निर्यातबंदी न उठवल्यास राज्यात कांदा बाजार बंद पाडणार: अनिल घनवट

अनिल घनवट
अनिल घनवट

नगर ः कांद्यावर शासनाने निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने ५ आक्टोबरपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी न हटवल्यास सहा आक्टोबरपासून राज्यात कांदा बाजार बंद करण्यात येईल, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले. या संदर्भात रविवारी नगरला संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. शेतकऱ्यांनी कांद्याची वाहतूक करू नये असे त्यांनी सांगितले.  अनिल घनवट यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की सरकार कोणतेही असो निवडणुका जिंकण्यासाठी केवळ शेतकरी आणि कांदा उत्पादकांचाच वापर करत असल्याचे अनेक वर्षांपासून स्पष्ट झाले आहे. कांद्याचे दर वाढले की शहरातील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांच्या डोळ्यात पाणी येते आणि सरकारही मोठ्या आत्मियतेने या लोकांच्या डोळ्यातील पाणी पाहते. पण, कांदा अल्प दराने विकला, फेकून द्यावा लागला, नैसर्गिक नुकसान झाल्यावर मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यातून येणारे पाणी पहायला अजून तरी सरकारला वेळ भेटला नाही.  अनेक वर्षांपासून कमी दरात शेतमाल विकत नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्याला आता कुठे चांगला दर येऊ लागला आणि दोन पैसे मिळण्याची संधी मिळाली की लगेच सरकारने अध्यादेश काढून कांदा आयात, कांदा निर्यातबंदी, कांदा साठवणुकीवर मर्यादा, कांदा वाहतूक क्षमतेवर मर्यादा घालून शेतकरी व व्यापाऱ्यांना हैराण केले आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांच्या व्यापार स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. ज्या व्यापाऱ्यांनी कांदा निर्यातीचे करार केलेले आहेत, त्यांचे बोटीवर चढणारा कांदा रोखण्यात आला आहे. सरकारच्या या वृत्तीमुळे शेतकरी हक्काची बाजारपेठ गमावून बसले आहेत. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी ५० रुपये दर मिळत असलेला कांदा थेट पंचवीस रुपयावर आला आहे. त्यामुळे कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. जर ५ आक्टोबरपर्यंत निर्यातबंदी उठवली नाही तर ७ आक्टोबरपासून राज्यातील कांदा बाजार बंद पाडणार असल्याचे घनवट यांनी सांगितले. 

त्यासंदर्भात रविवारी (ता. ६) नगर येथे सर्व व्यापारी, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांची बैठक घेणार असल्याचेही घनवट यांनी सांगितले. कांदा बाजार बंद पाडणार असल्याने त्या दिवशी संघटनेचे कार्यकर्ते बाजार समितीत थांबून राहतील. शेतकऱ्यांनीही कांदा वाहतूक करू नये, असे घनवट म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com