तणांचे आच्छादन हा सर्वोत्तम पर्याय

सेंद्रिय शेतीमध्ये तणे व विविध घटकांचे जमिनीवर आच्छादन सुपिकतेसाठी फायदेशीर ठरते.
सेंद्रिय शेतीमध्ये तणे व विविध घटकांचे जमिनीवर आच्छादन सुपिकतेसाठी फायदेशीर ठरते.

तणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतानाच तणांचे निसर्गातील महत्त्व लक्षात घ्यावे. विविध घटकांचे जमिनीवर आच्छादन केल्यास जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होऊन पिकांच्या उत्पादनासाठी फायदेशीर ठरते. सेंद्रिय पदार्थांच्या आच्छादनाचे अनेक फायदे आहेत. 

निसर्गाचे काम त्याच्या पातळीवर सुरू असते. वनस्पतीच्या वाढीच्या विशिष्ट टप्प्यावर येणाऱ्या किडीला रोखण्यासाठी आजूबाजूला अन्य वनस्पती आपोआप वाढण्याची क्रिया घडत असते. आपण अशा वनस्पतीकडे तण म्हणून पाहत असल्यामुळे कदाचित त्याचे उच्चाटन करू पाहतो. उदा. एखाद्या पिकाच्या मुळांवर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव वाढताना शेजारी जर झेंडूचे रोप असेल, तर त्याच्या मुळाद्वारे स्त्रवलेल्या रसायनांमुळे सूत्रकृमींना अटकाव होतो. म्हणजेच मानवाने आपली  अल्प बुद्धी लावून सरसकट तणांचे उच्चाटन न करता निसर्गाचे व तणांच्या निर्मितीमागचे प्रयोजन जाणून घ्यावे, अभ्यासावे व त्यानुसार कृती करावी.  तणे म्हणजे आपल्या डोक्यावरचे केस समजावेत. केसांमुळे आपल्या डोक्याचे उन्हापासून संरक्षण होते. तापमान संतुलित राहण्यास मदत होते. केस जास्त वाढले तर आपण ते कापून मर्यादित ठेवतो. ते उपटून टाकत नाही. अशा प्रकारे तणे नियंत्रित ठेवावीत. कापून त्याचे जमिनीवरच आच्छादन करावे. त्याचे अनेक फायदे होतात. 

  • हरळी, कुंदा, लव्हाळा-नागरमोथा अशी काही तणे त्रासदायक असतात. ज्या शेतात हरळीचा प्रादुर्भाव जास्त आहे, त्या शेतात राजगिरा पेरावा. तो दोन महिन्यांचा झाल्यावर कापून त्याचे आच्छादन हरळीवर टाकावे. १-२ वर्षात केवळ आच्छादित जमिनीमुळे व राजगिऱ्यातील  रासायनिक द्रव्यामुळे हरळीचे प्रमाण खूप कमी होईल. 
  • लव्हाळा किंवा नागरमोथा हे तण जास्त असणाऱ्या शेताला पाणी दिल्याच्या दुसऱ्या दिवशी वाफसा येण्यापूर्वीच मजूर लावून ओल्या जमिनीतील नागरमोथ्याच्या झाडांना बोटांच्या चिमटीत धरून मुळे व गड्यासह उपटून घ्यावे. त्यानंतर जमिनीवर लगेच उपलब्ध काडीकचरा किंवा बायोमासचे आच्छादन करावे. सूर्यप्रकाशाअभावी लव्हाळा वाढणार नाही. १ ते २ वर्ष असे केल्यास नागरमोथ्याचा त्रास कमी होतो.
  • तणे सूर्यशक्तीचा वापर करून आपली वाढ करून घेतात. तणांनी आपल्या शरीरात साठवलेली ही सूर्यशक्ती व ऊर्जा तणे कापून त्याचे आच्छादन करून जमिनीला परत करावी. त्या ऊर्जेचा वापर जमिनीतील सूक्ष्म जीवाणू करून घेतात. जमीन अधिक जिवंत व सकस बनण्यास मदत होते. यामुळे आपण पेरलेली पिके जोमाने वाढून भरपूर उत्पादन देतात. एकूण तणांचे योग्य व्यवस्थापन ही कला शेतकऱ्यांनी अधिक अभ्यासली पाहिजे. 
  • तणांचे जैविक व्यवस्थापन  जैविक उपायांनी तणांचे व्यवस्थापन करण्यासाठी जगभरातील शास्रज्ञ आज प्रयत्नशील आहेत. उदा. नागफणी तणांसाठी कोचीनल भुंगे, गाजर गवतासाठी झायगोग्रामा, वायकोलोराटा भुंगे, घाणेरी पाने खाणारे टिली ओनेमीन स्क्रू, भातखाचरातील तणांसाठी टोडपोल, कोळंबी किंवा मासे सोडतात. जलकुंभीसाठी निओचेटींना इकोरिनी ब्रचो भुंगेरे सोडतात. आच्छादन

