पोषण सुरक्षेसाठी ‘व्हेट्स’चा पुढाकार

भारतीयांमध्ये प्रथिनांची कमतरता हा पोषण तज्ज्ञांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. समाजातील सर्वच स्तरात कुपोषण दिसतंय. ‘व्हेट्स इन पोल्ट्री’ (Vets in Poultry - VIP ) ही भारतातील पशुवैद्यकांची (व्हेटर्नरी डॉक्टर्स) संघटना असून, विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. या संघटनेच्या वतीने उद्या रविवार (ता. २८ जुलै २०१९) रोजी कुपोषण निर्मूलनासाठी पोषण जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने...
संपादकीय.
संपादकीय.

जनजागृती फेरीमागील भूमिका भारतात ३८ टक्के मुले कुपोषित तर ५० टक्के महिला अनॅमिक (रक्तक्षयी) असल्याचे निती आयोगाने म्हटले आहे. भारतीय लोकांना दररोजच्या अन्नातून सरासरी ३७ ग्रॅम प्रथिनं मिळतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत म्हटले आहे. सरासरी शिफारशीच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास निम्याने कमी आहे. प्रत्येक व्यक्तीने वजनानुसार ०.८ ते १ ग्रॅम प्रथिने घ्यायला हवीत, अशी शिफारस ही संघटना करते. म्हणजे ७० किलो वजनाच्या माणसाने ५६ ते ७० ग्रॅम प्रथिने घ्यायला हवीत. प्रत्यक्षात तेवढी घेतली जात नाहीत. विकसित देशांच्या तुलनेत हे प्रमाण निम्याहून कमी आहे. भारत जागतिक अंडी उत्पादनात तिसरा, तर ब्रॉयलर्स उत्पादनात चौथा आहे. मात्र, प्रतिडोई अंडी सेवनात भारत (६९), अमेरिका (२५३) आणि चीन (३४८) यांच्या खूप मागे आहे. चिकन, मासे आणि दुधजन्य पदार्थांच्या प्रतिडोई सेवनाबाबतही जवळपास असेच चित्र आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे, ‘ओईसीडी’ या विकसित राष्ट्रांच्या ताज्या पाहणीत तर पोषणसुरक्षेत भारताचा क्रमांक हा दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि इंडोनेशिया आदी विकसनशील देशांच्या तुलनेत खूपच पिछाडीवर दिसतोय. देशांतर्गत पोल्ट्री, मत्स्य उद्योगाला गती देण्याची गरज आहे. अलीकडेच भारतीयांच्या आहारशैलीबाबत झालेल्या एका पाहणीत ९१ टक्के शाकाहारी आणि ८५ टक्के मांसाहारी वयस्कांमध्ये प्रथिनांची कमतरता आढळली. जवळपास ८८ टक्के वयस्क भारतीय प्रथिनांच्या बाबतीत कुपोषित असल्याचं समोर आलं. भारतीयांमध्ये प्रथिनांची कमतरता हा पोषण तज्ज्ञांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. समाजातील सर्वच स्तरात कुपोषण दिसतंय. आहारविषयक जागृतीवरही सरकारला भर द्यावा लागणार आहे. दररोज किती उष्मांक, प्रथिनं घ्यायला हवीत, याबाबत शालेय पातळीवर प्रचार- प्रसार करावा लागणार आहे. पोल्ट्रीमुळे रोजगारवृद्धी अधिकृत माहितीनुसार आजघडीला पोल्ट्री उद्योगाची वार्षिक उलाढाल एक लाख कोटींवर पोचली आहे. देशात आजघडीला सुमारे २३ कोटी अंडी व दोन कोटी किलो चिकन ही देशाची