आपण लेखमालेतील आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये जल, मृदसंधारणाचे सगळे प्रश्न, त्यांची कारणे याची माहिती घेतली. त्यावरचे स्थलानुरूप यश देणारे उपाय आणि त्यात तज्ज्ञ आणि लोकांचा आवश्यक असलेला सहभाग यावर विस्तृतपणे माहिती घेतली. आजच्या लेखामध्ये आपण या जलसंधारण प्रक्रियेचे टप्पे कोणते, काय करायला हवे आणि काय काय टाळायला हवे यावर माहिती घेत आहोत. आ जपर्यंत आपल्याकडे जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. अजूनही सगळीकडे ही कामे जोरात चालू आहेत. सध्या या कामांमध्ये लोकांचा सहभाग वाढत चालला आहे. पण वस्तुस्थिती काय आहे आजची? एव्हढी सगळी कामे होत असूनही, या कामांवर भरपूर खर्च आधीही झाला आहे आणि अजूनही होत आहे, तरीही, दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागणाऱ्या गावांची संख्या आणि त्रास होणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. वाढत्या जंगलतोडीमुळे आणि सध्या बदललेल्या पावसाच्या वेळापत्रकामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा, वेळ, श्रम खर्च करूनही पाणीटंचाई दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. लोकसहभागातून जलसंधारण प्रक्रियेचे टप्पे
सर्वप्रथम ही गोष्ट नक्की लक्षात घेतली पाहिजे की जलसंधारण काम स्थलानुरूप असले पाहिजे, तरंच त्याचा फायदा होतो. म्हणजेच, जल, मृदसंधारणाची कामे सगळीकडे एकाच पद्धतीने करून यश मिळत नाही तर आपण काम कोकणात करतोय, पश्चिम महाराष्ट्रात करतोय, मराठवाड्यात करतोय, खानदेशात करतोय की विदर्भात करतोय, या गोष्टीचा सर्वात आधी विचार आणि अभ्यास करून मग उपाय ठरवले आणि योग्य प्रकारे प्रत्यक्षात आणले तर प्रश्न सुटतो हा आमचा अनुभव आहे. एखाद्या गावात जलसंधारण प्रकल्प राबवायचा की नाही हे ठरवायला काय काय करणे आवश्यक असते हे आपण बघुयात. ही एक अतिशय सोपी आणि सरळ वाटणारी पण प्रत्यक्षात काम करणाऱ्या माणसाची सहनशक्ती, सचोटी, जिद्द, काम करण्याची आवड, समजूतदारपणा, धैर्य, इत्यादी गोष्टींची परीक्षा घेणारी प्रक्रिया आहे. गावाची निवड करताना गावाला असलेली गरज हा महत्त्वाचा भाग असतोच, पण गावातल्या लोकांची प्रत्यक्ष काम करण्याची तयारी, यातून राजकारण बाहेर ठेवण्याची तयारी, योग्य व्यक्तींचा सल्ला ऐकण्याची गावकऱ्यांची तयारी इत्यादी अनेक अडथळे असतात. आपण हे टप्पे काय असतात ते समजावून घेऊयात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गावकऱ्यांनी योग्य, अनुभवी तज्ज्ञ व्यक्तीला मदतीसाठी बोलावणे. यात गावपातळीवर काम करणारी स्वयंसेवी संस्था मुख्य भूमिका बजावते. गावकरी मंडळींच्या आग्रहामुळे ग्रामपंचायतीने योग्य व्यक्तीला मदत करण्यासाठी पत्र देणे हा पहिला टप्पा असतो. ग्रामपंचायतीचा सहभाग आवश्यक असतो कारण ती स्थानिक सरकारी संस्था असल्याने सर्व परवानग्या देण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो. तसेच, काम पूर्ण झाल्यावर ते त्यांचाकडे हस्तांतरित करता येते. त्यामुळे केलेले काम दीर्घकाळ चांगल्या स्थितीत राहते. पुढचा टप्पा आहे “ग्रामसभा”. प्रत्येक घरातून किमान एक सज्ञान माणूस या सभेला येणे अपेक्षित असते. ही सभा खूप महत्त्वाची आहे. या सभेमध्ये गावातील आणि परिसरातील सर्व पाण्याचे स्रोत, त्यांचा कालावधी, ताकद, लोकांची सोय, नवीन प्रस्तावित जागा, खासगी जागा असतील तर त्या जागेच्या मालकांचे मत इत्यादी गोष्टींवर चर्चा होऊन निर्णय होतो. एकदा ग्रामसभेत काम करायचा निर्णय झाला की मग गावकरी मंडळींबरोबर शिवार फेरी हा त्यापुढचा टप्पा आहे. गावाच्या परिसरात अस्तित्त्वात असलेले स्रोत पाहून त्यांच्यावर काय काम करता येईल आणि कुठे करणे योग्य