सोलापूर : जिल्ह्यात १२३ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत २७ ते ३० ऑगस्ट या कालावधीत संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. पण, एका अधिकाऱ्याकडे तब्बल पाच गावांचा कारभार दिला आहे. त्यामुळे हा कारभार योग्यरितीने सांभाळला जाईल का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
वायचळ यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार त्यांनी प्रशासक नियुक्तीचा आदेश काढला आहे. राज्यात कोरोनाची स्थिती बिकट आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे ऑगस्टअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले आहेत. प्रशासक नेमण्यावरुन बऱ्याच घडामोडी घडल्या. ग्रामविकासमंत्र्यांनी सुरवातीला पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रशासक नेमण्याचा आदेश दिला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. काही जणांनी त्या गावातील पोलिस पाटलांना प्रशासक करण्याची मागणी केली. मात्र, त्याचाही विचार झाला नाही.
काहीजण याविषयी न्यायालयात गेले होते. शेवटी प्रशासक म्हणून शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात १२३ ग्रामपंचायती या ऑगस्ट अखेर मुदत संपणाऱ्या आहेत. याशिवाय सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यातही मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या जास्त आहे. सध्याच एका अधिकाऱ्याकडे पाच ग्रामपंचायती दिल्या आहेत. पुढे ग्रामपंचायतीची संख्या वाढल्यानंतर आणखी काही अधिकाऱ्यांकडे हा पदभार दिला जाईल. पण तो त्यांना पेलेल का, हा प्रश्न आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायती
अक्कलकोट, मंगळवेढा प्रत्येकी- १५, उत्तर सोलापूर- ६, करमाळा-२१, दक्षिण सोलापूर- २२, पंढरपूर-१७, मोहोळ-११, सांगोला-१६, एकूण-१२३.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.