्याचा मार्ग अवलंबला की जो आजकाल ‘आत्मनिर्भर’ म्हणून चर्चिला जातोय. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व अनन्यसाधारण होते. या अष्टप्रधान मंडळात आठ मंत्री होते. त्यांचे काम ३० विभागांत विभागलेले होते. या ३० विभागांतील कामाच्या व्यवस्थापनासाठी ६०० कर्मचारी नेमण्यात आले होते. महाराजांसमोर येणाऱ्या प्रकरणांचा समोरासमोर निकाल लावला जात असे. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासकीय, जमीन महसूल, कृषी, जल, राजकीय, लष्करी, परराष्ट्रीय, शैक्षणिक, धार्मिक आणि महिला विकासाचे धोरण वर्तमानकालीन धोरणकर्त्यांना दिशा देणारे, तर आहेच शिवाय आजदेखील यातून भरपूर काही घेण्यासारखे आहे. पण आज या आदर्शवत इतिहासाच्या घटनांकडे दुर्लक्ष करून आत्मप्रौढी धोरणांची अंमलबजावणी करण्याचा खटाटोप सुरू आहे.

आर्थिक नियोजन  शिवाजी महाराजांनी आपल्या समृद्ध कृषी व्यवस्थापनातून रयतेचे सर्वाधिक कल्याण साध्य करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्‍याला दुष्काळ, अतिवृष्टी व अवर्षणाच्या तडाख्यातून सावरण्यासाठी नेहमीच कार्य तत्परता दाखवून मदतीचा हात दिला. तसेच राज्यात व्यापार वाढीसाठी अनेक उपाययोजना केल्याचे संदर्भ आढळून येतात. देशी व्यापाऱ्यांना परदेशात व्यापार करण्याची मुभा दिल्याने शिवकाळात व्यापार वाढीस लागला. परदेशी व्यापाऱ्यांनाही त्यामुळे उत्तेजन मिळाले. शिवरायांच्या प्रयत्नांमुळे स्वराज्याचा व्यापार जवळपास २५ देशांतील व्यापाऱ्यांसोबत सुरू होता. महाराजांची सर्वांत विलक्षण गोष्ट म्हणजे त्यांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी अनेक जलदुर्ग उभारून स्वराज्याच्या सीमा संरक्षित केल्या. हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीकच मानायला हवे. परंतु आजची परिस्थिती पाहिली तर सरकारकडून वारंवार शेती विकासाची भाषा केली जाते. मात्र प्रत्यक्षात मदत करण्याची वेळ येते तेव्हा जाचक अटी व शर्थीची कायदेशीर आडकाठी निर्माण केली जाते.

सर्वधर्म समभाव छत्रपतींनी जातिधर्माच्या मर्यादा ओलांडून आपल्या सैन्यात सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सामावून घेत बलाढ्य अशा साम्राज्यसत्तेशी संघर्ष करून मराठ्यांचे स्वतंत्र सार्वभौम रयतेचे राज्य उभारले. एवढेच काय तर महाराजांनी हिंदू असूनही मुस्लिमांशी कधीही दुजाभाव केला नाही. उलट सर्वांना आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये मुस्लिमांचा वाटाही मोठा होता. स्वराज्यामध्ये जाती, पंथ आणि धर्म यांच्या आधारे कोणताही भेदभाव अस्तित्वात नव्हता त्यांना समृद्ध आणि वंचितांचा समान आदर होता. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे शासन धोरण किती निर्दोष होते, हे लक्षात येते. परंतु आजची परिस्थिती पाहिली तर स्वार्थासाठी राज्यकर्ते महाराजांना विशिष्ट जातिधर्माच्या चौकटीत बंदिस्त करून त्यांची मूळ विचारधारा संकुचित करू पाहत आहेत. ही बाब शिवछत्रपतींच्या विचारांचे पाईक म्हणवून घेणाऱ्यासाठी निश्‍चितच भूषणावह नाही.

मानवतावादी विचार शिवाजी महाराजांनी महिलांचा अनादर होऊ नये याची नेहमीच दक्षता घेतली. अगदी रांझ्याच्या पाटलांनी आपल्या पाटिलकीच्या थाटात गावातील कोवळ्या मुलीचा घात घेतला म्हणून त्या पाटलाचे हात कलम करायला मागेपुढे न पाहणारे कर्तव्य कठोर महाराज कल्याणाच्या सुभेदाराची सून जेव्हा नजराणा म्हणून महाराजांना देण्यात आली तेव्हा ‘आमची आई एवढी सुंदर असती तर आम्ही किती सुंदर झालो असतो,’ असे उद्‍गार काढून तिला साडीचोळी करून सुरक्षित पाठवून दिले. परस्त्रीला मातेसमान मानणारे शिवछत्रपती किती चारित्र्यसंपन्न विवेकशील आणि सर्वगुणसंपन्न राजे होते हे या घटनांवरून लक्षात येते. मात्र आजकाल देशात स्त्रियांची अवहेलना करणाऱ्या घटना, मुलींच्या छेडछाडीची जीवघेणी कृत्ये तसेच लैंगिक अत्याचाराचे भयावह प्रसंग सातत्याने वाढताना दिसतात. ही खेदाची बाब आहे.

अविरत प्रेरणादायी स्वदेशाला स्वतंत्र व सुखी करणे, या लोकोत्तर कृत्यांनी जर कोण्या पुरुषाने या भूमंडळाला कायमचे ऋणी करून ठेवले असेल, तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनीच होय. एकूणच महाराजांच्या स्वराज्य निर्मितीविषयी असलेला बहुआयामी दृष्टिकोन, मानवतावाद, राजनीती, युद्धनीती, अर्थकारण, व्यवस्थापन तंत्र, पर्यावरण संवर्धन आणि भविष्याचा वेध घेणारे द्रष्टेपण यातून आजदेखील भरपूर काही घेण्यासारखे आहे. परंतु आजची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या या विचारांची प्रकर्षाने उणीव भासते. म्हणून आज त्यांची जयंती साजरी करीत असताना त्यांनी स्थापलेल्या स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन करायचे असेल तर त्यांच्या शिव विचारांना नव्या पिढीत रुजवण्याची किंबहुना ते आचरणात आणण्याची नितांत गरज आहे. 

डॉ. नितीन बाबर   ८६०००८७६२८

(लेखक शेतीप्रश्‍नांचे  अभ्यासक आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com