‘अविश्वास’ला विश्वास ठरावाने उत्तर

आघाडी सरकारमध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला असताना, विलासरावांनी सरकावरचा विश्वासदर्शक ठराव चर्चेविना मंजूर करून घेतला होता. ते जर वैध असेल, तर हा विश्वासदर्शक ठरावही वैधच आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
‘अविश्वास’ला विश्वास ठरावाने उत्तर
‘अविश्वास’ला विश्वास ठरावाने उत्तर

मुंबई : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा विरोधकांचा डाव सत्ताधारी भाजपने शुक्रवारी (ता. २३) उधळून लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अध्यक्षांच्या बाजूने विश्वास प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानाने मंजूरही करण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी सरकारच्या या कुरघोडीचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे विधानसभेचे अध्यक्ष असतानाही एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाप्रमाणे वागत असून, मनमानीपणे कामकाज रेटत आहेत. विरोधकांचा आवाज दाबून सदस्यांमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्नही करत आहेत, आदी कारणे देत विरोधकांनी श्री. बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती. मात्र, विरोधकांना गाफील ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांच्या बाजूने विश्वास ठराव आणून विरोधकांवर कुरघोडी केली. सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. त्यानंतर आवाजी मतदानाने सभागृहात हा ठराव मंजूर करण्यात आला. विरोधकांनी त्यानंतर विधानसभेत गोंधळ घालण्यास सुरवात केली. मात्र, तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी विरोधकांकडे दुर्लक्ष करत आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर केला. विरोधकांच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा होऊन मतदान घ्यावे, अशी विरोधकांची इच्छा होती; मात्र अतिशय चपळाईने सरकारने ही रणनीती आखल्याचे स्पष्ट झाले.  विरोधकांकडून अध्यक्षांवर अविश्वासदर्शक ठराव आम्ही सभागृहात ५ मार्च रोजी आणला होता. हा प्रस्ताव चर्चेला घ्यावा, अशी आम्ही मागणी केली होती. योग्य वेळी निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले होते; परंतु सरकारने तो अविश्वास ठराव चर्चेला न आणता ‘विश्वास’ ठराव मांडला, असे म्हणत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारच्या या खेळीला आपला आक्षेप नोंदवला. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहात एकच गोंधळ घातल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘यापूर्वी सभागृहात असे प्रकार झालेले आहेत. काँग्रेसच्या काळात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारवर विश्वासदर्शक ठराव मांडला होता आणि तो मंजूर केला होता. आताही नियमानुसार कामकाज झाले आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकत नाही’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपला ‘विश्वास’ ठराव रेटून धरला. यानंतर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांची परस्पर विरोधी घोषणाबाजी पाहायला मिळाली. त्यानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.  विरोधकांचा सभागृहात ठिय्या विरोधकांची चर्चेची तयारी असतानादेखील कामकाज होऊ न दिल्यामुळे विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानसभेच्या सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. विरोधी पक्षांच्या आमदारांचा २९३ चा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे सुनील केदार हे उभे राहिले होते. मात्र, या वेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने लोकशाहीचा खून केला असून, आमची सभागृहात चर्चा करायची तयारी असतानाही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले, असा आरोप विरोधकांनी केला. प्रस्तावाच्या वेळी सत्ताधारी आमदारांनीच गोंधळ घातला आणि या गोंधळात विधेयक मंजूर केले. त्यानंतर विरोधकांचा २९३ चा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर चर्चा करण्याऐवजी पळ काढल्याचा आरोप करत सभागृहातच विरोधकांनी बराच वेळ ठिय्या आंदोलन केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com