औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात जिल्ह्याने आघाडी मिळविली आहे. कर्ज पुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती झाली असून इतर जिल्ह्यात मात्र अजून उद्दिष्टपूर्ती होणे बाकी आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० साठी ११९६ कोटी ७९ लाख रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट होते. त्याचा पाठलाग करताना २१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व बँकांनी २ लाख ३० हजार ४३३ शेतकऱ्यांना ११९९ कोटी ९६ लाख रुपयांचा कर्जपुरवठा केला. १००.०३३ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा खरीप पीक कर्जपुरवठ्यात राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे.
औरंगाबाद विभागात जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जास्तीचा कर्जपुरवठा झाला असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी दिली. गतवर्षी खरीप हंगाम २०१९-२० मध्ये जिल्ह्यात ८५ हजार ३६४ शेतकऱ्यांना ५८८ कोटी ५० लाख रुपये खरीप पीक कर्जवाटप झाले होते.
जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, औरंगाबाद जिल्हा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आदींनी उद्दिष्टाच्या जास्त पीक कर्जपुरवठा केला. तर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ८४.१४ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाने ७६.१६ टक्के, तर एचडीएफसी बँकेने ८३.३१ टक्के कर्जवापट केले होते.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी उद्दिष्टाच्या ९२.३२ टक्के, तर खासगी बँकांनी ६६.८० टक्के कर्जपुरवठा केला. रब्बी हंगामासाठी १ ऑक्टोबरपासून पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू होणार आहे, अशी माहिती कारेगावकर यांनी दिली.
बीड जिल्ह्यात ९३ टक्के, हिंगोली ४० टक्के, जालना ७६ टक्के, लातूर ५२ टक्के, नांदेड ३९ टक्के, उस्मानाबाद ५३ टक्के, तर परभणी जिल्ह्यात ४६ टक्के खरीप पीक कर्जवाटप झाले, असे कारेगावकर यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.