कमी तापमानामुळे घड निसवण्यास उशीर लागतो, तसेच पानांच्या बेचक्यातील पोकळी प्रसरण पावण्यास निर्बंध येतात. थंड वातावरणात घड निसवताना केळफुल नैसर्गिकरीत्या बाहेर पडत नाही. मात्र, घडाची व दांड्याची अंतर्गत वाढ सुरू राहून, घडाच्या २ ते ५ फण्या पोकळीतून बाहेर पडतात व उर्वरित घड आतमध्येच अडकतो.
केळी पिकाच्या उत्तम वाढ व उत्पादनासाठी किमान तापमान १६ पेक्षा अधिक तर कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असणे आवश्यक असते. केळीच्या वाढीच्या विविध अवस्थांनुसार कंद उगवण्यासाठी १६ ते ३०, पाने व फळांच्या योग्य वाढीसाठी २६ ते ३० आणि केळफूल योग्यरीत्या बाहेर पडण्यासाठी २२ ते २५ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. केळीला योग्य प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी १२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची आवश्यकता असते. मात्र, हिवाळ्यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात किमान तापमान १६ अंशापेक्षाही खाली जाते. या काळात केळी पिकावर अनेकविध प्रतिकूल परिणाम होतात. थंडीचा केळी पिकावर होणारा परिणाम कंद उगवणीवर होणारा परिणाम
थंडीमध्ये केळीची कंदाद्वारे लागवड नोव्हेंबर महिना सुरू होण्यापूर्वी करावी. हिवाळ्यात लागवड केल्यास, कमी तापमानामुळे कंद उगवण व नवीन मुळ्या येण्यास उशीर होतो. यामुळे पीक कालावधी लांबतो. नांग्या पडण्याचे प्रमाणही वाढते. नवीन मुळ्यांवर होणारा परिणाम
कंद लागवडीनंतर पिकाला अधिकाधिक अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी नवीन मुळ्या उपयुक्त ठरतात. मात्र, कमी तापमानामुळे नवीन मुळ्यांच्या वाढीचा वेग मंदावतो. त्या आखूड राहतात. परिणामी, त्यांची अन्न व पाणी शोषण्याची कार्यक्षमता मंदावते. दिवस व रात्रीच्या तापमानातील तफावत वाढल्यास, मुळ्यांचे कंकण सडून त्यांच्या संख्येत घट येते. पिकावर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या विशेषतः जस्तांच्या कमतरतेची लक्षणे (पानाच्या खालील बाजूस जांभट छटा) दिसून येतात. पानांच्या वाढीवर होणारा परिणाम
केळीच्या झाडाला प्रति महिना सरासरी ४ नवीन पाने येतात. मात्र, थंडीच्या काळात हा दर कमी होऊन सरासरी २ ते ३ नवीन पाने येतात. नवीन पानाची सुरळी उलगडण्यास वेळ लागतो. अनेकवेळा पानाच्या एका कडेजवळ काळपट चट्टा तयार होतो. मुळ्यांची अन्नद्रव्य शोषण क्षमता कमी झाल्यामुळे पाने जवळ येऊन त्यांचा गुच्छ तयार होतो. पाने जवळ आल्यामुळे त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध होत नाही, परिणामी प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. पानांतील हरितद्रव्य नष्ट झाल्यामुळे पानांवर जांभळट रंगाची झाक तयार होऊन ती करपतात. झाडाच्या वाढीवर होणारा परिणाम
झाडाची वाढ मंदावल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास उशीर होतो. सर्व बागेत एकाच वेळी झाडांची निसवण होत नाही. केळी बागेचा निसवण्याचा कालावधी लांबतो. परिणामी, कापणीचा कालावधी लांबून उत्पादन खर्चात वाढ होते. झाडे वांझ राहण्याचे प्रमाण वाढते. केळफूल बाहेर पडण्यास अडचण
कमी तापमानामुळे घड निसवण्यास उशीर लागतो. पानांच्या बेचक्यातील पोकळी प्रसरण पावण्यास निर्बंध येतात. थंड वातावरणात घड निसवताना केळफूल नैसर्गिकरीत्या बाहेर पडत नाही. मात्र घडाची व दांड्याची अंतर्गत वाढ सुरू राहून, घडाच्या २ ते ५ फण्या पोकळीतून बाहेर पडतात. उर्वरित घड आतमध्येच अडकतो. काही वेळेस झाडाचे खोड फोडून संपूर्ण घड वेडावाकडा बाहेर पडतो. या दोन्ही प्रकारचे घड व्यवस्थितरीत्या पोसले जात नाहीत. दांड्यासहित निसटून पडतात. फळ व घड वाढीवर होणारा परिणाम
थंड वातावरणात नव्याने निसवलेल्या घडाच्या फण्या उमलण्यास उशीर लागतो. या काळात सेंद्रिय कर्ब साठवणुकीचा दर घटल्यामुळे फळ वाढीचा वेगही मंदावतो. डिसेंबर ते मे महिन्यात लागवड केलेल्या बागेतील घडांची निसवण व वाढ थंड वातावरणामुळे नीट होत नाही. घड पक्व होण्यास मृग व कांदेबागेपेक्षा १० ते २० दिवसांचा उशीर होतो. केळी पिकण्यावर होणारा परिणाम
थंड वातावरणात केळी एकसमान व अपेक्षित वेगाने पिकत नाहीत. केळीच्या सालीचा आतील रंग मळकट पिवळसर दिसतो. जास्त काळ तापमान खूपच कमी राहिल्यास केळी काळपट होतात. संपर्क ः डॉ. के. बी. पवार, ०२५७-२२५०९८६ (केळी संशोधन केंद्र, जळगाव)