शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणे

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड देशाचे प्रेरणास्थान असून, अठरापगड जातींच्या लोकांचे संघटन करून स्वराज्य स्थापन करणारे युगप्रवर्तक आहेत. अर्थात कुशल प्रशासक, उत्कृष्ट योद्धा व प्रजाहितदक्ष सर्वगुणसंपन्न अशा या राजाला जागतिक तसेच देशाच्या इतिहासात अत्युच्च स्थान आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या भविष्यवेधी धोरणांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप...
agrowon editorial article
agrowon editorial article

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा महाराष्ट्र भूमीला मिळाला. एकंदरीतच शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली ध्येयधोरणे, समाजनीती, राजनीती, युद्धनीती, अर्थकारण, व्यवस्थापन तंत्र, मानवतावाद, पर्यावरण संवर्धन आणि भविष्याचा वेध घेणारे द्रष्टेपण यातून आजदेखील भरपूर काही घेण्यासारखे आहे.  

स्वयंनिर्भर स्वराज्याचा आग्रह स्वयंनिर्भर स्वराज्याचा फार व्यापक आणि देशाच्या प्रगतीसाठी समर्पक अर्थ छत्रपतींनी आपल्यासमोर ठेवला आहे. सध्या जगभरात मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे बऱ्याच देशांची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यावर देखील त्यांनी ‘स्वयंनिर्भरता’ म्हणजे स्वराज्याची स्वयंपूर्णता असा मंत्र दिला आहे. जागतिक मंदीचा सामना करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन व मागणीला महत्त्व देणे गरजेचे आहे. परदेशी वस्तूंचा वापर केल्याने आपले चलन परदेशात खर्च करावे लागते. सध्याच्या काळात वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे देशाची आयात, व्यापार तूट, परदेशी चलनांच्या तुलनेत रुपयाचे घटते मूल्य सर्व समस्यांच्या मुळाशी छत्रपतींच्या तत्कालीन कल्पनेतील स्वयंनिर्भर स्वराज्याचा दृष्टिकोन किती धोरणी होता हे समजून येते. 

लोककल्याणकारी ध्येयधोरणे ‘प्रजा सुखी तर राजा सुखी’ या सूत्रानुसार शिवाजी महाराजांनी आपल्या कृषी व्यवस्थापनातून रयतेचे सर्वाधिक कल्याण साध्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंदवी स्वराज्यात लोककल्याणाची हमी दिली. काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्‍याला दुष्काळ, अतिवृष्टी व अवर्षणाच्या तडाख्यातून वाचविण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, आजची परिस्थिती पाहिली तर शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असून वारंवार आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास येते. एकीकडे शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळत नाही, तर दुसरीकडे धान्याची आयात केली जात आहे. त्यामुळे कवडीमोल भावाने शेतमाल विकावा लागत असल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना आधार देऊन उभे करण्यासाठी शिवरायांच्या लोककल्याणकारी शेतकरी धोरणाचा फेरविचार महत्त्वाचा  ठरतो.

