साडेअकरा हजारांवर शेतकऱ्यांची तूर पडून

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

चिखली, जि. बुलडाणा ः शासनाने आता तूर खरेदीसाठी १५ मे पर्यंत मुदत दिलेली आहे. तालुक्‍यात तूर विक्रीसाठी जवळपास १५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. आजवर या यादीतील केवळ ३ हजार ३०० शेतकऱ्यांचे मोजमाप झाल्याचे कळते. आता उर्वरित साडेअकरा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तुरीचे करायचे काय? हा मोठा प्रश्‍न या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने या खरेदी केंद्रांना गतीमान करून आणि मुदतवाढ देऊन सर्व शेतकऱ्यांची तूर मोजून घ्यावी, अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.  केंद्र सरकारच्या तूर आयात करण्याच्या निर्णयाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टांनी पिकविलेल्या तुरीला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने राज्यासह जिल्ह्यातील आणि तालुक्‍यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने मोठा गाजावाजा करून शासकीय तूर खरेदी केंद्र नाफेडमार्फत सुरू केल्याचा गवगवा केला आहे. मात्र या केंद्रावर शेतकऱ्यांचे होत असलेले हाल पाहण्यासाठी राज्यकर्त्यांना वेळच नसल्याचे दिसून येत आहे. कधी बारदाना नसल्याचे कारणाने, तर कधी माल साठविण्यासाठी गोडाऊनला जागा नसल्याच्या कारणाने खरेदी बऱ्याच काळासाठी बंदच राहते.

गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी तूरडाळीचे भाव दोनशे रुपये प्रतिकिलोपर्यंत गेल्यानंतर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर केंद्र शासनाने विदेशातून मोठ्या प्रमाणात तूर डाळ आयात केली. या आयातीमुळे देशातील शेतकऱ्यांनी शासनाच्या आवाहनानुसार मोठ्या प्रमाणात डाळवाणाची लागवड करून उत्पन्नही चांगलेच घेतले. मात्र गेल्या दोन वर्षापासून तुरीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात खाली आले आणि शेतकऱ्यांनी वर्षभर राब-राब राबून पिकविलेल्या तुरीचा खर्चही भरून निघेनासा झाला.

शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर शासनाने गेल्या वर्षांपासून नाफेडमार्फत हमीभावाने (बोनससह) शासकीय तूर खरेदी केंद्रे मोठा गाजावाजा करून सुरू केली. मात्र या शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याची ओरड सातत्याने होत आहे. 

गेल्या दोन दिवसांपूर्वी चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी प्रकल्पावरील शासकीय तूर खरेदी केंद्रावर चांगलाच गोंधळ झाला होता. आता शनिवार (ता. १२) पासून गोडाऊन उपलब्ध नसल्याच्या कारणाने खरेदी बंद राहणार असल्याची सूचना या केंद्रावर शेतकऱ्यांसाठी लावण्यात आलेली आहे.

सोबतच या शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासारखी मुलभूत सुविधादेखील उपलब्ध नाही. त्यामुळे शहरापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावरील या केंद्रावर शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे शासनाने तूर खरेदीसाठी येत्या १५ मे पर्यंतचीच मुदत दिलेली असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या घरामध्ये तूर तशीच पडून असल्याने या तुरीचे करायचे काय हा प्रश्‍न सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे शासनाने एकतर आता या तूर खरेदीची मुदत वाढवून देऊन सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी बारदाना, गोडाऊन आणि पुरेसे मनुष्यबळ याची व्यवस्था करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून व्यक्‍त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com