सोलापुरात कृत्रिम पाऊस नाहीच; विमाने ढगांच्या अभ्यासासाठी

कृत्रिम पाऊस
कृत्रिम पाऊस

सोलापूर : कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आवश्‍यक असलेल्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी सोलापूर येथे प्रयोग सुरू आहे. सोलापुरातील विमानतळावरील दोन्ही विमाने आणि सिंहगड संस्थेतील रडार केवळ त्यासाठी उभारले गेले आहे, असे स्पष्टीकरण केंद्र शासनाच्या भारतीय उष्णदेशीय हवमान विज्ञान संस्थेच्या (आयआयटीएम) प्रमुख वैज्ञानिक तथा प्रकल्प संचालिका डॉ. तारा प्रभाकरन यांनी केल्याने राज्य शासनाने जाहीर केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.  गेल्या काही महिन्यांपासून सोलापूर येथे कृत्रिम पावसासाठी उपयुक्त असलेल्या ढगांचा संशोधनात्मक अभ्यास सुरू आहे. पुण्याच्या ‘आयआयटीएम’ या संस्थेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये त्यासाठी रडार उभारण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. प्रभाकरन म्हणाल्या की, या प्रकल्पासाठी जवळपास २५ शास्त्रज्ञांची टीम काम करीत आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पातून जवळपास ८३ नमुने गोळा केले आहेत. यंदाही जवळपास १५० नमुने गोळा करण्याचे काम आम्ही करणार आहोत. या प्रयोगासाठी सिंहगड महाविद्यालयामध्ये सी बँडचे रडार बसविले आहे. सोलापूरसह परिसरातील २०० किलोमीटर परिसरामध्ये असलेल्या ढगांचा अभ्यास त्या माध्यमातून होणार आहे. ढग आहेत की नाहीत किंवा ते कशा प्रकारचे आहेत, याची सगळी माहिती हे रडार देते. त्यानुसार सोलापूर विमानतळावर असलेल्या दोन विमानांच्या साह्याने हा प्रयोग केला जात आहे.  एक लहान व एक मोठे विमान तिथे आहे. लहान विमान क्‍लाउड सीडिंगचे (ढगांचे बीजारोपण), तर मोठे विमान क्‍लाउड सीडिंग झाल्यानंतर रिसर्च एअरक्राफ्ट नेमके काय होते, याची माहिती घेण्याचे काम करीत आहे. तसेच, आकाशात रोज एक बलून सोडून हवेचा दाब, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा याचा अभ्यास करण्यात येतो आहे. गेल्या काही दिवसांत आम्ही त्यासाठी दोन दिवस केवळ चाचणी घेतली. प्रत्यक्षात पाऊस पाडण्याचा त्यात काहीही संबंध नाही, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच, सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेला हा संशोधनात्मक अभ्यास सप्टेंबरपर्यंत चालणार आहे, असेही ते म्हणाल्या.

कृत्रिम पावसाबाबत संभ्रम सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भ अजूनही पावसासाठी तहानलेलाच आहे. त्यातच औरंगाबाद, शेगाव या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडणार असल्याची माहिती पंधरवड्यापूर्वी शासनाकडून दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह सगळ्यांचेच डोळे कृत्रिम पावसाकडे लागले होते. गेल्या आठवड्यापासून वातावरणही त्यासाठी काहीसे पोषक आहे. शासकीय सूत्रांकडूनही ‘आयआयटीएम’च्या या यंत्रणेकडूनच हा प्रयोग होईल, असे बोलले जात होते. पण, आता या प्रकल्पाच्या प्रमुखांनीच कृत्रिम पावसाबाबतचे नेमके स्पष्टीकरण दिल्याने शासनाच्या पाऊस पाडण्याबाबतच्या निर्णयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com