समृद्ध कृषी व्यवस्थापनावर भर शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात म्हटले आहे, की गडावर झऱ्याचे पाणी भरपूर आहे म्हणून त्यावर विसंबून न राहता एकदोन तळी अधिक बांधून राखीव ठेवावी. प्रसंगी ती कामास येतील, यावरून निसर्गचक्राचा रोख पाहून यापुढे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे किती गरजेचे आहे, हे अलीकडचे बदलते वातावरण पाहून आपल्या लक्षात आले आहे. स्वराज्यात अनेक ठिकाणी नद्या व कालवे अडवून धरणे बांधली, स्वराज्यात नदीनाल्यांवर बंधारे बांधून पाण्याच्या साठविण्याची व्यवस्था केली. कृषी जीवन सुखी व संपन्‍न करण्यावर त्यांनी भर दिला. हिंदवी स्वराज्याचा शेती हा आधार होता. त्यामुळे त्यांनी योजलेले उपाय शेतकऱ्यांना सुखी व संपन्‍न करणारे ठरले. राजांच्या भक्‍कम कृषी व जलव्यवस्थापन धोरणामुळे आजही महाराष्ट्रात कृषी व्यवस्था टिकून राहिली. लोकांचा मुख्य व्यवसाय असणाऱ्या शेतीच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या. शेतीसाठी आवश्यक पाणी साठ्यासाठी विशेष प्रयत्न केले. शेतकऱ्‍यांना शेतीसाठीच्या साधन-सामग्री उपलब्ध करून दिल्या. शेतसारा व तत्सम करात सूट दिली. जमीन मोजण्याच्या सोप्या पद्धती विकसित केल्या. सावकारी पाशातून लोकांची मुक्‍तता केली. शेती व पूरक व्यवसायांना बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या. शिवछत्रपतींचा काळ म्हणजे केवळ लढाया आणि राजकारणापुरता मर्यादित नव्हता, तर या काळात रयतेच्या कल्याणासाठी आवश्यक विविध योजनांचा पाया घालण्यात आला. हे स्वराज्याचे वेगळेपण निश्चितच वर्तमानकालीन स्थितीला मार्गदर्शक ठरणारे  आहे.  

 पर्यावरण व्यवस्थापन छत्रपती शिवरायांनी ''गड तेथे आमराई, गाव तेथे वनराई''! हा नारा आपल्या आज्ञापत्रातून देवून त्याकाळी जंगल संपत्तीचे मोठेपण समजून घेतले. पर्यावरण आणि माणूस यांचे परस्परांशी असलेले नाते आणि अवलंबित्व महाराजांनी ओळखले होते. आणि म्हणूनच स्वराज्यातील पर्यावरणाचा ऱ्हास त्यांनी होऊ दिला नाही. उलट मुलखात असलेल्या वनराईची कायम काळजी घेतली. गडकोटांच्या परिसरात वड, शिसव, बाभूळ, नारळ, आंबा या वृक्षांची लागवड करून आरमार बांधण्यासाठी साग आणि शिसवीचा वापर करीत स्वराज्य हे पर्यावरणपूरक कसे राहील याची सर्वतोपरी काळजी घेतली होती. यावरून त्यांचा पर्यावरणाविषयीचा उदात्त हेतू स्पष्टपणे दिसून येतो. परंतु, आज विकासाच्या नावाखाली वारेमाप वृक्षांच्या कत्तलीमुळे, माणसाच्या चुकीच्या कृतीमुळे वरदान ठरलेली जंगले नष्ट होत आहेत. म्हणून महाराजांचा त्या वेळी असलेला पर्यावरणविषयक उदात्त हेतू आजच्या स्थितीला नक्कीच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा नक्कीच ठरतो. 

आज समाजविघातक प्रवृत्ती फोफावत असताना, नीतिमूल्याचा कमालीचा ऱ्हास होत असताना, शिवरायांनी भक्कम अशा लोकशाहीच्या तत्त्वावर उभारलेले स्वराज्य, त्यांचे आचार-विचार व राष्ट्राच्या जडणघडणीतील भूमिका, शासन व न्याय व्यवस्था, सामाजिक धोरण त्याचबरोबर लोककल्याणकारी ध्येयधोरणांची पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणी करत असताना शेती, प्रजा, पर्यावरण याविषयी असलेला त्यांचा बहुआयामी दृष्टिकोन यावर सखोल चिंतन होणे गरजेचे ठरते. आजच्या परिस्थितीमध्ये महाराजांच्या अनेक धोरणांची प्रकर्षाने उणीव भासते. शिवछत्रपतींनी मोठ्या दूरदृष्टीने ‘प्रतिपचंद्ररेखेव वर्धिष्णू’ अशा स्थापलेल्या स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करावयाचे असेल, तर महाराजांच्या ध्येयधोरणांना, प्रगल्भ विचारांना नव्या पिढीत रुजविण्याची नितांत आवश्यकता आहे. 

डॉ. नितीन बाबर : ८६०००८७६२८ (लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com