जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित आहेत. अर्ज करूनही त्यावर कार्यवाही रखडली आहे. अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे आहेत. त्याची दुरुस्ती केली जात नसल्याची स्थिती आहे.
जळगाव जिल्ह्यात सुमारे ५८ हजार शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. त्यात चाळीसगाव तालुक्यातील सुमारे १७ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तलाठी या योजनेबाबत आपली काहीएक जबाबदारी नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना परतावून लावतात. ग्रामीण भागातील सीएससी (कॉमन सर्व्हीस सेंटर) कोरोना व इतर कारणांमुळे व्यवस्थित कार्यरत नाहीत. ५० टक्के केंद्रही कार्यरत नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी येवून किसान सन्मान निधीसंबंधीच्या पोर्टलवरील माहितीत दुरूस्ती करण्याची वेळ आली आहे.
आधार क्रमांकांसह बँक खाते क्रमांक चुकल्याने सुमारे ३० ते ३२ हजार शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. तर अनेक नवे अर्जदार शेतकरी प्रशासन किंवा तहसिल कार्यालयातील संबंधित नायब तहसीलदार कार्यालय कार्यवाही करीत नसल्याने या योजनेचा लाभ घेवू शकत नाहीत.
बँक खाते क्रमांक या योजनेच्या पोर्टलवर चुकल्याचे अनेक प्रकार आहेत. ही चूक प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून झाली आहे. दुरुस्तीचे अधिकार फक्त संबंधित पोर्टलवर दुरुस्तीसंबंधीचे लॉगईन, पासवर्ड प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांकडे आहेत.
जिल्हास्तरावरील जिल्हा माहिती केंद्रात (डीआयसी) देखील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाहीत. नायब तहसिलदारांकडे या दुरुस्तीचे अनेक अर्ज आहेत. त्यावरही कार्यवाही होत नसल्याची स्थिती आहे. हा गोंधळ सुरू असतानाच ग्रामस्थांना तलाठी दिशाभूल करणारी माहिती देतात. कृषी सहायक भेटत नाहीत, यामुळे अर्जदार शेतकरी त्रस्त आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.