शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गिक लोक जैवविविधता पार्क” उभारण्याचे निश्चित करण्यात येत आहे. यामुळे लोकसहभागातून परिसरातील जैवविविधता वाढविण्यास मदत होणार आहे.
गेल्या भागात लोकसहभागातून उभारलेल्या ‘लोक जैवविविधता पार्क’ संकल्पना आणि आराखड्याबद्दल आपण वाचले. परंतु प्रत्यक्षात या प्रक्रियेतील सर्वांत मोठा अडथळा होता तो म्हणजे या परिसरातील भीषण दुष्काळ. २०१३-१४ पासूनच्या सततच्या कोरड्या दुष्काळामुळे पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झाले होते. महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्पाच्या संपूर्ण कालावधीत २०१४ ते २०१९ मधील साडेपाच वर्षात हा दुष्काळ चालूच होता. या क्षेत्रातील वयस्कर माणसं सांगत होती, १९७२-७३ च्या काळापेक्षा या पाच वर्षांतील दुष्काळ फारच गंभीर आहे.
दुष्काळात जगवली झाडे मागील पाच वर्षांत पाराळा भागासह संपूर्ण जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झालाच नाही. किंबहुना पार्क परिसरात तीन वर्षांत खूपच कमी पाऊस झाला होता. विहिरी, तलाव कोरडे झाले होते. त्या स्थितीत प्यायचे पाणी आणि पार्कला रोपं जगवायला पाणी विकत आणावे लागले. संपूर्ण मराठवाडा परिसरातच तीव्र दुष्काळ असल्याने टॅंकरने पाणी मिळणेही सोपे नव्हते. पिण्याच्याच पाण्याची टंचाई असल्याने पार्कसाठी पाणी देण्याला प्राधान्य देणे शक्यच नव्हते. जिथे काही विहिरींना बरे पाणी होते, तेथे टॅंकरवाले पाणी विकत घ्यायला गर्दी करायचे. काही दिवस काही टॅंकरने पाणी आणल्यावर ती विहीर कोरडी व्हायची. मग गावांतील वा शेजारच्या गावात अन्य विहिरी पाहून तेथून काही दिवस पाणी विकत आणायचे. असे सुमारे ८ ते १० किमी. परिसरातून दरवर्षी पाणी आणावे लागे. जमीन हलकी, मुरबाड, पूर्ण कोरडी. त्यामुळे काही ठिकाणी ठिबक सिंचनाची सोय करण्यात आली. प्रत्येक रोपाला शेडनेटचा वापर करून झाकण्यात आले. रोपाखाली आळे करून त्यात पाला पाचोळ्याचे आच्छादन करण्यात आले. या झाडांना झारीने थोडे पाणी घालण्यात येत असे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये तर रोपांना दिवसाआड पाणी देण्यात आले. आम्रपाली, कचरू त्रिभुवन, एकनाथतात्या बागुल, मंगल खिंवसरा हे लोकपर्यायचे सहकारी यासाठी अफाट मेहनत घेत आहेत. ही रोपे वाचविण्यासाठी थोडेसे ठिबक, आळ्यात पाण्याच्या बाटल्या ठेवणे, आळे करणे, पाला-पाचोळा पसरणे, आदी मार्ग वापरले जात आहेत.
एकीकडे प्रारंभी लागवड केलेली विविध प्रकारची आवळा, चिंच, पळस, पिंपळ, बोर, आदी झाडं खूप वाढत गेली. त्यामुळे येथे कावळा, चिमणी, पोपट, साळुंकी, मोर, असे विविध प्रकारचे पक्षी येऊ लागले होते. त्यांच्यासाठी उन्हाळ्यात या उंच झाडांवर डब्यांतून पाण्याची सोय करण्यात आली होती.
या ही परिस्थितीत पार्कमध्ये सुरुवातीला केवळ मेडसिंग, वड आणि पळस ही तीन झाडे असताना आज २०१९ अखेरीस सुमारे १६०० हून अधिक झाडे उभी आहेत. भीषण दुष्काळात निरंतर पाणी विकत आणण्यात आले. तरीही प्रचंड उन्हामुळे मागील ५वर्षांत सुमारे ५५झाडं-रोपटी जळाली. यंदा ऑक्टोबर २०१९ पर्यंत प्रथमच ब-यापैकी पाऊस पडला. त्यामुळे सर्व नद्या, नाले, शेतं, विहिरी, तलाव भरून वाहत आहेत. त्याचा फायदा झाडांना होत आहे. जून महिन्यांपूर्वी सारे भकास दिसत होते. परंतु थोडे पाणी मिळाल्यावर लोकांच्या अपार मेहनतीला पालवी फुटू लागली. “लोक जैव विविधता पार्क” कात टाकत आहे.
