तंत्र शून्य मशागतीचे, अनंत फायद्याचे

सेंद्रिय कर्बपातळी स्थिर ठेवण्यासाठी शून्य मशागतीवरील आधारित शेती करण्यात पॅराग्वे, उरुग्वे, अर्जेन्टिना, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील हे आघाडीचे देश आहेत. या देशात घेतलेल्या प्रयोगात ब्राझीलमध्ये ९७ टक्के मातीची धूप कमी झाल्याचे आणि उत्पन्न ५७ टक्क्यांनी वाढल्याचे निष्कर्ष आहेत.
agrowon editorial article
agrowon editorial article

सन २०१० च्या दशकातील शेती व्यवसायात जमिनीतील खालावलेली सेंद्रिय कर्ब पातळी हा ज्वलंत प्रश्न असतानाही राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत याबाबत कोणतेही विस्तार योजना राबविली जात नाही. उलट देश अन्नधान्य उत्पादनात एका दशकापेक्षा अधिक कालावधी पासून स्वावलंबी होऊनही आणि पुरेशा साठवणूक क्षमतेअभावी दरवर्षी ३० ते ४० टक्के उत्पादित अन्नधान्याची नुकसान होते. अन्नधान्य उत्पादन वाढीसाठीच्या अनुदानित कृषी विस्तार योजना राबविल्या जातात, त्यावर कोट्यवधी रुपयाचा खर्चही केला जातो. भविष्यात प्रतिकूल हवामान आणि अनिश्चित शेतीमाल दर यामुळे शेती किफायतशीर करण्यासाठी उत्पादन खर्च कमी करावा लागेल. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी पूर्वपदावर आणि ती स्थिर ठेवणे याला दुसरा कोणताही तरणोपाय नाही. सबब जमिनीतील सेंद्रिय कर्ब विनाखर्चिक वाढविण्यासाठी भविष्यात अनुदानित कृषी विस्तार योजना राबविणे, जे की शेती व्यवसायातील ज्वलंत प्रश्‍नाचे समर्पक उत्तर ठरेल. यामुळे सेंद्रिय शेती व्यवसायात सुद्धा शाश्‍वतता येऊन उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होईल. सेंद्रिय शेतीस चालना मिळेल. सेंद्रिय कर्ब पातळी स्थिर ठेवण्यासाठी शून्य मशागतीवरील आधारीत शेती करण्यात पॅराग्वे (९० टक्के), उरुग्वे (८२ टक्के), अर्जेन्टिना (८० टक्के), ऑस्ट्रेलिया  (५७ टक्के) आणि ब्राझील (५० टक्के) आघाडीचे देश आहेत. या देशात घेतलेल्या प्रयोगात ब्राझीलमध्ये ९७ टक्के मातीची धूप कमी झाल्याचे आणि उत्पन्न ५७ टक्क्यांनी वाढल्याचे निष्कर्ष आहेत. पॅराग्वे या देशात शेती उत्पादन ७७ टक्क्यांनी वाढल्याचे निष्कर्ष आहेत.

भारतामध्ये १९६० पासून ब्रह्मपुत्रा -गंगा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात (उत्तर आणि पूर्वेकडील राज्य) भातानंतर गव्हाची पेरणी कोणतीही पूर्वमशागत न करता, दक्षिण भारतात गुंटूर येथे विविध पीक पद्धतीत शून्य मशागत तंत्राचा वापर करून अधिक उत्पादन मिळत असल्याच्या नोंदी आहेत. जी. बी. पंत, पंतनगर कृषी विद्यापीठाने १९८० च्या दशकात ट्रॅक्टरचलित शून्य मशागतीत, भात-गहू पीक पद्धतीत पेरणी करणारे यंत्र विकसित केलेले आहे. १९८३ आणि तद्‍नंतर ICRISAT हैदराबाद स्थित केंद्रीय कृषी संशोधन संस्थेने शून्य मशागतीत पेरणी करणारे यंत्र विकसीत केले. मात्र नांगरणीचे, मोगड्याचे, सबसॉइलर वापराबाबतचे मशागत तंत्राबाबत जसे कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विस्तारकाने शेतकऱ्यांत जागृती निर्माण केली तशी शेती न नांगरताही पेरणी करता येणाऱ्या अवजाराचे महत्त्व व त्याबाबत दुर्दैवाने जागृती केलेली नाही. यामुळे नांगर, ते ओढणारे ट्रॅक्टर, संबंधित अवजाराचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या व विक्रेते, शेतकऱ्याच्या बळावर विमानाने परदेश वाऱ्या करून आले. मात्र आमचा नांगर वापरणारा शेतकरी कुटुंबाच्या प्राथमिक गरजाही पूर्ण करू शकला नाही. नांगरणी, मोगडनी व इतर जमीन उघडी करण्याच्या मशागत पद्धतीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब उडून जातो, जो की जमीन सुपीकतेचा मध्यबिंदू आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या मनात रुजविण्यास कृषी शास्त्रज्ञ व विस्तारक कमी पडले. परिणामी, या व रासायनिक खताच्या वापरामुळे सेंद्रिय कर्ब पातळी ४ टक्क्यांवरून ०.२ ते ०.५ टक्क्यावर खाली आलेली आहे, जी की मृद्‌शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कमीत कमी १ टक्का असणे गरजेचे आहे. 

