कांदाकोंडी टाळणेच योग्य 

प्रशासनाने योग्य नियोजनातून कोरोना नियमांची अंमलबाजावणी करून बाजार समित्या सुरु ठेवणे आवश्‍यक आहे. यामुळे शेतकऱ्यांची कांदाकोंडी होणार नाही आणि बाजार समित्या सुरु झाल्यानंतर एकच गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यताही कमी होईल.
onion
onion

पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात १२ ते २३ मे दरम्यान कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कांदा मार्केटवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य नियोजनातून कोरोना नियमांची अंमलबाजावणी करून बाजार समित्या सुरु ठेवणे आवश्‍यक आहे. यामुळे शेतकऱ्यांची कांदाकोंडी होणार नाही आणि बाजार समित्या सुरु झाल्यानंतर एकच गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यताही कमी होईल.  नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.१०) कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात म्हटले आहे, की ‘‘१२ ते २३ दरम्यान जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद राहतील. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रीत पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहील. याबाबत समन्वयाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांची राहील.’’  वरील आदेशाचा आशय पाहता, नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागणार आहे. आधीच वाढत्या कोरोना संसर्गामुळे बाजार समित्या कधी बंद तर कधी चालू होत्या. त्यात वरीलप्रमाणे सक्तीची बंदी लादली तर कांदाकोंडी आणखी तीव्र होईल. व्यापाऱ्यांना मजूर टंचाई व आनुषंगिक व्यवस्थापन करणे अवघड होते. आज माल खरेदी करून उद्या परवा विक्री करणारे बरेच व्यापारी सुद्धा मार्केट सुरू राहावे या मताचे आहेत. उपरोक्त कालावधीत (विकेंद्रीत विक्री) शिवार खरेदी सुरू राहील. पण शिवार खरेदीत शेतकऱ्याची सौदा शक्ती कमी होते. शिवार खरेदीचा बेंचमार्क दर ठरवण्यासाठी काही बाजार समित्या सुरू राहणे गरजेचे आहे. बाजार समित्यांतील लिलाव प्रक्रिया किंमत निश्‍चिती व शिवार खरेदीसाठीही उपयुक्त ठरत असते.  या मुद्द्यांचा विचार व्हावा 

  • बाजार समित्यांत दररोज सुमारे दहा हजार वाहनांद्वारे दीड लाख क्विंटल कांद्याची आवक होते. 
  • दहा दिवस बाजार बंद असणे म्हणजे एक लाख वाहने साचून राहणे आणि त्यापुढील दहा दिवसांत एकूण दोन लाख वाहनांची दाटी होणे, पर्यायाने संसर्गवाढीला आमंत्रण मिळेल. 
  • आजघडीला देशाच्या रोजच्या कांदा खपाच्या तीस टक्के मालाची विक्री एकट्या नाशिक जिल्ह्यातून होते. ऐन आवक हंगामात बाजार समित्या बंद ठेवणे म्हणजे कांदा मार्केटचा श्वास रोखण्यासारखे आहे. 
  • वाहन संख्या नियंत्रणात ठेऊन, फिजिकल डिस्टंसिंग कडक करून बाजार सुरळीत ठेवणे शक्य आहे. उदा. एखाद्या बाजार समितीत जर रोजची आवक एक हजार वाहनांची असेल तर तिथे पाचशे वाहनांना परवानगी द्यावी व कोरोना नियमांची अंमलबजावणी करून लिलाव सुरू ठेवावेत. 
  • ‘पॅनिक सेलिंग’ टाळा  येत्या १५ सप्टेंबरअखेरपर्यंत म्हणजे खरिपातील नवे पीक येण्यापूर्वी एकूण देशांतर्गत आणि निर्यात मागणीच्या तुलनेत यंदाचा एकूण पुरवठा पाहता सध्याचे रेट किफायती नाहीत. त्यामुळे कडक लॉकडाऊन किंवा अन्य कुठल्याही दबावाला बळी पडू नये आणि जोपर्यंत बाजारभाव किफायती पातळ्यांवर जात नाही, तोपर्यंत उन्हाळ कांद्याची विक्री रोखून धरावी. पॅनिक सेलिंग करू नये. मात्र, आर्थिक अडचण, कांदा ठेवण्यास जागा नसणे, टिकवण क्षमतेबाबत खात्री नसणे या कारणांमुळे काही शेतकऱ्यांना विक्री करण्याशिवाय पर्याय नाही. अशा गरजवंतांसाठी आपण थांबणे म्हणजे एकमेकांना मदत करण्यासारखेच आहे. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com