‘लोकजैविपा’ बनली प्रेरणास्रोत जैवविविधता आणि परिसर निर्माण करण्याच्या प्रक्रियेत लोकांचा खरा खुरा सहभाग मिळवायचा असेल तर त्यांचा वनावर आधारित उपजीविकेचा प्रश्न विचारात घ्यायला हवा, हा मूळ उद्देश ठेवूनच पाराळाची “लोक जैवविविधता पार्क” विकसित करण्यात आली. या प्रक्रियेत सहभाग घेत घेत त्याच्या निरीक्षणातून आदिवासी शेतकरी अशा प्रकारची छोटी पार्क त्यांच्या खासगी शेतावरही करतील असाही एक उद्देश होता. त्याची निश्चित सुरुवात झाली आहे असे दिसत आहे. केवळ पाराळा या एकाच गावात सुमनताई, रामदासभाऊ मोरे, तुकारामभाऊ मोरे, कांतिलाल मोरे, छबुभाऊ, तान्ह्या बाळा, बबनराव, चंद्रकलाताई माळी, बाबुराव, हिराबाई, आदी प्रमुख याचे अनुकरण करताना दिसत आहेत. आज केवळ ५-६ वर्षांत पार्क यासाठी एक लोक-प्रात्यक्षिक बनले आहेत. लोकपर्याय संस्था साधारणपणे मार्चमध्ये शेतकऱ्यांकडून झाडांची मागणी मागवते. अभ्यासाच्या यादीतील काही झाडे आणि त्यांच्या मागणीतील काही झाडे संस्था मिळवते. सततच्या दुष्काळामुळे संस्थेने गोळा केलेल्या सुमारे ४५ हजारांहून अधिक बिया पुणे जिल्ह्यातील ढोले नर्सरीला दिल्या होत्या आणि लोक मागतील तशी रोपं दरवर्षी संस्थेला देत जावे अशी विनंती केली. या मोबदल्यात नर्सरीला शेवटी काही रक्कम नक्कीच देण्यात येईल असेही संस्थेने कबूल केले आहे. त्याप्रमाणे या नर्सरीतून संस्थेने दिलेल्या बियांची रोपे, शेतकऱ्यांनी मागितली. काही रोपे विशेषत: फळझाडांची रोपे खासगी नर्सरीतून विकत आणली जातात आणि काही रोपं वन विभागाच्या नर्सरीतून मिळतात. जे शेतकरी कुटुंबं झाडे लावून व ती राखण्यात रस दाखवतील अशाच कुटुंबांना प्रथम रोपे दिली. पार्कमध्ये मेळाव्यात साऱ्या शेतकऱ्यांना हवी ती रोपे निवडायला मिळतात. परिणामी ती चांगल्याप्रकारे सांभाळतही असल्याचे दिसते आहे. हा खरा खुरा लोकसंवाद व सहभाग आहे. यातूनच पार्कमधील रोपंही निश्चित होत गेली. त्यांची लागवडही त्यांनीच केली आहे. त्यानंतर येथून रोपटी, बिया नेऊन वा स्वत: विकत आणून हे सारे भिल, ठाकर आदिवासी समूह त्यांना मिळालेल्यावर हक्काची जमीन कसत असताना शेताचे बांध व त्या शेजारच्या शासनाच्या वन जमिनीवर विविध प्रजातीची झाडे लावून ती सांभाळत आहेत.
‘लोकजैविपा’ च्या संकल्पनेचा विस्तार शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या सहभागाने वन जमिनीच्या काही भागांवर “नैसर्गिक लोक जैवविविधता पार्क” उभारण्यात येतील अशी मोठी महत्त्वाकांक्षा लोकांच्या मनात निर्माण करण्याचाही एक उद्देश आता निश्चित करण्यात येत आहे. त्यामुळे वन विभागाच्या हजारो हेक्टर्स जमिनीवर हा कार्यक्रम घेण्याच्या प्रक्रिया सुरू करण्यास मदत होईल हे निश्चित. त्यासाठी केवळ सामूहिक वन हक्क प्राप्त झाल्यावर याची सुरुवात होईल हे मानायची गरज नाही. मात्र कोणत्याही “जैवविविधता आणि परिसर निर्माण” करण्याच्या प्रक्रियेत याच्याशी निगडित लोक उपजीविका कायम लक्षात घ्यावी लागेल. नाहीतर ती एक औपचारिकता होऊन बसेल! लोकांना खरंखुरं सोबत घेत; त्यांच्या सन्मानपूर्वक उपजीविकेची जोड देत; ही लोक चळवळ बनली; तरच जैवविविधतापूर्ण परिसर पुनर्निर्माण करणे शक्य आहे. झाडे जगवणे शक्य आहे. एखादी ‘गैरसरकारी संस्था’ एखाद-दुसरे आदर्श मॉडेल उभेही करू शकेल. पण हेच काम सर्वदूर नेण्याचे काम फक्त सरकारच करू शकते. जवळ जवळ पाच सहा गावांच्या मध्यभागी अशी पार्क विकसित करण्याने पाराळासारखी लोकसहभागातून परिसर पुनर्निर्माणाची प्रक्रिया सुरू व्हायला मदत होईल.
संपर्क ः शांताराम पंदेरे, ९४२१६६१८५७. (लेखक औरंगाबाद येथील लोकपर्याय संस्थेत कार्यरत आहेत.)