गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा प्रादुर्भाव वाढतो. माश्यांनी रक्त शोषणामुळे जनावरांना रक्तक्षय होतो. जनावरे आजारी पडतात. हे लक्षात घेऊन गोठ्याची नियमित स्वच्छता ठेवावी.
गोठ्यातील अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय माश्यांचे प्रमाण वाढते. माश्यांचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर जनावरांचे लक्ष विचलित होते. जनावरांच्या खाद्य-खाण्यावर परिणाम होऊन त्यांच्या वजनात घट होते, प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन दुग्धोत्पादनात घट होते. हे लक्षात घेऊन गोठ्यातील माश्यांवर नियंत्रण ठेवावे.
कीटकवर्गीय माश्यांचे प्रकार ः
चावणाऱ्या किंवा रक्त शोषणाऱ्या माश्या (गो माशी) चावा न घेणाऱ्या माश्या (घरगुती माशी) मादी माशी आपल्या उगमस्थानावर, ओलसर ठिकाणी अंडी घालते. गोठ्यातील तापमान आणि आर्द्रतेमध्ये अंड्यांची वाढ होऊन अर्भके तयार होतात. अर्भक अवस्था गोठ्यातील घाण साचलेले पाणी, नाली, शेणाचा ढिगारा, साचलेल्या पाण्याच्या जागेवर आढळते. ठराविक कालावधीमध्ये अळी कोषावस्थेत जाते. त्यानंतर कोशातून बाहेर पडते. जनावरांवर होणारे दुष्परिणाम :
रक्त शोषणामुळे रक्तक्षय होतो. शरीरातील आवश्यक घटक मूलद्रव्याचे प्रमाण कमी होऊन शरीर प्रक्रिया मंदावते. हार्मोनेसचे संतुलन बिघडते. पशु प्रजनन संस्थेवर परिणाम होऊन प्रजनन क्षमता कमी होते. वजनात घट येते. शरीरावर ताण येतो, त्यामुळे जनावरे त्रासते. प्राणघातक रोगांचा प्रादुर्भाव होतो. आठवड्याच्या अंतराने गोठ्यातील स्वच्छता करावी. त्यामुळे माश्या आणि त्यांची अंडी नष्ट होतात. माश्यांचा सातत्याने प्रादुर्भाव होणाऱ्या क्षेत्रात उन्हाळ्यामध्ये गवतपट्टे जाळावेत, त्यामुळे अंड्यांसहित तर अवस्थांचा नायनाट होतो. कुरण आणि पिकाखालील जमिनीची अदलाबदल करावी. शेणाच्या ढिगाभोवती स्वच्छता ठेवावी. शेणाचा ढिगारा गोठ्यापासून दूर व झाकलेला असावा. त्यामुळे गोठ्याभोवती माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही. दुधाळ जनावरांसाठी मुक्त संचार गोठा पद्धतीचा वापर करावा. गोठा सभोवतालच्या नाली बंदिस्त असाव्यात. नाल्यांचा उतार व्यवस्थित असावा, जेणेकरून तो वाहता राहील. नाली नियमितपणे साफ करावी. गोठ्यातील मलमुत्राची योग्य ती विल्हेवाट लावावी. पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्याचे खाचखळगे असल्यास त्यामध्ये गप्पी मासे सोडावेत. सुधारित पद्धतीच्या गोठ्यामध्ये सूर्योदय, सूर्यास्तावेळी पंखा लावल्यास माश्या चावण्याचे प्रमाण कमी होते. - डॉ. कल्याणी सरप, ९०९६८७०५५० (कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)