गेल्या आठवड्यात द्राक्षबागेत सर्वत्र पाऊस सुरू आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या वेळी तापमानात घट आली असून, सध्याचे तापमान ३०-३२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सापेक्ष आर्द्रतासुद्धा ८०-९० टक्के किंवा काही ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत वाढलेली दिसते. या वेळी जमिनीत मातीच्या कणामध्ये पूर्णपणे पाणी जमा झालेले दिसेल. सध्याच्या वातावरणाचे काही ठिकाणी चांगले, तर काही ठिकाणी विपरीत परिणाम दिसून येतील. विपरीत परिणामांमुळे बागेत उत्पादन खर्च वाढू शकतो. या वातावरणात बागेतील व्यवस्थापन कसे करावे, या विषयी माहिती घेऊ.
जुनी बाग जुन्या बागेमध्ये सद्यस्थितीत वातावरणाचे विपरीत परिणाम होताना दिसून येतील. बागेत वाढलेली आर्द्रता आणि कमी तापमान यामुळे जिबरेलीन्सचे प्रमाण वाढते. यामुळे वेलीचा शेंडा जास्त जोमात वाढताना दिसेल. शेंडा वाढ झाली म्हणजे काडीच्या पेऱ्यातील अंतरसुद्धा वाढेल. फुटींचा पेरा वाढला म्हणजे घडनिर्मिती कमी झाली, अशी परिस्थिती या वेळी नसेल. मात्र, शेंडा वाढ जास्त जोमात होत असल्यास काडीची परिपक्वता लांबणीवर पडेल. काही बागेत नुकतीच तळात दुधाळ झालेली काडी तशीच राहील. याकरिता बागेत शेंडा वाढ थांबवणे गरजेचे असेल. बागेतील शेडा वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता खालील उपाययोजना महत्त्वाच्या असतील.
रोगांचे व्यवस्थापन अ) काही परिस्थितीत बागेत डाऊनी मिल्ड्यू किंवा अँन्थ्रॅक्नोजचा प्रादुर्भाव झालेला दिसून येईल. बागेत सतत झालेल्या पावसामुळे नवीन कोवळ्या फुटींची वाढ होत आहे. अशा फुटींवर तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतील. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या परिस्थितीत काडीवरसुद्धा असेच ठिपके दिसतील. त्याकरिता खालील व्यवस्थापन उपयोगी ठरेल. बागेतील नवीन व कोवळ्या फुटी त्वरीत काढाव्यात. या फुटींची गरज नाही. तशाच वाढल्यास काडीची परिपक्वता लांबणीवर जाईल, त्याचसोबत रोगाचे जिवाणू काडीमध्ये प्रवेश करतील. पुढील हंगामात घडावर लवकर प्रादुर्भाव होऊ शकतो.शिफारशीनुसारच कॉपरयुक्त बुरशीनाशकांची किंवा बोर्डोची फवारणी करून घ्यावी.
ब) कॅनोपीची गर्दी असलेल्या बागेत नक्कीच डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव दिसून येईल. या पावसाळी वातावरणामुळे काडीवर बगलफुटी जास्त प्रमाणात निघतात. त्यांची गर्दी होऊन कॅनॉपीत डाऊनी मिल्ड्यूच्या प्रादुर्भावास आवश्यक ते सूक्ष्म वातावरण तयार होते. तेव्हा खालील उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.
क) जैविक नियंत्रण ः बागेतील सध्याचे वातावरण जैविक नियंत्रणाकरिता पोषक आहे. या वेळी बागेत आर्द्रता जास्त वाढल्यामुळे जैविक नियंत्रणातील ट्रायकोडर्मा, सुडोमोनस बॅसीलस इत्यादी जिवाणूंची संख्या वाढणे सोपे होईल. द्राक्षबागेत रोगनियंत्रणाकरिता जिवाणूंची संख्या किती आहे म्हणजेच उपलब्ध पॅकेटमध्ये काउंट किती आहे हे जास्त महत्त्वाचे असते. परंतु सध्या परिस्थिती चांगली असल्यामुळे ८-१० दिवसांत एक या प्रमाणे जैविक घटकांची फवारणी करता येईल. तसेच जमिनीतून ठिबकद्वारे देणे सुरू करावे. त्याचे पुढील काळात रोग नियंत्रणासाठी चांगले परिणाम मिळतील.
- ०२०-२६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.