दैनंदिन गरज आहे. मका हा कोंबड्यांचा मुख्य आहार आहे. पोल्ट्री उत्पादनातील ८० टक्के खर्च मका व सोयावर होतो. त्याअनुषंगाने ८० लाख हेक्टरवरील मका आणि ११० लाख हेक्टरवरील सोयाबीनची शेती अप्रत्यक्षपणे पोल्ट्री उद्योगावर अवलंबून आहे. देशाचे शेती क्षेत्र अडचणीत असताना पोल्ट्री व्यवसायाने गेली दोन दशके आठ टक्के विकासदर राखला आहे. महाराष्ट्रात ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगावर सुमारे दहा हजार पोल्ट्रीधारक शेतकरी कुटुंबे थेट अवलंबून आहेत. सुमारे १२ हजार लोकांना पोल्ट्री कंपन्यांत रोजगार मिळाला आहे तर १५ हजार लोकांना चिकन सेंटर्सवर रोजगार मिळतोय. महाराष्ट्रातील १० लाख हेक्टरवरील मका आणि ३५ लाख हेक्टरवरील सोयाबीनचा बाजार पोल्ट्री उद्योगावर अवलंबून आहे. सुमारे पाच लाख मका- सोयाबीन उत्पादक शेतकरी कुटुंबांना अप्रत्यक्षपणे पोल्ट्री उद्योग रोजगार पुरवतोय. प्लॅस्टिक अंड्यांची अफवा मागील काही दिवसांपासून तथाकथित प्लॅस्टिक अंडीबाबत काही माध्यमांत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, नेमकी वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. त्याने ग्राहकांचा संभ्रम दूर होईल. १. चीनमध्ये शंभर टक्के तपकिरी कवचाच्या अंड्यांचे उत्पादन होते, तर भारतीय अंड्यांचे कवच हे सफेद असते. चीनमधून तस्करी करून भारतात अंडी आयात करणे हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. शिवाय, नैसर्गिक अंड्यांच्या तुलनेत कृत्रिम अंडी तयार करणे हे अतिशय खर्चिक ठरू शकते. भारतात अंड्यांची विपूल उपलब्धता असून, सध्या शेतकरी उत्पादन खर्चाच्या आसपास किमतीलाच अंडी विकत असताना प्लॅस्टिक अंडी निर्माण करण्याच्या प्रश्नच उद्भवत नाही. २. आपल्याकडे रोजच्या गरजेसाठी खपणारी अंडी शितगृहात न ठेवता ती थेट बाजारात आणली जातात. वाहतूक प्रक्रियेत रेफ्रिजरेटेड कंटेनर्स वापरली जात नाहीत. अशा परिस्थितीत अंड्यातील पिवळा भाग (योक) थोडा कडक होतो. उष्म्यामुळे बाष्पीभवन होऊन, अंड्याच्या आतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. परिणामी, अंडी उकडली जातात, तेव्हा पिवळा भाग काहीसा कडक आणि रबरासारखा होतो. कमी आर्द्रतेमुळे अंड्याचा पांढरा भागदेखील शिजवल्यानंतर काहीसा रबरासारखा होवू शकतो. मात्र, तापमान सामान्य असते तेव्हा असे प्रकार घडत नाही. या प्रक्रियेत अंड्यांच्या पोषणमुल्यात काहाही बदल होत नाही. पूर्वीसारखेच त्यातील पोषकता सुरक्षित असते. ३. ज्या वेळेला अंड्यांना कमी मागणी असते, तेव्हा शितगृहांमध्ये दहा सेल्सिअस तापमानाला साठवली जातात. सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८० टक्के राखली जाते. साधारपणे ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात कमी मागणीमुळे