मोडून पडली काढणीला आलेली केळी 

काही दिवसांत जवळपास दोन वर्ष जपलेले केळीचे आठ एकरातील पीक हाती येणार होते. परंतु एका रात्रीत वादळी पाऊस झाला आणि नदीला पूर आला. त्यामुळे हाती येणारे पीक केळीच मोडून पडल्याने हातचे गेले.
banana damage
banana damage

औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष जपलेले केळीचे आठ एकरातील पीक हाती येणार होते. परंतु एका रात्रीत वादळी पाऊस झाला आणि नदीला पूर आला. त्यामुळे हाती येणारे पीक केळीच मोडून पडल्याने हातचे गेले. 

मराठवाड्याच्या बहुतांश भागात सततच्या वादळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान होते आहे. गत रविवारपासून (ता. १३) गुरुवार (ता. १७) पर्यंतच्या वादळी व जोरदार पावसाने सोयगाव तालुक्यातील वाडी सुतांडा येथील सर्जेराव जंजाळ यांच्या एकत्र कुटुंबातील जवळपास पंधरा एकरातील केळी पिकाचं वादळी पावसासह हिवरा नदीच्या पुराने मोठे नुकसान केले. त्याची आपबिती सर्जेराव जंजाळ सांगत होते. 

सर्जेराव जंजाळ यांच्या सहा भावंडांच्या एकत्र कुटुंबात जवळपास ६५ एकर शेती. यापैकी जवळपास पंधरा एकरावर केळीचे पीक. हिवरा नदीकाठच्या शेतातील आठ एकर केळीचे पीक काढणीला आले होते. परंतु रविवारी (ता १३) वादळी व जोरदार पाऊस झाला व नदीला पूरही आला. त्यामध्ये आठ एकरातील काढणीला आलेल्या केळीचे झाड अक्षरशः मोडून पडली. त्यानंतर कमीअधिक प्रमाणात सुरू असलेला पाऊस गुरुवारी जोरदार बरसला. त्यामुळे हिवरा नदीला आलेल्या पुरामुळे जूनमध्ये नव्याने लागवड केलेल्या सात ते आठ एकर केळीतील अनेक रोपे व ठिबक संच, पाईप काही जनावर वाहून गेल्याचे जंजाळ म्हणाले. 

काढणीला आलेल्या केळी पिकावर सर्जेराव जंजाळ यांच्या कुटुंबाचा एकरी जवळपास ६० ते ७० हजार रुपये खर्च झाला होता. तर नव्याने लागवड केलेल्या सात ते आठ एकरातील केळी पिकावरही जवळपास पंधरा ते वीस हजार रुपयांचा एकरी खर्च झाला होता. शिवाय काढणीला आलेल्या केळी पिकातून किमान २० ते २२ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना होणे अपेक्षित होते. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे हाती येणारे पीक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक संकट कोसळले आहे. 

झालेल्या नुकसानीची मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी पाहणी केल्याची माहिती सर्जेराव जंजाळ यांनी दिली. गाव परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सर्जेराव जंजाळ म्हणाले. 

खरीप पिकांना फटका  खरिपातील कपाशी, सोयाबीन, उडीद, मका, बाजरी आदी पिकांची सततच्या पावसाने पुरती दानादान केली आहे. एकीकडे नदी ओढ्या काठच्या पिकांना पुराचा दणका बसत असतानाच इतर भागातील कपाशी सोयाबीन उडदाच्या पिकांना कोंब फुटणे सुरू झाले आहे.  प्रतिक्रिया एवढं मोठं नुकसान झालं काही सुचेना. शासन काय मदत करते देव जाणे. काही क्षेत्राचा विमा उतरविला होता. त्याचंही काय व्हतंय कुणास ठाऊक.  - सर्जेराव जंजाळ, शेतकरी, वाडी, जि. औरंगाबाद   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com