नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या कामांची चौकशी केली जात आहे. विशेष करून तक्रारी असलेल्या आणि शंकास्पद असलेल्या कामाची चौकशी समितीने माहिती मागवली आहे. आतापर्यंत आलेल्या सर्वच तक्रारींसह समितीला शंका येईल, त्या कामाची चौकशी होणार आहे. मागील आठवड्यात पुन्हा काही कामाची समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. काही बाबी समोर येऊ नयेत यासाठी कृषी विभागाकडून मात्र कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून पाच वर्षांत १०३४ गावांत ३८ हजार कामे करून त्यावर पावणे सातशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यातील अनेक कामे निकृष्ट झाल्याची व गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी होत्या. मात्र कृषी विभागाने त्याची फारशी दखल घेतली नाही. आता राज्य सरकारनेच जलयुक्त शिवार अभियानातील कामाची राज्याचे माजी अप्पर मुख्य सचीव विजयकुमार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे, बी. एन. शिसोदे यांच्या समितीने चौकशी सुरू केली आहे.
समितीने आलेल्या तक्रारींसह शंकास्पद कामांचे अंदाजपत्रक, त्यावर केलेला खर्च, काम अंदाजपत्रकानुसार झाले की नाही यासह अन्य बाबींविषयी माहिती मागवली आहे. मध्यंतरी कृषीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत ठाण मांडले होते. चौकशीमुळे जलयुक्तची कामे करणारी यंत्रणा व अधिकारी धास्तावले आहेत. समिती कितपत दखल घेते, याकडे लक्ष लागले आहे.
अन्य यंत्रणांनी तक्रारी दाखवल्या नसल्याची शंका
जलयुक्त शिवार अभियानच्या सर्व कामांचा समन्वय कृषी विभागाकडून केला जात होता. मात्र कृषीसोबत वन, सामाजिक वनीकरण, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, लघुपाटबंधारे (जलसंधारण), लघुपाटबंधारे (जिल्हा परिषद) व गटविकास अधिकारी पातळीवरही मोठे कामे झाले आहे. कृषी शिवाय इतर यंत्रणांनी साडेतीनशे कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च केली आहे. त्यांच्या कामाबाबत मात्र तक्रारीच नसल्याचे चौकशी समितीला भासविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.