    जमिनीला सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन अत्यावश्यक आहेत. पिके केवळ सूक्ष्म जीवाणूंच्या अस्तित्वामुळेच वाढतात. त्यांना सतत खाद्य मिळाले तरच ते वाढत जाऊन पिकांना आवश्यक असणारी मूलद्रव्ये पुरवीत राहतील. या जीवाणूंचे खाद्य म्हणजेच सेंद्रिय पदार्थ सतत जमिनीला पुरविणे आवश्यक आहे. पिकाच्या अवशेषांचा पुनर्वापर केल्यामुळेच चीनमधील सेंद्रिय शेती यशस्वी झाली आहे. सेंद्रिय पदार्थांमुळे ‘Dirty farming is best farming and clean farming is worst farming’. शेतात उपलब्ध असणारा सर्व काडीकचरा, पालापाचोळा, पिकांचे अवशेष, धसकटे, तण, वाळलेली पाने, केळीचे कांदाडे, उसाचे पाचट अशा अनेक सेंद्रिय पदार्थांमुळे शेती दिसायला अस्वच्छ दिसली तरी त्यात सूक्ष्म जीवाणूंचे भांडार साठवले जाते. त्याचाच उपयोग पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी होतो. त्यामुळे अस्वच्छ शेती ही खरी शेती आणि स्वच्छ शेत म्हणजे अयोग्य शेती पद्धती असे म्हटले जाते.  पिकांचे अवशेष व बायोमासचे आच्छादन पिकांच्या ओळीत किंवा वाफ्यात, फळझाडांच्या आळ्यात संपूर्णपणे अंथरावे. मोकळी जमीन ठेवू नये. पिकांचे उरलेले अवशेष, कचरा कधीही जाळू नये. निंदलेले गवत धुऱ्यावर उचलून न टाकता पिकातच ओळीत बुडाला पसरून टाकावे. हे सर्व सूक्ष्म जीवाणूंचे खाद्य आहे. खालील प्रकारच्या सेंद्रिय पदार्थांचा आच्छादनासाठी वापर करावा.

  •   जास्त कर्ब/नत्र गुणोत्तर (१५०/१) असणारे सेंद्रिय पदार्थ. उदा. पाचटभुसा, पऱ्हाटी तुकडे, बायोगॅस.
  •   मध्यम कर्ब/नत्र गुणोत्तर (५०/१) असणारे सेंद्रिय पदार्थ. उदा. हिरवा पाचोळा गवत, हिरवळीचे गवत.
  •   कमी कर्ब-नत्र गुणोत्तर (२५/१) असणारे सेंद्रिय पदार्थ. उदा. शेण, मलमूत्र इ. वरील तिन्ही प्रकारच्या सेंद्रिय पदार्थाचे 
  • मिश्रण वरील तिन्ही प्रकारचे सेंद्रिय पदार्थ जमिनीवर अंथरून आच्छादन करावे. यातून सर्व प्रकारचे सूक्ष्म जीवाणू (अल्पजीवी, दीर्घजीवी) मोठ्या प्रमाणात वाढतात. ते पिकांना जमिनीतून हवे तेेव्हा हवे तितके, हवे तितक्या प्रमाणात आणि हवे आहे त्यातूनच परिपूर्ण मूलद्रव्ये उपलब्ध करून देतात. याला इंग्रजीमध्ये थिअरी ऑफ ट्रान्सम्युटेशन म्हणतात. 
  • तणांचे फायदे

  •  मुख्य पिकांना परिपोषक मूलद्रव्ये पुरवतात. (उदा. द्विदल तणे)
  •  मातीचे संरक्षण करतात.
  •  आच्छादनामुळे जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.
  •  जमिनीत हवा खेळती ठेवण्यास मदत करतात. 
  •  काही तणे त्रासदायक तणासाठी वाढरोधक म्हणून काम करतात. 
  •  तणांचा आच्छादन म्हणून वापर केल्यास जमिनीत वाढणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंना पोषक तापमान, आर्द्रता व सेंद्रिय खाद्य मिळते.
  •  तणांच्या आच्छादनामुळे जमिनीवर सूर्याची अतिनील किरणांपासून सूक्ष्म जीवाणूंचे संरक्षण होते. 
  •  तणे मृत झाल्यानंतर त्यातील विविध घटक सूक्ष्मजीवांपासून विविध कीटकांसाठी उपयुक्त ठरतात. उदा. मुंग्या, गांडुळे इ. 
  •  काही तणे त्रासदायक तणांच्या पुनरुत्पादनास बाधा आणतात. 
  •  काही तणांतील द्रव्यामुळे कीड व रोगांचे बिजाणू दूर राहतात. 
  • आच्छादनाचे फायदे 

  •  सूर्यप्रकाशातून निघणाऱ्या अतिनील किरणामुळे जमिनीतील एकपेशीय जीवाणू मरतात. पिकांत सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन केले तर सूर्यकिरणांपासून जीवाणूंचे संरक्षण होते. ते मरत नाहीत, उलट वाढतात. आच्छादनासाठी वापरलेल्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन त्याचा सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो. त्याचा फायदा जीवाणूंची संख्या वाढण्यास होतो. तणांना सूर्यप्रकाश मर्यादित मिळाल्याने तणे उगवण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीवरील पाण्याचे बाष्पीभवन कमी झाल्यामुळे पाणी कमी लागते. तसेच जमिनीतील क्षार, पृष्ठभागावर येण्याचे प्रमाण कमी होते किंवा थांबते. जमिनी क्षारयुक्त होत नाहीत.
  •  जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
  •  आच्छादनामुळे जमिनीवरील तापमान व आर्द्रतेचे प्रमाण सूक्ष्म जीवाणूंसाठी अत्यंत पोषक राहते.
  •  सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन असल्याने जमिनीचे हवेतील बाष्प शोषून घेण्याची क्षमता वाढते. 
  •  सूक्ष्म जीवाणूंची कार्यक्षमता वाढते.
  •  जमिनीतील गांडूळे, सूक्ष्म जीवाणूंना खाद्य व संरक्षण मिळते.  
  • -  प्रशांत नायकवाडी, ९६२३७१८७७७,  (लेखक सेंद्रिय शेतीतील तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com