अंडी शितगृहात साठवली जातात, पुढे थंडी वाढल्यानंतर ती बाजारात येतात. ४. जगातील सर्वांत सुरक्षित आणि पोषणमूल्ययुक्त अंडी भारतात उत्पादित होतात. जगभरात भारतीय अंडी ही नॉन जीएमओ खाद्य वापरून उत्पादित प्रकारात मोडतात. त्या आधारावर निर्यातीसाठीही विशेष मागणी असते. ६. आतापर्यंत विविध राज्यांत तथाकथित व संशयित प्लॅस्टिक अंड्यांची चाचणी प्रयोगशाळांध्ये झाली असून, त्यात ही अंडी कोंबडीपासून निर्मित-जैविक अंडी असल्याचे, म्हणजेच प्लॅस्टिक नसल्याचे निष्पन्न झाले आहे. ७. गेल्या वर्षीच सरकारी नियामक ‘एफएसएसआय’ने चाचणीअंती प्लॅस्टिक अंडी ही अफवा असून, यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. अॅंटिबायोटिक्स आणि चिकन भारतासह जगभरातील नामवंत दैनिके-नियतकालिकांत पोल्ट्रीत वापरात येणाऱ्या अॅंटिबायोटिक्सबाबत चर्चा सुरू आहे. पक्ष्यांच्या संगोपनादरम्यान वापरली जाणारी अॅंटिबायोटिक्स ही चिकन-अंडी सेवनातून मानवी शरिरात प्रवेश करतात. माणसात अॅंटिबायोटिक्स प्रतिरोध (रेजिस्ट्न्स) वाढतो. उपचारादरम्यान अॅंटिबायोटिक्स प्रभावहीन ठरतात. पोल्ट्री उद्योगाने माणसांसाठी वापरली जाणारी अॅंटिबायोटिक्स पक्ष्यांच्या संगोपनात वापरू नयेत, असा सूर जगभरात निघतोय. याबाबतची वस्तुस्थिती संबंधित तज्ज्ञांकडून जाणून घेतली. त्यांचे म्हणणे असे: १. पोल्ट्रीत पक्ष्यांचे आजार बरे करण्यासाठी अॅंटिबायोटिक्स वापरली जातात. २. पोल्ट्री सायन्सनुसार आणि शास्त्रीय शिफारशीनुसार अॅंटिबायोटिक्सचा अंश माणसांत उतरणार नाही या मर्यादेतच (एमआरएल) खाद्याद्वारे पक्ष्यांना दिली जातात. 3. पक्ष्यांच्या वाढीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे २१ दिवसांपर्यंत अॅंटिबायोटिक्स वापरली जातात. आठ दिवसांनंतर त्यांचा प्रभाव संपतो. भारतात ३५ ते ४० दिवसांच्या पुढील वयाचे पक्षी विक्रीस येतात. ४. आधुनिक पोल्ट्री खाद्य व्यवस्थापनात अॅंटिबायोटिक्सला पर्यायी ग्रोथ प्रमोटर्स वापरली जाऊ लागली आहेत. ज्यामुळे पोल्ट्रीत अॅंटिबायोटिक्सचा वापर शून्यावर आणता येऊ शकतो. ५. अॅंटिबायोटिक्स ही खूप महाग असतात. त्यामुळे उत्पादन खर्चही वाढू शकतो. शास्त्रीय मर्यादेपेक्षा जास्त वापरता येत नाही. ६. अज्ञानापोटी अॅंटिबायोटिक्सचा अंसतुलित वापर होऊ नये, यासाठी पोल्ट्री उद्योगाकडून शेतकऱ्यांत जागृती केली जात आहे. ७. अॅंटिबायोटिक्स प्रतिरोध वाढण्यास चिकन-अंडी जबाबदार नाही. वैद्यकीय क्षेत्राकडून गरजेपेक्षा जास्त अॅंटिबायोटिक्स लिहून दिल्याची उदाहरणे आहेत. ८. ग्राहकांना सुरक्षित आणि पोषणयुक्त आहार पुरविणे, याला भारतीय पोल्ट्री उद्योग सर्वोच्च प्राधान्य देतो. ग्राहकहितातच उद्योगाचे हित आहे.  

दीपक चव्हाण - ९८८१९०७२३४ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com