पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढते आणि अशा वातावरणात जनावरांना तणाव जाणवतो. तो कमी करण्यासाठी योग्य आहारात खनिज मिश्रण द्यावे. पूर आलेल्या भागात आजार पसरण्याची शक्यता असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी जनावरांना आवश्यक असलेले लसीकरण (लाळ्याखुरकूत, एकटांग्या, घटसर्प) करणे आवश्यक आहे. शेळ्या-मेंढ्यांमध्ये लाळ्या खूरकूत, पीपीआर या आजाराच्या नियंत्रणाकरिता लसीकरण करावे. जनावरांना पावसात भिजू देऊ नये. त्यांना कोरड्या गोठ्यामध्ये ठेवावे. गोठ्यातील जागेत पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यात आलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा होण्याकरिता गोठा स्वच्छ आणि हवेशीर ठेवावा. गोठ्यातील पाणी बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे आवश्यक आहे.
गोठ्यातील गळणारे छत/छप्पर तात्काळ दुरुस्त करावे. गोठ्यातील वातावरण पाण्यामुळे दमट होणार नाही,याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास गोठ्यात मॅट अंथरावी, जेणेकरून जनावरांचे शरीर माती/ चिखलाने माखणार नाही. दुधाळ जनावरांच्या कासेची जागा स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. साठवलेला चारा कोरडा असावा. चाऱ्यामध्ये आर्द्रता असल्यास बुरशी लागते आणि अशा चाऱ्यामुळे जनावरे आजारी पडतात. पशुखाद्यात पाणी किंवा आर्द्रता आल्यास त्यामध्ये बुरशी लागते. दूषित खाद्य खाल्ल्यामुळे जनावरांना आजार होतो. पावसाळ्यात जनावरांना मोकळ्या कुरणावर न चरू देऊ नये. कुरणातील चारा कापून दिल्यास परोपजिवींचा त्रास कमी होतो. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढते आणि अशा वातावरणात जनावरांना तणाव जाणवतो. तो कमी करण्यासाठी योग्य आहारात खनिज मिश्रण द्यावे. पूर असलेल्या भागात पशुखाद्य आणि चाऱ्याचे बनविलेले ठोकळे द्यावेत. जेणेकरून हिरवा चारा न मिळणाऱ्या जनावरांना योग्य आहार मिळेल. पूर असलेल्या भागातील जनावरे मोकळी सोडून त्यांना पाणी साचणार नाही अशा ठिकाणी मोकळे ठेवावे. पुरात अडकलेली किंवा गोठा पडल्यामुळे किंवा इतर प्रकारे जखमी जनावरांना तात्काळ पशुवैद्यकामार्फत तपासून उपचार करावे. जखमांची काळजी घेताना त्या स्वच्छ करणे आणि त्यावर माश्या बसू नये याकडे लक्ष द्यावे, अन्यथा अशा जखमांमध्ये अळ्या पडतात आणि जनावरे आजारी पाडतात. जास्त काळ पाण्यात राहिल्यामुळे जनावरांच्या कातडीवर, पायात, कासेवर, शेपटीवर आणि शरीराच्या खालच्या भागावर जखमा होण्याची दाट शक्यता असते आणि त्याकरिता जनावरांना शक्यतो कोरड्या जागी नेऊन ठेवावे. अधिक पावसाच्या काळात गोठ्यात आणि एकूणच परिसरात माश्या, डास, गोचीड, गोमाश्या अशा परोपजिवींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यांच्याद्वारे पसरणारे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा निचरा शक्यतो लवकरात लवकर करणे जनावरांच्या आरोग्यास फायद्याचे ठरते. पूर आलेल्या भागात आजार पसरण्याची शक्यता असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी जनावरांना आवश्यक असलेले लसीकरण (लाळ्याखुरकूत, एकटांग्या, घटसर्प) करणे आवश्यक आहे. शेळ्या-मेंढ्यांमध्ये लाळ्या खूरकूत, पीपीआर या आजाराच्या नियंत्रणाकरिता लसीकरण करावे. जास्त काळ पाण्यात पाय राहिल्यामुळे जनावरांच्या खुरांमध्ये जखमा होऊन जनावरे लंगडी होतात. याकरिता जनावरे मोकळी सोडून कोरड्या जागेवर त्यांची व्यवस्था करावी. पुरात वाहून मरण पावलेल्या जनावरांची योग्यरीत्या विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याद्वारे आजार पसरणार नाहीत. मेलेल्या जनावरांना पूर्णपणे जाळण्यात यावे किंवा मोठ्या खड्ड्यात मीठ आणि चुना वापरून मेलेल्या जनावरांना त्या खड्ड्यात त्यामध्ये व्यवस्थितरीत्या पुरावे. जनावरांची विल्हेवाट लावताना मृत जनावर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून दूर ठिकाणी जाळावे किंवा पुरावे. संपर्क- डॉ. सारीपुत लांडगे,७३५०६८६३८० (नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय,नागपूर)