नगर : पावसाने झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून सर्व पिकांना सरसकट पीकविमा लागू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी के ली. जिल्ह्यात पावसामुळे साधारण दोन लाख ९० हजार हेक्टर पेक्षाही अधिक क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी शासन पीकविमा योजनेचा लाभ देते. त्यानुसार कांदा शेतकऱ्यांनी खरीप पीकविमा भरला आहे. अनेक भागांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कापूस काढणीला आलेली व काढून टाकलेली बाजरी, तूर, भात, भुईमूग आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगानंतर आलेल्या उत्पन्नातून पीकविमा लागू केला जातो. मात्र या वर्षी बाजरीसह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे केवळ पीक कापणी प्रयोगावर अवलंबून राहू नये. प्रशासन आणि पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने थेट बांधावर जाऊन पाहणी करत सर्व पिकांना सरसकट पीकविमा लागू करावा, शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून नुकसानीची माहिती द्यावी. कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीचे अधिकारी येऊन पाहणी करतील. त्यानंतर पीकविमा लागू होण्यास संदर्भात विचार होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.
नगरसह राज्याच्या अनेक भागांत पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाऊन पाहणी केली. मात्र जिल्ह्यातील एखादा अपवाद वगळता अजून एकही लोकप्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधाकडे फिरकला नाही. शेतकऱ्यांवर भर दिवाळीत संकट वाढले असताना लोकप्रतिनिधींकडून शेतकरी बेदखल झाल्याची स्थिती आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.