पूरग्रस्त ग्रामपंचायतींच्या स्वच्छतेसाठी ५ कोटी : मंत्री बबनराव लोणीकर

मंत्री बबनराव लोणीकर
मंत्री बबनराव लोणीकर

मुंबई  : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली़, सातारा तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे या जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळित झाला आहे. तो लवकरच सुरळीत करणार असून, पूरग्रस्त गावांतील स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद केली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकतीच (ता. १३) दिली.

पूरग्रस्त भागातील पाणीपुरवठा योजना व स्वच्छतेबाबतची आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्या वेळी श्री. लोणीकर बोलत होते. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अपर मुख्य सचिव शामलाल गोयल व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. श्री. लोणीकर म्हणाले, की कोल्हापूर, सांगली व सातारा या भागांतील पुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमध्ये सुमारे ६०४, सांगलीमध्ये १३०, साताऱ्यामध्ये ९८ पाणीपुरवठा योजना या क्षतिग्रस्त झालेल्या आहेत. तसेच राज्यातील इतर पूरग्रस्त भागांतील योजनाही क्षतिग्रस्त झाल्या आहेत.  

मंत्री लोणीकर म्हणाले, की या सर्व भागांतील स्वच्छता मोहीम व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला आहे. त्या अनुषंगाने तात्पुरत्या उपाययोजना राबविण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या उद्भवाची तातडीने तपासणी करावी. त्या ठिकाणी टी. सी.एल. पावडर, क्लोरीनचा वापर करून जे पाणी पिण्यायोग्य आहे, त्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा. तसेच या भागातील जे जलस्रोत दूषित आहेत, त्या जलस्रोतांची तातडीने तपासणी करून पाणी पिण्यायोग्य करण्यात यावे, तसेच अन्य जिल्ह्यातून हातपंप दुरुस्ती व पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहेत. जेणेकरून सर्व पिण्याच्या पाण्याच्या योजना तातडीने सुरू करण्यात येणार आहेत. 

राज्यातील पूरग्रस्त भागातील नद्यांवर तेथील गावांतील अनेक पाणीपुरवठा योजना आहेत. पुरामुळे या भागातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींमध्ये गाळ साचणे, अनेक विहिरी ढासळल्या आहेत. तर काही ठिकाणीच्या बुजलेल्या आहेत. तेथील पाइपलाइन खराब होणे, विद्युतपंप खराब होणे. या सर्व योजनांचा सर्व्हे करून यामध्ये बाधित योजनांमध्ये कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्याचे तातडीने सर्वेक्षण करावे. तसेच या कामांचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हा स्तरावरून उपलब्ध होणारा निधी तातडीने वापरण्यात यावा. तसेच इतर उपाययोजनांच्या बाबतीत शासनाला एकत्रित प्रस्ताव सादर करावा. तसेच यासाठी आवश्यक तो सर्व निधी शासन त्वरित उपलब्ध करून देणार असल्याचेही श्री. लोणीकर यांनी सांगितले.

राज्यातील पूरग्रस्त भागातील ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली. १००० लोकसंख्येपर्यंतच्या ग्रामपंचायतींना ५० हजार तर १००० च्या पुढील लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना १ लाख रुपये निधी प्राथमिक स्वरूपात त्वरित वितरित करण्यात येणार असल्याचे श्री. लोणीकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com