अमरावती : जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. त्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी भरपाईकरिता २९८ कोटी ९१ लाख ७९ हजार ३६० रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यातील १५८ कोटी २२ लाख ३३ हजार रुपयांची मदत वरुड वगळता उर्वरित १३ तालुक्यांना वितरित करण्यात आली.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली होती. दहा दिवसांच्या कालावधीत पडलेल्या या पावसामुळे तीन लाख ७४ हजार ८०४ शेतकऱ्यांच्या तीन लाख ७३ हजार १९ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. बागायती पिकांसाठी बाधित ४५२.१२ हेक्टरमध्ये हेक्टरी आठ हजार रुपये या निकषाप्रमाणे ३६ लाख १६ हजार ९६० रुपये, तर बहुवार्षिक पिकांसाठी ७८ हेकटरला १८ हजार रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे १४ लाख ४ हजार, असे एकूण २९८ कोटी ९१ लाख ७९ हजार रुपयांच्या मदतीची आवश्यकता आहे. यापैकी ७२ कोटी ४० लाख ९३ हजार रुपयांचा निधी शासनाने २० नोव्हेंबरला दिला. त्यानंतर सोमवारी (ता. १६) दुसऱ्या टप्प्यातील १५८ कोटी २२ लाख ३३ हजार रुपयांचा निधी सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आला.
अमरावती तालुक्यात ७.९७ कोटी, भातकुली ६.५० कोटी, तिवसा २.९० कोटी, चांदूर रेल्वे ४.१४ कोटी, धामणगावरेल्वे ६.४२ कोटी, नांदगाव खंडेश्वर ६.८३ कोटी, मोर्शी १.८० कोटी, चांदूरबाजार ५.६९ कोटी, दर्यापूर ६.४८ कोटी, अंजनगावसूर्जी ६.०२ कोटी, धारणी ४.०५ कोटी व चिखलदरा तालुक्यातील ३.९० कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना आवश्यक मदतनिधीच्या तुलनेत ९४ टक्के निधी शासनाने उपलब्ध केला आहे. लगेच तो शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केला जाईल. अद्यापपर्यंत दोन टप्प्यांत २३०.६३ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असला, तरी ६८ कोटी २ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा निधी जिल्ह्यास अप्राप्त आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.