आताच असं तर पावसाळ्यात कसं होणार..?

आताच असं तर पावसाळ्यात कसं होणार..?
आताच असं तर पावसाळ्यात कसं होणार..?

सातारा ः दुष्काळात जनावरं साभाळंन जड गेले नाही, तेवढी आता जात आहे. दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटातही जनावरे छावणीत ठेवून जगवली पण सरकारच्या दुर्लक्षामुळे  जवळपास लिटरमागं दहा रुपये कमी मिळत असल्यानं दुधामधला गोडावा गेलाय. जनावर कवडीमोल किंमतीनं विकण्याची एेळ आली, उन्हाळ्यात दुधाची ही अवस्था तर पावसाळ्यात कसं होणार, अशी धास्ती सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे. 

सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव हे दुष्काळी तालुके आहेत. दुष्काळात पिके घेता आली नाही तर दुधावर तरी घर चालावं यासाठी मोठ्या प्रमाणात गाई-म्हशीचे संगोपन केले जाते. २०१२-१३ मधील दुष्काळात जिल्ह्यात शंभरावर छावण्या उभारून लाखांवर जनावरांचा त्यात सांभाळ करण्यात आला होता. मात्र, आता सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे. ज्या जनावरांच्या दुधावर संसार उभा केला, चालवला, मुलांना शिक्षण दिले, लग्न केली, घरे बांधली तो व्यवसाय आता पुरता अडचणीत सापडला आहे. 

केंद्र सरकार दुप्पट उत्पादनाच्या वल्गना करत असताना त्याच उत्पादनास दर देता येत नाही. जमिनीत नाय काय पिकलं तरी दुधाच्या उत्पादनातून घर चालवता येतं या अनुभवामुळे जिल्ह्यातील ६० ते ६५ टक्के शेतकऱ्यांकडून कमी अधिक प्रमाणात दूधदुभत्या जनावरांचे संगोपन केले जाते. दूध दरातील घसरणीमुळे नुसत्या शेणखतासाठी तोट्यात दूध धंदा करण्याची वेळ आली आहे.

जनावरांसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा दर वाढला आहे. यामध्ये खाद्याच्या किमतीन वर्षभरात पोत्यामागे १५० ते २०० रुपयांने वाढले असताना दुधाचे दर मात्र मागील अकरा महिन्यांत दहा रुपये कमी झाले आहेत.

सध्या गाईच्या दुधास १७ ते १८ रुपये दर मिळत आहे. या दरातून भांडवली खर्चही निघत नाही. हा भांडवली खर्च निघण्यासाठी लिटरमागे चार ते पाच रुपयांची गरज आहे तर दूध धंदा टिकण्यासाठी किमान लिटरला २५ ते २७ रुपये दिला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

मंदीत संधी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍यासह कऱ्हाड, पाटण, वाई, सातारा या तालुक्‍यांत शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. नोकरीच्या मागे न लागता अनेक उच्च शिक्षित तरुण या व्यवसायात आले आहेत. यामुळे जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाचा पसारा वाढला आहे. मात्र, दूध दरातील घसरणामुळे या व्यवसायाला घरघर लागली आहे. उन्हाळ्यात दर मिळत नसेल तर पावसाळ्यात कसा मिळणार यामुळे अनेक शेतकरी गाईची विक्री करू लागली आहेत. या शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा मंदीत संधी या युक्तीप्रमाणे जनावरांच्या व्यापाऱ्यांकडून उचलला जात आहे. लाखावर किमतीच्या गाईस ४० ते ५० हजारांच्या आत मागितल्या जात आहेत. याच गाई दुसऱ्या शेतकऱ्यांना जास्त किमतीने विकत खिसे भरले जात आहेत. या प्रकारामुळे देणारा आणि घेणारा दोन्हीही शेतकरी नागावले जात आहेत.

दुग्धजन्य पदार्थाचे दर टिकून दुधाच्या दरात दहा रुपयांची घसरण झाली असतानाही श्रीखंड, आम्रखंड, लस्सी, तूप तसेच ग्राहकांना पॅकिंग करून दिले जाणाऱ्या दुधाच्या किमतीत घट झालेली नाही. दुधाला दर मिळत नसल्यामुळे दूध उत्पादक अडचणीत आला असतानाही दूध घेणारा ग्राहकांनाही जास्त किमतीने दूध घ्यावे लागत असल्याने दोन्ही बाजूने दुधातील गोडवा कमी झाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये धास्ती उन्हाळ्यात साधारणपणे दुधाचे उत्पादन कमी मिळत असते. तसेच, दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढत असल्याने दुधाच्या दरात तेजी राहाते असा शेतकऱ्यांचा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र, सध्या शासनाच्या दुलर्क्षामुळे ऐन उन्हाळ्यात दुधाच्या दराची ही बोंबाबोब झाली आहे. पावसाळ्यात दुधाचे उत्पादन वाढणार असल्याने दुधाचे दर कसे राहतील याची धास्ती मनात बसली असल्याचे शेतकरी सांगतात. दूध उत्पादन वाढ व दरातील घसरणीमुळे जनावरे विकाण्याशिवाय पर्याय दिसत नसल्याचे शेतकरी बोलू लागले आहेत.

जिल्ह्यातील संकलन

सातारा जिल्ह्यात दैनंदिन १८ लाख ५९ हजार दुधाचे संकलन होते. यामध्ये सहकारी संस्थेकडे १२ लाख १७ हजार, मल्टीस्टेट संस्थाकडे चार लाख २९ हजार तर खासगी संस्थांकडे दोन लाख १३ हजार लिटर दूध संकलन होते. एकूण दुधापैकी ६५ टक्के गाईचे तर ३५ टक्के म्हशीचा दुधाचा समावेश आहे.

शेतीला पूरक म्हणून कुटुंबातील सर्व सदस्य दुग्ध व्यवसाय करतो. लहान मोठी मिळून दहा गाई आहेत. दिवसाकाठी ५० ते ५५ लिटर दुधाचे उत्पादन मिळत आहे. सध्या मिळत असलेल्या दरात दूध व्यवसाय चालविणे जिकिरीचे झाले आहे. जनावरांसाठी लागणारे खाद्य व वैरणीचाही खर्च निघत नाही. तोट्यात व्यवसाय सुरू आहे. हातात शिल्लक राहण्यासाठी शासनाने २७ ते २८ रुपये प्रतिलिटर दर दिला जावा.  - निता जांभळे, जांभगाव, ता. जि. सातारा.

माझ्याकडे लहान मोठी मिळून १२ जनावरे आहेत. दररोज ४५ ते ५० लिटर दूध डेअरीला जाते. सध्या मिळत असलेल्या दरातून भांडवल निघत नाही. खाद्य, मजुरी, औषधे याचे दर वाढत असतानाही दुधाचे दर मात्र कमी नाहीत. सध्या दुसरा पर्याय नसल्याने जनावरे जगवत आहे. - तानाजी जाधव, मठाची वाडी, ता. फलटण.

दुधासह एकूण शेती व्यवसायासंदर्भात शासनाची धोरणे चांगली नाहीत. सध्या बाजारात कोणत्याही शेतमालास चांगले दर नाहीत. माझ्याकडे आठ जनावरे असून ३० ते ३५ लिटर दुधाचे उत्पादन मिळत आहे. किमान शेतकरी जगण्यासाठी दुधास २५ ते २७ रुपये दर द्या. - बाळासाहेब नलगे, बनवडी, ता. कोरेगाव.

ज्या दूध व्यवसायाने कुटुंबाची अार्थिक घडी बसवली होती. तो व्यवसाय टिकवण्यासाठी घरातील पैशांचा वापर करावा लागत आहेत. खाद्य दर वाढले आहेत. डॉक्‍टरच्या गोठ्या भेटीस ५०० रुपये फी घेतली जाते. दुधाला मिळणारा दर खर्चाचा मेळ बसत नाही. इच्छा नसतानाही गोठ्यातील सहा गाईंची विक्री केली आहे. दैनंदिन १२५ लिटर वरून ७० लिटर दुधाचे उत्पादन आले आहे.  - सुनील धुमाळ, आदर्की, ता. फलटण.

माझ्याकडे गोठ्यात गाई-म्हशी मिळून आठ जनावरे आहे. या जनावरांचे संगोपन करताना दररोज २५० ते ३०० रुपये तोटा होत आहे. दूध दर कमी झाल्यामुळे हा व्यवसाय परवडत नसल्याने मन नाराज झाले आहे. सध्या जनावर दुधासाठी नाहीतर शेणखतासाठी ठेवण्याची वेळ आली आहे. सरकारने दुधाला २६ ते २८ रुपये प्रतिलिटर द्यावा. - नागेश धुमाळ, आदर्की, ता. फलटण.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com