नाशिक : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. नवीन कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत. त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या मागण्यांसाठी सुरू दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेष जागर आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध केला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता.३) सायंकाळी ७ वाजता आत्मक्लेष जागर आंदोलनाला सुरवात झाली. यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी पिठलं भाकरी खाऊन सरकारचा निषेध केला. घोषणाबाजी केली.
या ठिकाणी संबळवादन करीत आंदोलनाला सुरवात झाली. मात्र, यावेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने पुढील आंदोलन गोल्फ क्लब मैदानावर सुरू झाले. पहाटे ४ वाजता आंदोलनाची सांगता झाली.
आंदोलना प्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष साहेबराव मोरे, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष सुधाकर मोगल, उत्तर महाराष्ट्र विभागाचे पक्षाचे अध्यक्ष राजू शिरसाट, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष परशुराम शिंदे, संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते गोविंद पगार, सुभाष आहिरे, बाबा खालकर, सोमनाथ बोराडे, संपत जाधव, सचिन कड, आत्माराम पगार आदी उपस्थित होते.
केंद्र सरकार पोलिस बळाचा वापर करून आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. हे दुर्दैवी आहे. या कायद्यांतील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.