परभणी जिल्ह्यात उन्हाच्या चटक्याने केळी बागा होरपळल्या

अडीच एकरावरील केळीची चार हजार झाडे उतरायला आली होती. परंतु घड परिपक्वतेच्या अवस्थेत पाणी नसल्याने होरपळून गेलेली केळीबाग मोडून टाकावी लागली. दोन लाख रुपयांवर खर्च वाया गेला. अंजीर बाग देखील होरपळली आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी. - माणिकराव सूर्यवंशी, शेतकरी, सिंगणापूर, जि. परभणी
केळी नुकसान
केळी नुकसान

परभणी: जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होत असतानाच उन्हाचा चटका वाढल्याने केळी बागा होरपळून गेल्या. दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांनी जवळपास वर्षभर जोपासलेल्या केळी बागा उत्पादन सुरू होण्याआधीच उद्धवस्त झाल्याने उत्पादन खर्च वाया गेला. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे केळी हे पारंपरिक फळपीक आहे. जून, जुलै, आॅगस्ट महिन्यांत केळी पीक काढणीस येते त्यामुळे खरीप हंगामातील खर्चाची तजवीज होते. त्यामुळे जिल्ह्यातील बागायती शेतकऱ्यांचा कल अन्य फळपिकांच्या तुलनेत केळी कडे जास्त असतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने केळीच्या क्षेत्रात घट झाली.  गतवर्षी जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा या तालुक्यांत तसेच सिंचनासाठी खात्रीची सुविधा असलेल्या नदी काठच्या गावातील शेतकऱ्यांनी केळीची लागवड केलेली आहे. परंतु गतवर्षीच्या पावसाळ्यात अल्प पाऊस झाल्याने विहिरी, बोअरना पाणी आले नाही. डाव्या कालव्याद्वारे दोन आवर्तने सोडण्यात आली होती. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु आवर्तने बंद झाल्यानंतर विहिरींची पाणीपातळी खालावली. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी झाली. गेल्या दोन ते अडीच महिन्यांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले. वेगाच्या वाऱ्यामुळे केळीच्या पानाच्या झिरमिळ्या झाल्या. उन्हाच्या चटक्यांनी झिरमिळ्या झालेली पाने चटकन होरपळून गेली. अनेक भागांत केळी निसवण्याच्या अवस्थेत होत्या. काही भागांत घड तयार होऊन उतरायला आल्या होत्या. परंतु सिंचनासाठी पाण्याचा अभाव आणि वाढलेला उन्हाचा चटका यामुळे उत्पादन सुरू होण्याआधीच केळी बागा उद्धवस्त झाल्याने उत्पादन खर्च वाया गेला. त्यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. शेतकऱ्यांनी महसूल तसेच कृषी विभागाकडे दाखल केलेल्या अर्जानुसार नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत असे तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे यांनी सांगितले. जिल्ह्यातील केळी पिकाचे तालुकानिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये) परभणी (२७८.३०), जिंतूर (९०), सेलू (७५.१०), मानवत (९१.५०), पाथरी (२६४), सोनपेठ (२५.९०), गंगाखेड (३२), पालम (२४), पूर्णा (९)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com