बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये सध्याच्या काळात भेसळयुक्त झाडे ,वेगळ्या पानाचा आकार, वेगळ्या फुलांची झाडे , उंच कमी/अधिक असलेली झाडे, रोगट झाडे व इतर ऑफ टाईप झाडे काढून टाकावीत. दर्जेदार बियाणे निर्मिती करावी. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असल्याने पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ जातीचे असते. त्यामुळे पेरणी करिता दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी या खरीप हंगामामध्ये पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित होणाऱ्या सोयाबीनचा जर पुढल्या वर्षीसाठी बियाणे म्हणून पेरणीसाठी वापर केला तर उत्पादन खर्चात बचत होऊ शकते. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ ते ३ वर्षांपर्यंत वापरता येते. यंदाच्या खरीपामध्ये पेरलेले सोयाबीन सध्याच्या स्थितीत चांगल्या प्रकारे तयार होत आहे. हे बियाणे योग्य पद्धतीने साठवून ठेवावे.
ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या प्रमाणित बियाण्याची तसेच नवीन जातीची किंवा ८ ते १० वर्षांतील ( कीड व रोगास कमी बळी पडणारी जात) प्रसारित झालेल्या जातीची चालू हंगामात पेरणी केली असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे या वर्षी उत्पादित होणाऱ्या सोयाबीन बियाणास प्राधान्याने पुढील वर्षासाठी बियाण्याकरिता निवड करावी. बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये सध्याच्या काळात भेसळयुक्त झाडे ,वेगळ्या पानाचा आकार, वेगळ्या फुलांची झाडे , उंच कमी/अधिक असलेली झाडे, रोगट झाडे व इतर ऑफ टाईप झाडे काढून टाकावीत. ज्या प्लॉटमधील सोयाबीन बियाण्याकरिता निवडावयाचे आहेत अशा प्लॉटच्या सभोवताली ३ मीटर अंतर सोडून आतील उत्पादित होणारे सोयाबीन बियाण्याकरिता निवडावे. निवडलेल्या सोयाबीन प्लॉटवर परिपक्व होण्याच्या अवस्थेत शक्य झाल्यास बुरशीनाशकाची फवारणी करावी, जेणेकरून बियाण्याद्वारे प्रसार होणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून बियाण्याचे संरक्षण होईल. निवडलेल्या प्लॉट मधील सोयाबीनची कापणी पावसाचा अंदाज घेऊन योग्य वेळी करून त्याची सुकवणी करावी. सुकवणी नंतर मळणी शक्य झाल्यास पारंपारिक पद्धतीने काठीच्या साहाय्याने बडवून करावी किंवा मळणी यंत्राने करावयाची असल्यास मळणी यंत्राचा वेग ३०० ते ४०० आर पी एम ठेवावा. तयार झालेल्या सोयबीन मधील आद्रता साधारणपणे ९ ते १२ टक्के राहील याची विशेष काळजी घ्यावी. बियाणे साठवणुकीसाठी गोणपाटाच्या पोत्यांचा वापर करावा. शक्यतोवर प्लॅस्टिक पोत्यांचा वापर टाळावा. बियाणे साठवताना ५० किलो क्षमतेच्या पोत्यामध्ये करावी. ७ ते ८ पोत्यांपेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये. अन्यथा सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणे फुटण्याची तसेच उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. पोत्यांची थप्पी जमिनीपासून १० ते १५ सेंटिमीटर उंचीवर लाकडी फळ्यांवर लावावी.पोत्यांची रचना उभ्या-आडव्या पद्धतीने करावी, म्हणजे हवा खेळती राहून बियाण्यांची गुणवत्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होईल. आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये कीटकनाशक व बुरशीनाशकांचा वापर करावा. तसेच उंदरांचा उपद्रव टाळण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी. सोयाबीनच्या बियाण्याच्या हाताळणी व वाहतूक काळजीपूर्वक करावी. पोती उंचावरून आदळ आपट होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. संपर्क- अक्षय इंझाळकर ९०२१६३७५७४ (विषय विशेषज्ञ (कृषि विद्या विभाग ), कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ)