संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख हेक्टर असून, त्यापैकी महाराष्ट्र राज्यात ९० हजार हेक्टरएवढे क्षेत्र आहे. देशातील एकूण द्राक्ष उत्पादनाच्या आठ टक्के म्हणजेच २४६१३३.७६ मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात होऊन त्यापासून २३३५.२४ कोटी रुपयांचे परकीय चलन आपणास मिळते. द्राक्ष उत्पादनाच्या ७८ टक्के द्राक्ष खाण्यासाठी, १७ ते २० टक्के मनुके तयार करण्यासाठी, १.५ टक्के ज्यूस तयार करण्यासाठी तर फक्त ०.५ टक्के वाईन उद्योगात वापरले जाते. भारतामध्ये साधारणतः प्रति वर्ष एक लाख ६० हजार टन मनुके तयार होतात. त्यापैकी ३१४ मेट्रिक टन मनुक्यांची निर्यात होऊन ०.४७३ दशलक्ष अमेरिकन डॉलरएवढे परकीय चलन प्राप्त होते. आपल्या राज्यातील जमीन व हवामान लक्षात घेता द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र वाढण्यास भरपूर वाव आहे. द्राक्ष शेतीमध्ये शेतकरी स्वतः, मजूर वर्ग, निविष्ठा निर्माण करणारे कारखाने, निविष्ठा पुरविणारे घटक, पॅकेजिंग उद्योग, कोल्ड चेन, वाहतूक उद्योग, मनुके निर्मिती, वाईन निर्मिती, बॅंका, पतपुरवठा संस्था, निर्यात व्यवस्था, लोखंडी द्राक्ष मांडव तयार करणारे उद्योग आदी घटकांचा समावेश आहे. त्यामुळे यापासून फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत आहे व मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. नवीन द्राक्ष लागवडीकरिता प्रतिएकर चार लाखापर्यंत तर प्रतिवर्ष पीक नियोजनासाठी अडीच लाखापर्यंत खर्च येतो. द्राक्ष शेतीचे स्वरूप पाहता ही गुंतवणूक ३६८ दशलक्ष रुपये इतकी असून वार्षिक खर्च १८४ दशलक्ष रुपये एवढा आहे. यावरून असे लक्षात येते की, इतकी मोठी आर्थिक उलाढाल द्राक्षशेती व अंतर्भूत घटकांमध्ये होते. द्राक्ष पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ झाल्यास ही गुंतवणूक त्या पटीने वाढत जाऊ शकते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.