सध्याच्या काळात रक्त शोषण करणाऱ्या कीटकवर्गीय माश्या, कृमी तसेच गोचिडांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. हे लक्षात घेऊन गोठा, जनावरांची स्वच्छता ठेवावी. गोठ्याच्याभोवताली पाण्याचे डबके साचणार नाही, पाणी तालीमध्ये तुंबणार नाही याची काळजी घ्यावी.
अ ल्प पाऊस, वाढती आर्द्रता, वाढते तापमान यामुळे परजिवींच्या वाढीसाठी पोषक वातावरण बनत आहे. हा काळ अनेक प्रकारच्या विशेषतः कृमीजन्य व कीटक/ गोचीडजन्य परजिवींसाठी उपयुक्त आहे. वाढते प्रमाण लक्षात घेऊन जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
जनावरांचे रक्त शोषण करणाऱ्या कीटकवर्गीय माश्या ः यवतमाळ, सोलापूर जिल्ह्यांमधून मिळालेल्या माहितीनुसार जनावरांमध्ये कीटकवर्गीय माश्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सिस्टोझोमा पर्णकृमीजन्य आजार ः विशेषतः गायवर्गीय प्राण्यांमध्ये या कृमीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ॲम्प्कीस्टोम्स ः पर्णकृमीजन्य आजार, म्हशीमध्ये जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे. गोचीड ः जनावरांमध्ये गोचिडांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. प्रादुर्भाव वाढण्याची लक्षणे
शेत शिवार, खाच खळगे, पाण्याचे डबके, ओढा, नदीमधील गढूळ पाणी जनावरे पितात. या ठिकाणी छोट्या गोगलगाईंचे प्रमाण दिसते. अशा ठिकाणचे पाणी जनावरांना पिण्यास देऊ नये. गोगलगायीमार्फत पाणीमध्ये सोडलेल्या कृमीच्या अर्भकावस्थाद्वारे जनावरांना कृमींचा प्रादुर्भाव होतो. गोठ्याच्या भोवताली पाण्याचे डबके साचणार नाही, पाणी तालीमध्ये तुंबणार नाही याची काळजी घ्यावी. शेळी, मेंढीमध्ये देखील कृमीची लागण होते. तसेच गोलकृमी/ जंत/ हिमॉन्कस कृमीचा प्रादुर्भाव व कॉक्सीडीओसीस या आदिजीवीजन्य परजीवचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. हे लक्षात घेऊन पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली योग्य जंतनाशकांचा वापर करावा. चावणाऱ्या कीटकवर्गीय माश्याद्वारे पुढील टप्प्यामध्ये सरासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. ताप, डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत स्राव वाहणे, दुग्धोत्पादनात अचानक घट होणे, काहीवेळा गाय, म्हैस चक्राकार फिरणे इत्यादी लक्षणे आढळल्यास तत्काळ सरा रोगासाठी प्रभावी औषधोपचार करून घ्यावा. कीटकवर्गीय माश्यांचे प्रमाण वाढलेल्या कालावधीसाठी जनावरांना कुरणात किंवा मोकळ्या रानात चरावयास सोडण्याच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा. सकाळी सात वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत जनावरांना चरावयास बाहेर सोडणे टाळावे. या माश्या प्रखर सूर्यप्रकाशामध्ये जनावरांचा चावा घेतात. गोचिडांचे प्रमाण वाढत असल्यास गोचिडांची अंडी जाळणे, गोठा आणि जनावरांच्या शरीरावर वनस्पतीजन्य कीटकनाशकांची फवारणी करावी. एकात्मिक गोचीड व्यवस्थापन फायदेशीर ठरते. - डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)