आहे, हे ठरवून त्या पाण्याच्या कामांच्या जागा नक्की केल्या जातात. त्यावरून गावाचा जल आराखडा तयार करून, गावाला सुयोग्य अशी योजना आखली जाणे अपेक्षित असते. त्यानंतर परत ग्रामसभा भरवून सुचवलेल्या योजनेवर असलेल्या शंकांचं निरसन करून सर्वानुमते ही योजना मंजूर करून त्यावर कार्यवाही करण्यासाठी तयार होणे गरजेचे असते. जिथे खासगी जागेत काम होणार असेल, तिथे त्या जागामालकाला प्रत्यक्ष जागेवर नेऊन, ग्रामस्थांसमक्ष काय करणार ते समजावून, त्याच्याकडून “ना हरकत दाखला” आणि “संमतीपत्र” घेऊन, मगच योजना नक्की करणे योग्य ठरते. यानंतर टप्पा येतो तो प्रत्यक्ष काम करण्याचा. यात तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली काम करणं आवश्यक असतं. गावातील लोकांना एखादी गोष्ट पटली नाही किंवा कळलं नाही तरी प्रश्न विचारून मुद्दा समजून घ्यावा, पण तज्ज्ञाच्या मताचा अनादर करू नये. आपल्याला दूरगामी यश हवं असेल तर ही त्यासाठी महत्त्वाची बाब आहे. लोकसहभाग याचा अर्थ कामात लोकांचा सहभाग असा आहे, काम काय आणि कुठे करायचं हे त्या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञाचे आहे हे लक्षात ठेवावे. जलसंधारण करताना घ्यायची काळजी
पाण्याचे काम करताना गावाच्या परिसरातील सर्वात उंच भागापासून पायथ्यापर्यंत करावे. मुख्य नदीवर काम करण्यापूर्वी क्षेत्र उपचार करावेत आणि आधी उपनद्या, ओढे, झरे, इत्यादी स्रोतांवर काम करावे आणि मग नदीवर काम करायचा विचार करावा. सिमेंट नाला बांध बांधण्यापूर्वी प्रवाहाच्या वरच्या बाजूला किमान २ ते ३ गॅबियन बंधारे बांधावेत. त्यामुळे पावसात येणारा गाळ तिथे अडून पुढे येणार नाही आणि पाणीसाठा स्वच्छ राहील. गाळ काढताना स्रोताचा नैसर्गिक उतार कायम ठेवावा. त्यात अजिबात फेरफार करू नये. गाळ काढताना, स्रोताच्या दोन्ही बाजूंचा उतार ४५ अंश असावा, त्याने स्थिरता येते आणि बाजू ढासळून पडत नाही. जर बंधारा बांधायचा असेल तर योग्य आणि अनुभवी तज्ज्ञ व्यक्तीकडून आराखडा करून घ्यावा आणि काम त्याच्या मार्गदर्शनाखाली करावे. सह्याद्रीच्या पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये बंधारे बांधताना त्यात नंतर गाळ साठू नये यासाठी उघडबंद करता येणाऱ्या व्हेंट ठेवाव्यात. पावसात त्या उघड्या ठेवाव्यात आणि पाऊस संपताना बंद कराव्यात. त्यामुळे बंधाऱ्यात गाळ साठत नाही. जेवढे शक्य असेल तेवढे स्थानिक सामान वापरावे. त्यामुळे खर्च कमी करणे शक्य होते. कामाचे स्वरूप ठरवताना भौगोलिक परिस्थिती, उतार, पाण्याच्या प्रवाहाचा वेग, कालावधी, पाणी अडवून ठेवण्याची क्षमता, इत्यादी बाबींचा अभ्यास करून, योग्य तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन मगच काम आणि कामाचे ठिकाण नक्की करावे. कोणत्याही गोष्टीची, उपायाची आंधळेपणाने नक्कल करू नये. अन्यथा, गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो. अगदी, तो पाण्याचा स्रोत उदध्वस्त होऊन कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, हे नीट लक्षात ठेवावे. जर कोणतीही जलसंधारण योजना त्या गावाच्या परिसराचा अभ्यास करून, पाण्याच्या उपलब्धतेचा आणि मागणीचा विचार करून, लोकसंख्या आणि क्रयशक्तीचा अभ्यास करून आखली आणि राबवली आणि त्यात लोकसहभाग असेल तर दीर्घकालीन फायदा निश्चित होतो, हा माझा आजपर्यंतच्या कामांचा अनुभव आहे. प्रत्येक गोष्टीसाठी केवळ सरकारी यंत्रणेवर पूर्णपणे अवलंबून न राहता, स्थानिक लोकांनी स्वत:हून काम करायला सुरवात केली तर आपण अनेक गोष्टी सहज करू शकतो आणि मोठी संकटं टाळू शकतो. - डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६० (लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)