सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवा

बाजार समित्या
बाजार समित्या

पुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या उत्पादनामुळे बाजारातील आवक मंदावली आहे. यामुळे ग्राहकांना चढ्या भावाने खरेदी करावी लागत असल्याने राज्यातील बाजार समित्या शासकीय आणि साप्ताहिक सुटींच्या दिवशीही सुरू ठेवाव्यात, असे आदेश पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी काढले आहेत. या आदेशामुळे पणन संचालनालय शेतकऱ्यांसाठी की ग्राहकांसाठी काम करीत आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.  राज्यात अवकाळी पावसाने शेतीच्या आणि पिकांच्या मोठ्या नुकसानीमुळे खरीप आणि रब्‍बी हंगाम लांबल्यामुळे बाजारपेठेत कमी-अधिक प्रमाणात भाजीपाल्याची आवक सुरू आहे. यामुळे विविध भाजीपाल्यांसह पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारपेठेपेक्षा किती तरी जास्त पटींनी किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. बाजारातील आवक वाढावी आणि ग्राहकांना चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागू नये, यासाठी पणन संचालनालयाने शासकीय आणि साप्ताहिक सुट्यांच्या दिवशी बाजार समित्या सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  या आदेशाबाबत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘ग्राहकांना चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागू नये, या उद्देशाने जर पणन संचालनालय काम करत असेल, तर ते चुकीचे आहे. सध्या शेतमालाचे उत्पादनच घटले असून, शेतातच पीक नाही तर शेतकरी काय आकाशातून भाजीपाला आणणार आहे का? बाजार समित्यांना सुटी नकोच अशी आमची नेहमी भूमिका राहिली आहे. ज्या अडत्यांना सुटी घ्यायची त्यांनी घ्यावी, सुटीच्या दिवशी त्यांचे गाळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी द्यावेत, असे आदेश पणन संचालनालयाने काढावेत. केवळ ग्राहकहित डोळ्यांसमोर न ठेवता शेतकरीहित डोळ्यांसमोर पणन विभागाने ठेवावे. शेतकरीहितासाठी तुम्हाला पगार दिला जातो, हे विसरू नये,’’ असे श्री. पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com