जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्तर भारतात व्यवस्थित रवाना होत आहे. तरीही मागणी कमी व पुरवठा अधिक अशी स्थिती आहे. काढणी रखडत सुरू आहे. केळीचे दर तीन वर्षानंतर निचांकी स्थितीत म्हणजेच ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. निर्यातक्षम, दर्जेदार केळीलाही अपेक्षित दर मिळत नसल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
सध्या खानदेशात जळगावमधील रावेर, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, अक्कलकुवा, शहादा भागात केळी काढणीवर आहे. रावेरात सर्वाधिक केळी काढणीवर आहे. रावेर, मुक्ताईनगर, यावल, जामनेर भागातून मागील चार - पाच दिवसांत ८० ते ८५ हजार क्विंटल केळीची खरेदी झाली. यातील ९० टक्के केळीची पाठवणूक उत्तर भारतात झाली. या केळीला ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. उत्तरेकडील वाहतूक सुरळीत होत असली, तरी दरांत मागील चार ते पाच दिवसांत कुठलीही वाढ नाही. यात उत्पादन खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे.
उत्पादकाला जगवायचे असेल, तर किमान १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर द्यावा, अशी मागणी उत्पादकांची आहे. शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करा किंवा शासनाने खरेदी करावी, अशीही मागणी आहे. रावेरात कमाल शेतकरी उतिसंवर्धित रोपे, ठिबक सिंचन, फर्टिगेशन, ऑटोमेशन, फ्रूट केअर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. मुक्ताईनगर, शहादा, तळोदा भागातही शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेत आहेत. त्यासाठी एकरी एक ते सव्वा लाख रुपये खर्च येतो. यामुळे दरही किमान १००० रुपये प्रतिक्विंटल मिळायला हवा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.