सेंद्रिय कर्ब पातळीबाबत राज्यातील कृषी विद्यापीठांचे संशोधन निष्कर्ष उपलब्ध नसतील तर ICRISAT हैदराबाद या संस्थेच्या निष्कर्षाच्या आधारे २०२१-२२ च्या खरीप हंगामापासून ट्रॅक्टरचलित, गत हंगामाच्या पिकांच्या अवशेषात पेरणी करणारे अवजाराच्या वापराचे पीक प्रात्यक्षिके घेतली किंवा ऊस, केळी पिकाचे खोडवा पीक काढल्यानंतर कोणतेही पूर्वमशागत न करता आहे त्या ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून कापूस, तूर, फळभाज्या, फळझाडे त्यांच्या शिफारशीत अंतराचा विचार करून लागवडीचे पिके प्रात्यक्षिके घेतली, तर पूर्वमशागतीवरील खर्चाच्या बचतीबरोबर जमिनीवरील, जमिनीतील पिकाच्या अवशेषाच्या रूपातील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीची भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मात आमूलाग्र बदल होऊन पीक उत्पादनात वाढ होईल. खर्चातही बचत होईल. यासाठी गरज आहे ती कृषी शास्त्रज्ञ व कृषी विस्तारक यांच्या मानसिकतेत बदल करण्याची आणि शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसविलेले नांगरणीचे भूत उतरविण्याची!

भारतात ऊस व केळीचे अनुक्रमे ५१ लाख व ८.८४ लाख हेक्टर क्षेत्र तर महाराष्ट्रात हेच क्षेत्र अनुक्रमे ११ व ०.६० लाख हेक्टर आहे. यातील खोडवा पिकाचे सर्वसाधारण प्रमाण ४० ते ४५ टक्के इतके आहे. खोडवा पीक काढल्यानंतर उसाच्या क्षेत्रात हेक्टरी २५ मे.टन (१० मे. टन पाचट + अंदाजित १५ मे. टन जमिनीतील बुडखे) सेंद्रिय पदार्थ मिळतो. केळी क्षेत्रात ६ × ५ फूट अंतरावर हेक्टरी ३६०० झाडे बसतात. प्रति झाड पाने व जमिनीतील अवशेषाचे वजन २५ कि.ग्रॅ. धरले तरी हेक्टरी ९० मे. टन जैव अवशेष मिळतात. हे सर्व जैव अवशेष (सेंद्रिय पदार्थ) जे की फुकटात मिळतात, पूर्णपणे जमिनीत मूळस्थितीत कुजविले तर जमिनीतील सेंद्रिय कर्ब पातळी वाढण्यास मदत होते. तसेच आहे त्या ठिबक सिंचनाचा वापर करून दूर अंतरावरील पिकाची रोपे, बियाणाचे टोकन ड्रीपर जवळ गरजेएवढे पाचट बाजूला सारून करता येते. फळझाडांची लागवड करावयाची असेल, तर ड्रीपरजवळ पहारीने गरजेएवढे छिद्र पाडून व त्यात सुपर फॉस्फेट + शेणखत भरून रोपे, कलमाची लागवड करता येते. लागवडीनंतर पाणी देणे व सर्व क्षेत्र पुन्हा सेंद्रिय पदार्थाने आच्छादित करणे गरजेचे आहे. जर ऊस किंवा केळी पीक कीड-रोगांनी बाधित झाले असेल, तर अशा प्रकारची पीक प्रात्यक्षिके घेतेवेळेस ऊस किंवा केळी वर्गात मोडणारे पुढील पीक निवडू नये किंवा प्रात्यक्षिक घेणे टाळावे. अशा प्रकारची अनुदानित पीक प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर, कृषी संशोधन केंद्रावर घेतली तर शेतकऱ्यांचा मशागत, आंतरमशागत, तणनियंत्रण, जमिनीची धूप थांबविणे, निचराप्रणाली सुधारणे, जलसंधारण, जमिनीतील मित्र बुरशीचे प्रमाण वाढल्याचे शत्रू बुरशीचे नैसर्गिक नियंत्रण होणे, मायकोऱ्हायझाचे प्रमाण वाढवून स्फुरदाचे शोषण होणे, जमीन क्षारपड न होणे यांसारख्या बाबीचा शेतकऱ्यांना फायदा होतो. जमिनीत अनुकूलता निर्माण झाल्यामुळे सूक्ष्म जिवाणूंच्या कार्यक्षमतेत वाढ होते. परिणामी बाहेरून मूलद्रव्ये, सूक्ष्म मूलद्रव्ये, वाढवर्धके, जिवाणू खते, ॲमिनो ॲसिड फवारणीची गरज भासत नाही. पिकात प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे कीड-रोगास पीक बळी पडत नाही. परिणामी, रासायनिक औषधावरील खर्चात खूप मोठी बचत होते. मात्र यासाठी गरज आहे ती अशा प्रकारच्या पीक प्रात्यक्षिकांना ज्ञानाश्रय, राजाश्रय आणि लोकाश्रयाची!

डॉ. गुरुनाथ थोन्टे   ९४२१६९५४४८  (लेखक कृषी विभागातील सेवानिवृत्त तंत्र अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com