जायकवाडीला पाणी सोडण्याला नगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध

पाणी सोडायला तालुरक्‍याचा विरोध नाही. मात्र अकोले तालुक्‍यात गंभीर दुष्काळ आहे. पाणी आमच्या तालुक्‍यात पडलं, पण आम्हीच, त्यापासून वंचित राहत आहोत. आता पाणी काढून घेणं म्हणजे येथील शेतकऱ्यावर दुहेरी अन्याय आहे. हा अन्याय शेतकरी सहन करणार नाही. अकोले तालुक्‍यात दुष्काळ जाहीर होईपर्यंत लढा सुरुच राहिल.'' - डॉ. अजित नवले, नेते किसान सभा तथा समन्वयक, शेतकरी संघर्ष समिती,
जायकवाडी
जायकवाडी

नगर ः समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार नगर जिल्ह्यामधील भंडारदरा, मुळा धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याची तयारी सुरू आहे. मात्र, ‘‘नगर जिल्ह्यामध्येच तीव्र दुष्काळ असून, पाणी सोडू दिले जाणार नाही,’’ असा इशारा देत नगर जिल्ह्यामधील सर्वपक्षीय नेत्यांनी पाणी सोडण्याला जोरदार विरोध सुरू ठेवला आहे. त्यामुळे पाणी सोडण्यावरून नगर-मराठवाडा संघर्ष पेटणार आहे. यात प्रशासन आणि नेत्यांची मात्र गोची होत आहे. नगर जिल्ह्यामधील भंडारदरा, मुळा धरणाच्या पाणलोटातील पावसामुळे जायकवाडीत प्रकल्पात पाणी जमा होते. जायकवाडीत नाशिक जिल्ह्यातूनही पाणी जाते. यंदा नगर जिल्ह्यामध्ये पाऊस नाही. जोरदार पाऊस पडणाऱ्या अकोले तालुक्‍यातही यंदा पाऊस नाही. सुरवातीलाच झालेल्या पावसाने भंडारदरा, निळवंडे धरण भरले असले तरी मुळात फारसे पाणी साठले नाही. मात्र जायकवाडी धरणावरही मराठवाड्यातील मोठा भाग अवलंबून आहे. त्यामुळे पासष्ठ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणी असल्यास समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार जायकवाडीत पाणी सोडण्यात येते. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महमंडळाने जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने पाणी सोडण्याची तयारही केली आहे. मात्र दरवेळीच पाणी सोडण्याचा विषय आला की मराठवाडा व नगर असा संघर्ष तयार होतो. ‘‘या वर्षी नगर जिल्ह्यामध्येही पाऊस नसल्याने दुष्काळाची गंभीर स्थिती आहे. जायकवाडीत सध्या पुरेसे पाणी असल्याने नगरमधून पाणी सोडण्याची गरज नाही,’’ असे सांगत नगर जिल्ह्यामधील नेत्यांनी पाणी सोडण्याला विरोध केला आहे. पाणी सोडणार असल्याचे कळताच नेवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी गुरुवारी मुळा धरणावर ठिय्या मांडून विरोध केला होता. याशिवाय शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनांना पाणी सोडण्याला विरोध केला आहे. कालच आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर तालुक्‍यातील अशोक नगर येथे रास्ता रोको अंदोलन केले. भंडारदरातून पाणी सोडल्यास तीव्र लढा उभारणार असल्याचे अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वीच सांगितले होते. शनिवारी भंडारदरा धरणातून पाणी सोडत असल्याच्या निषेर्धार्थ अकोले येथे बंद पाळण्यात आला. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनीही पाणी सोडल्यास गंभीर परिणाम होतील, असे सांगितले आहे. शनिवारी राहात्यात शिवसेनेने पालकमंत्री राम शिंदे यांचा ताफा अडवला. त्यामुळे नगर जिल्ह्यामधील धरणातून पाणी सोडण्याला विरोध करत सगळेच नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे पाणी सोडतेवेळी संघर्ष होण्याची शक्‍यता आहे. सत्ताधारी नेत्यांची मात्र यामुळे गोची झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com